ICC T20 WC 2021 : अखेरच्या सामन्यानंतर रवी शास्त्री भावूक, टीम इंडियानं शास्त्रींना दिला विजयी निरोप
नामिबियाविरुद्धचा सामना रवी शास्त्री यांच्या प्रशिक्षकपदाच्या कारकीर्दीतला अखेरचा सामना ठरला. टीम इंडियानं रवी शास्त्री यांना विजयी निरोप दिला खरा, पण गेल्या चार वर्षात शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली आयसीसीची एकही मोठी स्पर्धा जिंकता न आल्याची रुखरुख मात्र कायम राहिली. शास्त्री यांच्या प्रशिक्षकपदाच्या कारकीर्दीत भारतानं इंग्लंड-ऑस्ट्रेलियासारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम केलं. तेही केवळ घरच्या मैदानावरच नव्हे तर त्यांच्याही भूमीत जाऊन. पण शास्त्री यांच्या काळात भारताला आयसीसीच्या तीन मोठ्या स्पर्धांमध्ये यशानं हुलकावणी दिली. त्यात २०१९ सालचा वन डे विश्वचषक, यंदाची आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धा आणि सुरु असेलल्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक स्पर्धेचा समावेश आहे.























