PM Narendra Modi: मोबाईलवर अचानक येणारे इमर्जन्सी मेसेज अन् वाजणारे सायरन आता बंद; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टिम'ला स्थगिती
PM Narendra Modi: गेल्या काही दिवसांपासून देशातील कोट्यवधी मोबाईलधारकांच्या स्क्रीनवर अचानक येणारे इमर्जन्सी मेसेज आणि वाजणारे सायरन आता बंद होणार आहेत.

PM Narendra Modi: गेल्या काही दिवसांपासून देशातील कोट्यवधी मोबाईलधारकांच्या स्क्रीनवर अचानक येणारे इमर्जन्सी मेसेज (Emergency Messages) आणि वाजणारे सायरन आता बंद होणार आहेत. केंद्र सरकारने पुढील आदेश येईपर्यंत ही 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टिम' (Cell Broadcast Alert System) तात्पुरती स्थगित केली आहे. देशभरात या प्रणालीची यशस्वी चाचणी (Successful Testing) पूर्ण झाल्यानंतर, 12 जून 2026 पासून ही सेवा पुढील आदेशापर्यंत रोखण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या आपत्ती व्यवस्थापन विभागांनी (Disaster Management Departments) मध्यरात्रीच्या सुमारास आपत्तीचा एक चाचणी अलर्ट जारी केला होता. मात्र, तांत्रिक कारणांमुळे हा आपत्कालीन मेसेज थेट एका बड्या नेत्याच्या वैयक्तिक मोबाईल नंबरवर जाऊन पोहोचला. या यंत्रणेचे वैशिष्ट्य असे की, फोन सायलेंट मोडवर (Silent Mode) किंवा पूर्णपणे बंद (Switch Off) असतानाही यात मोठ्या आवाजात सायरन वाजतो. झेड सुरक्षा असलेल्या नेत्यांच्या फोनवर मध्यरात्री अचानक हा सायरन वाजल्याच्या अजब प्रकारानंतर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDMA) तातडीने आदेश जारी करत या सेवेला पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगिती दिली आहे. दरम्यान, पंतप्रधानांच्या मोबाईलवर हा मेसेज धडकल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
Cell Broadcast Technology: सेल ब्रॉडकास्ट तंत्रज्ञान नेमकं काय आहे?
ही केंद्र सरकारची एक अत्याधुनिक आणि हायटेक मोबाईल आधारित अलर्ट यंत्रणा आहे. ही प्रणाली आपल्या नेहमीच्या सर्वसामान्य एसएमएस (SMS) पेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. याद्वारे कोणत्याही विशिष्ट मोबाईल नंबरची गरज न भासता, एकाच वेळी एकाच परिसरातील कोट्यवधी मोबाईल वापरकर्त्यांना तात्काळ सतर्क केले जाऊ शकते.
एका विशिष्ट मोबाईल टॉवरच्या (Mobile Tower) क्षेत्रात येणाऱ्या सर्वच सक्रिय उपकरणांवर हा मेसेज पाठवला जातो. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आपत्तीच्या काळात टेलिकॉम नेटवर्क जॅम झालेले असतानाही हे तंत्रज्ञान यशस्वीरित्या काम करते. त्यामुळे पूर, भूकंप किंवा चक्रीवादळासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी हे अत्यंत प्रभावी मानले जाते.
Cell Broadcast Technology: एसएमएसपेक्षा ही सिस्टिम जास्त प्रभावी का?
सामान्य एसएमएसच्या माध्यमातून आपत्तीची माहिती देताना मर्यादा येतात. जेव्हा एकाच वेळी लाखो लोकांना एसएमएस पाठवले जातात, तेव्हा नेटवर्कवर प्रचंड ताण निर्माण होतो आणि मेसेज पोहोचण्यास विलंब होतो. यामुळे लोकांना वेळेत सुरक्षित स्थळी हलवणे कठीण होते.
याउलट, 'सेल ब्रॉडकास्ट सिस्टिम' थेट रेडिओ सेलचा वापर करते, ज्यामुळे सेकंदाच्या भागामध्ये मेसेज सर्व मोबाईलवर फ्लॅश होतो. या प्रणालीचे कोडिंग आर्किटेक्चर अत्यंत प्रगत पद्धतीने डिझाइन केलेले असते. त्यामुळे हा मेसेज मोबाईलच्या मुख्य ऑपरेटिंग सिस्टिमलाही ओव्हरराइड म्हणजेच बायपास करून थेट स्क्रीनवर सायरनसह उमटतो. आता ही सेवा तात्पुरती बंद झाली असली, तरी तांत्रिक त्रुटी सुधारून ती पुन्हा सुरू केली जाण्याची शक्यता आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा






















