गोगावले शेठ, आमच्या तळवटाचे पैसेसुद्धा निघत नाहीत; बार्शीत शेतकऱ्यांनी अडवला मंत्र्यांचा ताफा, गाडीलाच आडवे
गोगावले शेठ आमच्या इथे तळवटाचे पैसे सुद्धा निघत नाहीत. एकरी 3400 रुपये सरकारची मदत मिळणार आहे, सोयाबिनला 6 हजार रुपये भाव आहे, तुम्ही शेतकऱ्यांची टिंगल लावली काय

सोलापूर : राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह राज्यातील विविध जिल्ह्यात पूरग्रस्त पाहणी दौऱ्यासाठी मंत्री रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सोलापूर आणि लातूर दौरा केल्यानंतर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. तर दुसरीकडे सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि शिवसेना मंत्री भरत गोगावले (Bharat gogawale) यांनी आज बार्शी तालुक्यातील अतिवृष्टीची (Rain) पाहणी केली. दरम्यान, बार्शी (barshi) तालुक्यात संतप्त शेतकऱ्यांनी भरत गोगावले यांचा ताफा अडवत सरकारच्या मदतीवर तिखट शब्दात नाराजी व्यक्त केली. भरतशेठ, तुम्ही शेतकऱ्यांची टिंगल लावलीय का, असा सवाल विचारत शेतकऱ्यांनी आपला राग व्यक्त केला.
राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 2215 कोटींची मदत जाहीर केली असून ती मदत तुटपूंजी असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तसेच, विरोधी पक्षातील नेतेही हेक्टरी 30 हजार ते 50 हजार रुपयांची मागणी करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर बार्शीतील शेतकऱ्यांनीही सरकारची मदत नगण्य असल्याचं म्हटलं. गोगावले शेठ आमच्या इथे तळवटाचे पैसे सुद्धा निघत नाहीत. एकरी 3400 रुपये सरकारची मदत मिळणार आहे, सोयाबिनला 6 हजार रुपये भाव आहे, तुम्ही शेतकऱ्यांची टिंगल लावली काय, अशा शब्दात बार्शी तालुक्यातील कारी गावच्या शेतकऱ्याने मंत्री भरत गोगावले यांचा ताफा अडवत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. तसेच, सरकारने 50 हजार रुपये हेक्टरची घोषणा करावी, अशी मागणी देखील केली. यावेळी, माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी बाहेर येऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. तसेच, भरत गोगावले यांनीही गाडीतून बाहेर येऊन संबंधित शेतकऱ्यांसोबत चर्चा केली, त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. निवडणुका झाल्या की तुम्ही आर्थिक मदत आणि विम्याच्या निकषातही बदल केले, असे म्हणत फुकटातील, 1 रुपयातील विमा बंद केल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचेही संतप्त शेतकऱ्यांनी म्हटलं.
बार्शी तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला असून 76 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये, मुख्यत्वे सोयाबिन पिकासह फळबागांही भुईसपाट झाल्याने बळीराजा मोठ्या संकटात आहे. एकीकडे वावरात पाणी, तर दुसरीकडे शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी दिसतंय. भरत गोगावले यांचा ताफा अडवलेल्या कारी गावात अनेक शेतकऱ्यांच्या फळबागा असून द्राक्षांच्या बागाही पाण्यात गेल्या आहेत. त्यामुळे, येथील शेतकरी संतप्त झाल्याचं दिसून आलं.
सरासरीपेक्षा अधिक पाऊस (Heavy rain barshi)
यंदा बार्शी तालुक्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच पावसाळा सुरू झाला. मे महिन्यातच विक्रमी 12 पट पाऊस पडला. यंदाच्या पावसाळ्यात तालुक्यात आतापर्यंत सरासरीच्या दुप्पट पाऊस पडला आहे. सप्टेंबरपर्यत तालुक्याची पावसाची सरासरी 549 किलोमीटर आहे. मात्र, प्रत्यक्षात 980 मिलिमीटर पावसाची नोंद तालुक्यात झाली आहे. या सततच्या पावसामुळे तालुक्यातील सर्व नद्यांना पूर आले असून 35 गावांतील नागरिकांना या महापुराचा फटका बसला आहे. भोगावती, नागझरी, नीलकंठा, रामनदी, चांदणी या प्रमुख नद्यांसह घोरवड्याच्या काठच्या लोकांचे नुकसान झाले आहे.
76 हजार हेक्टर पिकांचे नुकसान (barshi flood )
नदीकाठच्या येळंब, पिंपरी साकत, धस पिंपळगाव, भोईजे, मुंगशी, बोरगाव, जोतिबाचीवाडी, काळेगाव, पिंपळगाव पान, मालवंडी, गौडगाव, यावली, खडकलगाव, कासारी, तडवळे, इर्ले, मांडेगाव, बेलगांव, बाभूळगाव, भानसळे, सारोळे, घारी, कुसलंब, रस्तापूर, जामगाव, श्रीपत पिंपरी, कांदलगाव, देवगाव, उपले दुमाला, सर्जापूर, उंबर्गे, सौंदरे ढोराळे, उक्कडगाव या गावातील घरांची पडझड झाली. बार्शी तालुक्यातील एकूण 138 गावांमधील 22 लहान व मोठी 18 अशी 40 जनावरे पाण्यात वाहून जाऊन मृत झाली आहेत. 18 हजार कोंबड्या यामध्ये मृत पावल्या. 155 घरांची अंशतः पडझड झाली असून तालुक्यातील 78 हजार 722 शेतकऱ्यांचे 75 हजार 874 हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असल्याचे तहसीलदार एफ. आर. शेख यांनी सांगितले.
हेही वाचा
MPSC पूर्व परीक्षा पुढे ढकला, सध्या विद्यार्थ्यांची मानसिकता नाही; जयंत पाटलांची सरकारकडे मोठी मागणी
























