IND vs ZIM : झिम्बाब्वे विरुद्धच्या 'करो या मरो' सामन्याआधीच टीम इंडियाला मोठा झटका, स्टार खेळाडू T20 वर्ल्ड कप अर्ध्यावर सोडून घरी परतला
Team India T20 World Cup 2026 : दक्षिण आफ्रिकेविरोधात मोठा पराभव झाल्यानंतर टीम इंडियाचे उपांत्य फेरीत पोहोचण्याचा मार्ग अधिक खडतर झाला आहे. त्यामुळे पुढील दोन्ही सामने जिंकणे आवश्यक आहे.

IND vs ZIM T20 World Cup : टी20 वर्ल्ड कप 2026 च्या सुपर-8 फेरीत 26 फेब्रुवारीला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी टीम इंडियाला झिम्बाब्वे विरोधात (India Vs Zimbabwe) अत्यंत महत्त्वाचा सामना खेळायचा आहे. मात्र या निर्णायक सामन्यापूर्वी भारतीय संघाला (Team India) मोठा धक्का बसला आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू रिंकू सिंह (Rinku Singh) त्याच्या कौटुंबिक कारणामुळे तातडीने घरी गेला आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला सुपर- 8 सामना गमावल्यानंतर भारतीय संघ पुढील लढतीसाठी चेन्नईत दाखल झाला होता. मात्र सराव सत्रात रिंकू सिंह दिसला नाही. हाती आलेल्या वृत्तानुसार, त्याच्या वडिलांची प्रकृती गंभीर असून त्यांना ग्रेटर नोएडातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
झिम्बाब्वे विरुद्ध 'करो या मरो' सामना (IND vs ZIM T20 World Cup 2026)
भारतीय संघाचा पुढील सामना 26 फेब्रुवारीला झिम्बाब्वेविरुद्ध होणार आहे. हा सामना चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. फिरकीपटूंना साथ देणारी ही खेळपट्टी असल्याने संघरचनेत बदल होण्याची शक्यता आहे.
कर्णधार सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखालील टीम इंडियासाठी हा सामना जिंकणे अत्यावश्यक आहे. जर भारत झिम्बाब्वेविरुद्ध पराभूत झाला आणि त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वेस्ट इंडीजने विजय मिळवला, तर भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते.
रिंकूच्या अनुपस्थितीत अक्षर पटेलला संधी? (Team India Playing XI Update)
रिंकू सिंह उपलब्ध नसल्यास त्याच्या जागी अक्षर पटेलला (Axar Patel) प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते. अक्षरच्या समावेशामुळे फलंदाजी बळकट होईल आणि गोलंदाजीत अतिरिक्त पर्याय मिळेल. सुरुवातीच्या सामन्यांत अक्षरला संधी मिळाली होती. नंतर त्याच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला स्थान देण्यात आले होते.
दरम्यान, आतापर्यंतच्या सामन्यांत रिंकू सिंहचा फॉर्म विशेष ठळक राहिलेला नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सुपर-8 सामन्यात तो खातेही न उघडता बाद झाला होता. नेदरलँड विरुद्धच्या सामन्यात त्याने 6, पाकिस्तानविरुद्ध 11, नामिबिया विरुद्ध 1 तर यूएस विरोधात 6 धावा काढल्या आहेत.
भारतीय संघाला 26 फेब्रुवारी आणि 1 मार्च रोजी झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडीजविरुद्ध दोन निर्णायक सामने खेळायचे आहेत. या पैकी एकाही सामन्यात पराभव झाल्यास विश्वचषकातील प्रवास थांबू शकतो.
ही बातमी वाचा:
























