Anna Bansode: पान टपरी ते विधानसभा उपाध्यक्ष प्रवास दादांमुळेच झाला, अजित पवारांसोबत कायम सोबत असणाऱ्या अण्णा बनसोडेंना अश्रू अनावर, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरही बोलले
Anna Bansode: पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष पवार कुटुंबातील असावा, त्याच्या नेतृत्वात मला यापुढं काम करण्याची इच्छा आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येण्याची निर्णय पवार कुटुंबीयांनी घ्यावा, अशी ही इच्छा बनसोडेंनी व्यक्त केली.

पिंपरी चिंचवड: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या प्रत्येक कठीण काळात त्यांच्या सोबत राहिलेले विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंना (Anna Bansode) अश्रू अनावर झाले. पान टपरी चालवणाऱ्या माझ्या सारख्या सामान्य माणसाला अजित दादांनी विधानसभा उपाध्यक्ष केलं. हे सांगताना बनसोडेंना (Anna Bansode) गहिवरून आलं. आता अजित दादांच्या पश्चात सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री करावं, राजकीय वारसदार कोण? हे पवार कुटुंबीय ठरवतील, असं बनसोडे म्हणालेत. तर पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष पवार कुटुंबातील असावा, त्याच्या नेतृत्वात मला यापुढं काम करण्याची इच्छा आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येण्याची निर्णय पवार कुटुंबीयांनी घ्यावा, अशी ही इच्छा बनसोडेंनी व्यक्त केली.(Anna Bansode)
नेमकं काय म्हणाले अण्णा बनसोडे?
आज अजित पवार आपल्या सोबत नाहीत हे मानायला आमचं मन तयार नाही. गेल्या तीन दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्र हळहळ करत आहे, आज राजकारणामध्ये स्पष्ट बोलणं एखादं काम होणार असेल तर होणार म्हणून सांगणारा आणि नसेल होणार तर नाही असे स्पष्टपणे सांगणारा, आणि सदैव कामासाठी धडपड करणाऱ्या हा महाराष्ट्रातील दांडगा नेता हरपल्याचा मला मनापासून दुःख होत आहे. अजित दादांच्या बाबतीत सांगायचं झालं तर, खुप आठवणी आहेत, मी गेली 27 वर्ष अजित दादांसोबत काम करत आहे, आज माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला इतकं मोठं पद दिलं, मी ते आयुष्यात विसरू शकत नाही, संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आज मी पानटपरी चालवणारा माणूस मला महाराष्ट्राचं उपाध्यक्षपद कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा असलेल्या पद त्यांनी मला दिलं, हे सगळं मी कदापि विसरू शकणार नाही, असंही बनसोडे बोलताना म्हणाले.
माझं वैयक्तिक मत आहे, सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री पद देण्यात यावं, आणि राजकीय वारस ठरवण्याचा अधिकार हा पवार कुटुंबीयांना आहे. त्यांच्यामध्ये जो निर्णय होईल तो निर्णय माझ्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना मान्य असेल, ज्या पद्धतीने दादांनी महाराष्ट्रात काम केलं त्याच पद्धतीने वहिनी देखील काम करतील असा माझा विश्वास आहे, त्यामुळे माझ्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे की सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री पद देण्यात याव, दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याबद्दलचा निर्णय पवार कुटुंबीय घेतील. जी घटना घडली ती फारच दुर्दैवी आहे. या घटनेला फक्त दोन दिवस झाले, पवार कुटुंबीय पुढे जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य असेल. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावे असे मी मागेही बोललो होतो, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावी अशी माझी इच्छा आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा जो निर्णय आहे तो पक्षाच्या बैठकीमध्ये एकमताने मंजूर होईल आणि त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असं मला वाटतं, आमची मनापासून अशी इच्छा आहे की पवार कुटुंबातीलच कोणीतरी राष्ट्रीय अध्यक्ष झाला पाहिजे अशी माझी इच्छा आहे, असंही बनसोडे यावेळी म्हणालेत.






















