गौतमी पाटीलवर कारवाई करता येणार नाही; मंत्री चंद्रकांत पाटलांच्या फोननंतर पोलीस उपायुक्तांनी सांगितलं कारण
Gautami Patil: गौतमी पाटील हिच्या गाडीने झालेल्या अपघात प्रकरणात रिक्षा चालकांच्या कुटुंबीयांनी केलेले आरोप पुणे पोलिसांनी फेटाळले आहेत. अपघातावेळी गौतमी पाटील या गाडीत होती की नाही याचा तपास सुरू आहे.

पुणे : शहरातील वडगाव बुद्रुक परिसरातील एका रिक्षाला कारने धडकेत रिक्षाचालक गंभीर जखमी झाल्याने त्यांनी थेट कोथरुडचे (Pune) आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली होती. विशेष म्हणजे ज्या कारने रिक्षाला धडक दिली ती कार नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या नावावर असल्याने पोलिसांनी गौतमी पाटीला या अपघातप्रकरणी नोटीस बजावली आहे. या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी असून सामाजी विठ्ठल मरगळे असे त्याचे नाव आहे. तर दुसरीकडे याच मुद्द्यावर कोथरूडचे आमदार असलेल्या चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil Call to DCP) यांनी थेट डीसीपी संभाजी कदम यांना फोन लावत दोषींवर कडक कारवाई करण्याची निर्देश दिले आहेत. आता, पोलीस उपायुक्त संभाजी कदम (Police) यांनी गौतमी पाटीलवर कुठलाही कारवाई करता येणार नसल्याचे म्हटले. त्यासाठी, त्यांनी कायदेशीर बाजूही सांगितली.
गौतमी पाटील हिच्या गाडीने झालेल्या अपघात प्रकरणात रिक्षा चालकांच्या कुटुंबीयांनी केलेले आरोप पुणे पोलिसांनी फेटाळले आहेत. अपघातावेळी गौतमी पाटील या गाडीत होती की नाही याचा तपास सुरू आहे, पण चालकावर कारवाई केली आहे, अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली. कायद्यानुसार अपघातात को-पॅसेंजरवर कारवाई केली जात नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळे, गौतमी पाटीलवर कोणतीही कारवाई करता येणार नाही. गौतमी पाटील हिने गाडीचे संपूर्ण कागदपत्रं पोलिसांकडे सादर केले आहेत. तसेच, गरज भासल्यास गौतमी पाटीलला चौकशीसाठी बोलवलं जाईल. मात्र, गौतमीला सध्या तरी चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं नाही. गौतमी पाटील गाडीत होती की नाही याबाबतचं कोणतंही स्पष्टीकरण अजून समोर आलेले नाही. संपूर्ण प्रकरणाचा तपास पारदर्शकपणे सुरू असल्याचे पुणे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.
नेमकं अपघात प्रकरण काय? (Gautami patil car accident)
पुण्यातील मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ 30 सप्टेंबर रोजी एका हॉटेलसमोर एक रिक्षा उभी होती. त्यात रिक्षाचालकासह दोन प्रवासी होते. मागून आलेल्या गौतमी पाटीलच्या भरधाव कारनं उभ्या असलेल्या रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की, यामध्ये रिक्षाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या अपघातात रिक्षाचालकासोबतच रिक्षातील दोन प्रवासीही गंभीर जखमी झाले. पोलिसांना अपघाताबाबत माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, अपघातानंतर कारचालक फरार झाला होता. मात्र, सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी 30 वर्षीय वाहन चालकाला अटक केली आहे.
गौतमी पाटीलवर अपघातग्रस्तांचा आरोप (Gautami patil)
गौतमी पाटील हिच्या कार चालकाची चूक असताना हा अपघात झाला. मात्र या संपूर्ण प्रकरणाची गौतमी पाटीलच्या टीमकडून दखल घेण्यात आली नाही. तसेच पोलिसांकडून सीसीटीव्ही उपलब्ध होत नाही, पोलीस योग्य ते सहकार्य करत नाहीत असा आरोप आता रिक्षाचालक मरगळे यांच्या कुटुंबीयांनी केलाय.























