Gautam Gambhir On India vs Pakistan: भारताविरुद्ध पाकिस्तानने खेळण्यास दिला नकार; गौतम गंभीरला प्रश्न विचारताच काय केलं?, VIDEO
Gautam Gambhir On India vs Pakistan: पाकिस्तानने भारताविरुद्धच्या आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेतील आपल्या बहुप्रतीक्षित ग्रुप लीग सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय अधिकृतपणे जाहीर केला.

Gautam Gambhir On India vs Pakistan: पाकिस्तानने भारताविरुद्धच्या आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेतील (T20 World Cup 2026) आपल्या बहुप्रतीक्षित ग्रुप लीग सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय अधिकृतपणे जाहीर केला. मात्र, पाकिस्तान सरकारने 7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेतील उर्वरित सामन्यांमध्ये राष्ट्रीय संघाच्या सहभागाला हिरवा कंदील दाखवला आहे. या निर्णयाचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाकिस्तान सरकारच्या अधिकृत निवेदनातून समोर आलेला हा निर्णय बांगलादेशला स्पर्धेतून वगळल्याच्या निषेधार्थ केलेला एक राजकीय विरोध मानला जात आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आपले सामने भारतातून श्रीलंकेत हलवण्याची बांगलादेशची विनंती आयसीसीने फेटाळून लावली होती. दरम्यान, पाकिस्तानच्या या निर्णयावर आयसीसीकडून कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.
भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) 15 फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये 2026 च्या टी-20 विश्वचषकात एकमेकांसमोर येणार आहेत. मात्र 15 फेब्रुवारीला भारतविरुद्ध सामना न खेळण्याचा निर्णय पाकिस्तानने जाहीर केला आहे. याबाबत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता, परंतु गंभीर यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. गौतम गंभीर टी-20 विश्वचषकासाठी मुंबईला रवाना होण्यापूर्वी दिल्ली विमानतळावर दिसला. यावेळी माध्यमांनी गौतम गंभीरला स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. गौतम गंभीर यांनी सर्वांचे आभार मानले. यानंतर भारतविरुद्ध खेळण्यास पाकिस्तानने नकार दिल्याचं माध्यमांनी विचारले, यावर गौतम गंभीरने दुर्लक्ष केले आणि पुढे निघून गेला. (Gautam Gambhir On India vs Pakistan)
#WATCH | Delhi: Indian Cricket Team Head Coach Gautam Gambhir leaves for Mumbai. pic.twitter.com/6fBlclolVO
— ANI (@ANI) February 3, 2026
भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सराव सामना- (India vs South Africa Match)
भारतीय संघ 2026 च्या टी-20 विश्वचषक सुरू होण्यापूर्वी एक सराव सामना खेळेल. हा सामना मुंबईत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला जाईल. भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवून शेवटचा टी-20 विश्वचषक जिंकला होता. आजपर्यंत कोणत्याही संघाने सलग दोनदा टी-20 विश्वचषक जिंकलेला नाही. भारतीय संघाला ही कामगिरी करण्याची संधी आहे. गेल्या टी-20 विश्वचषकापासून संघाने त्यांच्या सर्व टी-20 मालिका जिंकल्या आहेत.
7 फेब्रुवारीपासून रंगणार टी-20 विश्वचषकाचा थरार- (T20 World Cup 2026)
टी-20 विश्वचषकाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 7 फेब्रुवारीला एकूण 3 सामने खेळवले जाणार आहेत. पहिला सामना पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यात, दुसरा स्कॉकटलंड यांच्यात आणि तिसरा भारत आणि अमेरिका यांच्यात होईल. स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना 4 मार्च रोजी कोलकाता किंवा कोलंबो येथे होईल. दुसरा उपांत्य फेरीचा सामना 5 मार्च रोजी मुंबईत होईल. अंतिम सामना 8 मार्च रोजी अहमदाबाद किंवा कोलंबो येथे होईल. भारत आणि पाकिस्तानला एकाच गटात ठेवण्यात आले आहे. दोघांमधील पहिली लढत 15 फेब्रुवारी रोजी होईल. विश्वचषकात खेळणारे सर्व 20 संघांना 4 गटात विभागण्यात आले आहे. प्रत्येक गटात 5 संघ असतील.
संबंधित बातमी:




















