राज्यात 12 वी परीक्षेला 15,05,037 विद्यार्थी, 271 भरारी पथके; 'कॉपीमुक्ती'ची कडक अंमलबजावणी
विज्ञान शाखेला 68 हजार 967 विद्यार्थी, कला शाखेला तीन लाख 80 हजार 410 विद्यार्थी, वाणिज्य शाखेला तीन लाख 19 हजार 439 विद्यार्थी तर किमान कौशल्य आधारित अभ्यासक्रम 31 हजार 735 विद्यार्थी आहेत.

मुंबई : जानेवारी महिना संपताच विद्यार्थ्यांना ओढ लागलेली असते ती 12 वीच्या परीक्षेची (Exam). विद्यार्थ्यांकडून 12 वीच्या परीक्षेची तयारी देखील जोमाने सुरू असते, आता उद्यापासून बारावीची परीक्षा (HSC exam) सुरू होत असून 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2015 कालावधीत होणार बारावीची परीक्षा होत आहे. यंदाच्या वर्षी परीक्षेत एकूण 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यामध्ये 8 लाख 10 हजार 348 मुले, तर 6 लाख 94 हजार 652 मुली आहेत. यंदा 37 तृतीयपंथी नागरिकही परीक्षेसाठी बसले आहेत. राज्यात एकूण 10 हजार 550 कनिष्ठ महाविद्यालयातील या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांसाठी 3 हजार 373 मुख्य केंद्रावर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.
विज्ञान शाखेला 68 हजार 967 विद्यार्थी, कला शाखेला तीन लाख 80 हजार 410 विद्यार्थी, वाणिज्य शाखेला तीन लाख 19 हजार 439 विद्यार्थी तर किमान कौशल्य आधारित अभ्यासक्रम 31 हजार 735 विद्यार्थी आहेत. टेक्निकल सायन्स 4 हजार 486 असे एकूण 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थी यंदा परीक्षा देणार आहेत. पुणे, नागपूर, संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळात ही परीक्षा होणार आहे. महाराष्ट्राचे माध्यमिक उच्च माध्यमिक नव विभागीय मंडळात ही परीक्षा होणार असून नव विभागीय मंडळात नियंत्रण कक्ष कार्यरत करून हेल्पलाइन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी-मार्च 2025 परीक्षेमध्ये वेळेनंतर दहा मिनिटे वेळ वाढवून देण्यात आलेला आहे. दहावी बारावीच्या परीक्षांमध्ये ज्या परीक्षा केंद्रावर गैरमार्गाचे प्रकरणी आढळून येतील त्या केंद्राची परीक्षा केंद्र मान्यता पुढील वर्षापासून कायमची रद्द करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल, असेही सांगण्यात येत आहे. कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी मंडळांनी अर्ध शासकीय पत्राद्वारे आव्हान केलेले आहेत.
राज्यात 271 भरारी पथके
परीक्षा काळात संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा या दृष्टीने मंडळामार्फत संपूर्ण राज्यात 271 भरारी पथके नेमण्यात आले आहेत. याशिवाय दक्षता समिती कार्यरत असून विभागीय मंडळात विशेष भरारी पदके स्थापन करण्यात आले आहेत. मंडळाने निर्धारित केलेल्या कालावधीत विद्यार्थी, वैद्यकीय कारणास्तव प्रत्यक्ष तोंडी परीक्षा प्रकल्प व इतर परीक्षा देऊ न शकल्यास अशा विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेनंतर 12,15,17 मार्च रोजी आऊट ऑफ टर्न आयोजित करण्यात आलेले आहे. राज्यात मागील 9 परीक्षा विभागीय मंडळात एकूण 3 हजार 376 केंद्र आहेत, त्यातील 818 केंद्रावरील केंद्र संचालक बदलले गेले आहेत.
शिक्षणमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
आपल्या शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे इयत्ता बारावीची परीक्षा. 11 फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी राज्यभरातील 15,05,037 विद्यार्थी 3,373 केंद्रांवर परीक्षेला सामोरे जाणार आहेत. शासन, प्रशासन,पालक, शिक्षक आणि संपूर्ण समाज तुमच्या पाठीशी आहे. त्यामुळे कोणताही तणाव न घेता, सर्वतोपरी प्रयत्न करून उत्तम कामगिरी करा, अशा शब्दात शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

