T20 Mumbai league: रॉयल्स विजेतेपद राखण्यासाठी अंधेरीला भिडणार; महिलांच्या ऐतिहासिक अंतिम सामन्यात फाल्कन्स विरुद्ध टायगर्स सज्ज
T20 Mumbai league: पुरुषांच्या अंतिम सामन्यात उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेले दोन संघ भिडणार आहेत.

मुंबई, १२ जून २०२६: नुवामा प्रायव्हेट टी-२० मुंबई लीग २०२६ च्या शानदार समारोपासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. शनिवारी वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या अंतिम सामन्यात (T20 Mumbai league) गतविजेता संघ 'मुंबई साउथ सेंट्रल मराठा रॉयल्स' आणि 'आर्क्स अंधेरी' आमनेसामने असतील. त्याआधी, याच मैदानावर एक ऐतिहासिक क्षणही पाहायला मिळेल, जेव्हा नुवामा प्रायव्हेट टी-२० मुंबई महिला लीगचा पहिला वहिला अंतिम सामना 'सोबो मुंबई फाल्कन्स' आणि 'आकाश टायगर्स मुंबई वेस्टर्न सबर्ब्स' यांच्यात रंगणार आहे.(T20 Mumbai league)
पुरुषांच्या अंतिम सामन्यात उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेले दोन संघ भिडणार आहेत. भारताचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे याच्या नेतृत्वाखालील 'आर्क्स अंधेरी'ने उपांत्य फेरीत 'आकाश टायगर्स मुंबई वेस्टर्न सबर्ब्स'चा पाच गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. दुसरीकडे, 'मुंबई साउथ सेंट्रल मराठा रॉयल्स'ने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील 'नॉर्थ मुंबई पँथर्स'चा दुसऱ्या उपांत्य फेरीत तीन गडी राखून संघर्षपूर्ण पराभव करत आपले विजेतेपद राखण्याच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवली.(T20 Mumbai league)
या हंगामात 'अंधेरी'ने सातत्यपूर्ण कामगिरी केली असली तरी सिद्धेश लाडच्या 'रॉयल्स'ने महत्त्वाच्या क्षणी सर्वोत्तम कामगिरी करण्याची क्षमता सिद्ध केली आहे. प्रतिष्ठित करंडक जिंकण्यासाठी होणाऱ्या या लढतीत दुबे याचे आक्रमक नेतृत्व आणि लाड याचा संयमी व रणनीतीपूर्ण दृष्टिकोन यांच्यातील चुरस पाहण्यासारखी असेल.(T20 Mumbai league)
स्पर्धेचे सुरळीत आयोजन केल्याबद्दल मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (MCA) कौतुक करताना दुबे म्हणाला की, त्यांचा संघ अंतिम सामन्यात 'रॉयल्स'विरुद्धच्या मोठ्या लढतीसाठी उत्सुक आहे. "एमसीएने ही अप्रतिम लीग आयोजित केली आहे, जी भारतातील सर्वोत्तम लीग्जपैकी एक आहे. सामन्यांचा दर्जा खरोखरच उत्कृष्ट राहिला आहे. मी अंतिम सामन्यासाठी खूप उत्साहित आहे," असे दुबे म्हणाला.
सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारल्यामुळे लाड देखील आत्मविश्वासाने भरलेले दिसत होता. तो म्हणाला, "सामूहिक प्रयत्न आणि जिद्दीच्या जोरावर आमची ही मोहीम शानदार ठरली आहे. वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या खेळाडूंनी जबाबदारी पेलली आणि त्यामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत. अंतिम सामन्यासाठी आम्ही गोष्टी सोप्या ठेवू; प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करू, सामन्यातील छोटे-छोटे महत्त्वाचे क्षण जिंकू आणि या प्रसंगाचा आनंद घेऊ. जर आम्ही असे केले, तर जिंकण्याची आम्हाला नक्कीच चांगली संधी मिळेल."
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (MCA) अध्यक्ष अजिंक्य नाईक आणि लीग गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष राजदीप गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली, या लीगने अर्जुन तेंडुलकर, मुशीर खान आणि इतर अनेक मुंबईतील क्रिकेटमधील उदयोन्मुख ताऱ्यांचे कौशल्य जगासमोर आणले आहे. हे सर्व खेळाडू आता सर्वात मोठ्या मंचावर चमकण्यासाठी सज्ज आहेत. या स्पर्धेत अनेक खेळाडूंनी उत्कृष्ट वैयक्तिक कामगिरीही केली आहे. 'बांद्रा ब्लास्टर्स'चा कर्णधार सुवेद पारकर २५० धावांसह (यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे) फलंदाजीच्या यादीत आघाडीवर असून सध्या 'ऑरेंज कॅप'चा मानकरी आहे. 'आर्क्स अंधेरी'चा अजय मिश्रा १० बळींसह गोलंदाजीच्या यादीत अव्वल स्थानावर असून तो 'पर्पल कॅप'चा मानकरी आहे.
इतर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमध्ये 'ट्रायम्फ नाइट्स मुंबई नॉर्थ ईस्ट'च्या नूतन गोयलने २४२ धावा केल्या आहेत, तर 'आकाश टायगर्स'चा फलंदाज जय बिस्तने २२५ धावांची नोंद केली आहे. दिव्यांश सक्सेनाने अंधेरीसाठी २१० धावांचे योगदान दिले आहे, तर 'ईगल ठाणे स्ट्रायकर्स'चा शाश्वत जगताप हा स्पर्धेतील शतक झळकावणारा आणखी एक खेळाडू ठरला आहे. सिल्व्हेस्टर डिसोझाची एका डावात पाच बळी घेण्याची कामगिरी या हंगामातील सर्वोत्तम गोलंदाजी ठरली आहे.
महिलांच्या पहिल्यावहिल्या विजेतेपदासाठी 'फाल्कन्स' आणि 'टायगर्स' आमनेसामने
महिलांच्या स्पर्धेत, पहिल्यावहिल्या विजेतेपदासाठी सायली सतघरेच्या नेतृत्वाखालील 'सोबो मुंबई फाल्कन्स'चा सामना हुमैरा काझीच्या 'आकाश टायगर्स मुंबई वेस्टर्न सबर्ब्स'शी होणार आहे. 'टायगर्स'कडे मजबूत फलंदाजी फळी आहे, तर 'फाल्कन्स'ची भिस्त त्यांच्या प्रभावी गोलंदाजी आक्रमणावर असेल, ज्यांनी संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.
आपल्या संघाच्या ताकदीबद्दल बोलताना सायलीने स्पर्धेदरम्यान विविध खेळाडूंनी दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला आणि अंतिम सामन्यातही तशीच कामगिरी अपेक्षित असल्याचे सांगितले. ती म्हणाली, "मला वाटते की आमच्या संघाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे प्रत्येक खेळाडूने वेगवेगळ्या सामन्यांमध्ये योगदान दिले आहे. आम्ही जिंकलेल्या तीन सामन्यांमध्ये आम्हाला वेगवेगळे 'सामनावीर' मिळाले आहेत, त्यामुळे आम्ही केवळ एका किंवा दोन खेळाडूंवर अवलंबून नाही. अंतिम सामन्याकडे वाटचाल करताना ही खरोखरच चांगली बाब आहे. सर्व खेळाडू आपापल्या भूमिका उत्तमरीत्या पार पाडत आहेत आणि आम्ही आखलेल्या योजनांची तंतोतंत अंमलबजावणी करत आहेत. अंतिम सामन्यासाठी सर्व मुली खूप उत्साहित आहेत आणि मला खात्री आहे की हा एक उत्कृष्ट क्रिकेट सामना होईल."
हुमैरानेही अंतिम सामन्यापूर्वी अनेक आव्हानांवर मात करण्याच्या आपल्या संघाच्या क्षमतेबद्दल आत्मविश्वास व्यक्त केला. "अंतिम फेरीत धडक मारल्याचा खूप आनंद होत आहे. प्रत्येक सामन्यागणिक आमचा खेळ अधिक बहरत गेला आणि संपूर्ण स्पर्धेत एक संघ म्हणून आम्ही जिद्द व चिकाटी दाखवली आहे. या प्रवासात आम्हाला विविध आव्हानांचा सामना करावा लागला आणि दबावाखाली संघाने ज्या प्रकारे कामगिरी केली, ते पाहणे खूप समाधानकारक होते. अंतिम सामना आणि विजेतेपदासाठी लढण्याची संधी याबद्दल आम्ही खूप उत्सुक आहोत. हा एक मोठा प्रसंग आहे; आम्ही या क्षणाचा आनंद घेण्याचा, चांगला क्रिकेट खेळण्याचा आणि आमची सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करू," असे ती म्हणाली.
आतापर्यंत फलंदाजीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमध्ये 'आकाश टायगर्स'ची सानिका चाळके २०५ धावांसह आघाडीवर आहे; यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे. त्यानंतर 'ठाणे स्काय रायझर्स'ची मानसी पाटील १६६ धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर 'फाल्कन्स'ची फलंदाज सारिका कोळी हिने १०८ धावांचे योगदान दिले आहे.
गोलंदाजांमध्ये, 'फाल्कन्स'ची कर्णधार सायली ही सर्वात प्रभावी ठरली असून तिने नऊ बळी घेतले आहेत; यात एका सामन्यात घेतलेल्या चार बळींचाही समावेश आहे. तिला स्वरा जाधव आणि निर्मिती राणे यांची भक्कम साथ मिळाली असून, त्यांनी अनुक्रमे आठ आणि पाच बळी टिपले आहेत.
महिलांचा अंतिम सामना दुपारी १ वाजता खेळवला जाईल आणि त्यानंतर सायंकाळी ७ वाजता पुरुषांचा अंतिम सामना सुरू होईल. या सामन्यांचे थेट प्रक्षेपण 'स्टार स्पोर्ट्स नेटवर्क' आणि 'जिओ-हॉटस्टार'वर पाहता येईल.























