Suryakumar Yadav : आयसीसीकडून सूर्यकुमार यादवला वॉर्निंग? सूर्या नेमकं काय चुकीचं बोललेला? PCB च्या तक्रारीवर सुनावणी पूर्ण, निर्णय कधी?
ICC on Suryakumar Yadav : भारताचा कॅप्टन सूर्यकुमार यादव याच्या 14 सप्टेंबरच्या वक्तव्यावर आयसीसीसमोर सुनावणी पार पडली. या सुनावणीचा अंतिम निर्णय जाहीर झालेला नाही.

नवी दिल्ली : आशिया चषक (Asia Cup 2025) सध्या विविध कारणांमुळं चर्चेत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) पहिल्यांदा 14 सप्टेंबरला ग्रुप स्टेजमधील मॅचच्या निमित्तानं आमने सामने आले. या मॅचमध्ये भारताचा कॅप्टन सूर्यकुमार यादवनं (Suryakumar Yadav) पाकिस्तानचा कॅप्टन सलमान आगा सोबत हस्तांदोलन केलं नाही. यानंतर मॅच संपल्यानंतर देखील भारतीय खेळाडूंनी हस्तांदोलन टाळलं. यानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटशनध्ये सूर्यकुमार यादवनं पाकिस्तानवर मिळवलेला विजय पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या भारतीयांना समर्पित केला होता. सूर्यकुमार यादवच्या या वक्तव्याची तक्रार पीसीबीनं आयसीसीकडे करत कारवाईची मागणी केली होती. बीसीसीआयनं देखील साहिबजादा फरहान आणि हॅरिस राऊफ या दोघांची आयसीसीकडे तक्रार केली आहे. आयसीसी त्यावर उद्या सुनावणी करणार आहे. सूर्यकुमार यादवची सुनावणी आज पार पडली असून त्याला इशारा देण्यात आला असून अद्याप अंतिम निर्णय जाहीर झालेला नाही.
ICC Warning to Suryakumar Yadav : आयसीसीची सूर्याला वॉर्निंग?
सूर्यकुमार यादव विरोधात पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं तक्रार केली होती. या प्रकरणी मॅच रेफरी आणि माजी क्रिकेटपटू रिची रिचर्डसन यांनी या प्रकरणी सुनावणी घेतली. सूर्यकुमार यादवचं ते वक्तव्य आयसीसीला राजकारणातून प्रेरित आणि खेळाच्या प्रतिमेचं नुकसान करणारं असल्याचं आयसीसीला वाटत आहे. आयसीसीनं सूर्यकुमार यादवला त्या वक्तव्याप्रकरणी अधिकृतपणे वॉर्निंग देण्यात आली आहे,अशी माहिती आहे. सूर्यकुमार यादवचा डिमेरिट पॉईंट कपात केला जाऊ शकतो. याशिवाय त्याच्या मॅच फीच्या 15 टक्के रक्कम दंड म्हणून वसूल केली जाऊ शकते.
डिमेरिट पॉईंट कपातीचा अर्थ आयसीसीच्या आचारसंहितेनुसार लेवल-1 चा गुन्हा ठरतो. एक डिमेरिट पॉईंटमुळं बंदी घातली जात नाही. मात्र, त्याची पुनरावृत्ती झाल्यास बंदी घातली जाते.डिमेरिट पॉईंट 4-7 दरम्यान असतात.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं सूर्यकुमार यादवचं वक्तव्य राजकारणापासून प्रेरित असल्याचा आरोप केला होता. सूर्यकुमार यादवनं आयसीसीच्या आचारसंहितेचं उल्लंघन केल्याची तक्रार पीसीबीनं केली होती.
सूर्यकुमार यादव काय म्हणालेला?
भारतानं पाकिस्तानवर 14 सप्टेंबरला विजय मिळल्यानंतर सूर्यकुमार यादवनं पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये पहलागम दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली होती. सूर्यकुमार यादव म्हणालेला की ,"मला काही सांगायचं आहे आणि त्यासाठी हे ठिकाण अधिक योग्य आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या भारतीयांना भावपूर्ण श्रद्धांजली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबांसोबत आम्ही ठामपणे उभे आहोत. हा विजय आम्ही आपल्या शूरवीर सैन्यदलाला समर्पित करू इच्छितो, ज्यांनी अतुलनीय शौर्य दाखवले. ते आम्हाला सतत प्रेरणा देत राहोत आणि आम्हालाही संधी मिळाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटवण्यासाठी आणखी कारण देता यावं, अशी आम्ही आशा करतो".
























