Test Cricket: कसोटीमध्ये 100 सामने गमावणारा बांगलादेश नववा संघ, इंग्लंड पहिला; भारताचा क्रमांक कितवा?
वेस्ट इंडीज आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना सेंट लूसिया येथे खेळण्यात आला. या सामन्यात वेस्ट इंडीजनं बांगलादेशला 10 विकेट्सनं पराभूत करत मालिका 2-0 नं जिंकली.

Test Cricket: वेस्ट इंडीज आणि बांगलादेश (West Indies vs Bangladesh) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना सेंट लूसिया येथे खेळण्यात आला. या सामन्यात वेस्ट इंडीजच्या संघानं बांगलादेशला 10 विकेट्सनं पराभूत करत मालिका 2-0 नं जिंकली. या पराभवानंतर बांगलादेशच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झालीय. कसोटी क्रिकेटमध्ये 100 सामने गमावणारा बांगलादेश नववा संघ ठरलाय.
भारताविरुद्ध 2000 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण
भारताविरुद्ध 2000 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणार्या बांगलादेशनं आतापर्यंत एकूण 134 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांना केवळ 16 सामने जिंकता आले आहेत, तर 100 सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्या संघाने किती सामने गमावले आहेत? यावर एक नजर टाकुयात.
कसोटी क्रिकेटमध्ये 100 किंवा त्याहून अधिक सामने गमावणारे संघ-
| क्रमांक | संघ | पराभव |
| 1 | इंग्लंड | 316 |
| 2 | ऑस्ट्रेलिया | 226 |
| 3 | वेस्ट इंडीज | 204 |
| 4 | न्यूझीलंड | 181 |
| 5 | भारत | 173 |
| 6 | दक्षिण आफ्रिका | 154 |
| 7 | पाकिस्तान | 135 |
| 8 | श्रीलंका | 115 |
| 9 | बांगलादेश | 100 |
वेस्ट इंडीजचा 10 विकेट्सनं विजय
या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा पहिला डाव 234 धावांत गुंडाळल्यानंतर वेस्ट इंडिजने 408 धावांची मजल मारली. यजमान पहिल्या डावात 174 धावांनी पुढे होते. बांगलादेशचा संघ दुसऱ्या डावात 186 धावांत गारद झाला. त्यानंतर फक्त 13 धावांचं लक्ष्य मिळालेल्या वेस्ट इंडीजच्या संघानं 10 विकेट्सनं हा सामना जिंकला. वेस्ट इंडीजच्या विजयात कायल मेयर्सनं मोलाचा वाटा उचलला. त्यानं वेस्ट इंडीजच्या पहिल्या डावात 146 धावांची खेळी केली. एवढेच नव्हे तर, या मालिकेत उत्कृष्ट प्रदर्शन केल्यामुळं त्याला मालिकावीर म्हणूनही सन्मानित करण्यात आलंय.
हे देखील वाचा-




















