Pimpri Chinchwad Crime : भिशीच्या पैशांवरुन वाद विकोपाला गेला आणि गाडीतच गोळीबार केला, पिंपरीतील खून प्रकरणात दोघे अटकेत
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये भरदिवसा अन् रहदारीच्या रस्त्यावर झालेल्या हत्याकांड प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. भिशीच्या पैशांवरुन वाद झाले आणि त्याचे पडसाद हत्येत उमटले.
![Pimpri Chinchwad Crime : भिशीच्या पैशांवरुन वाद विकोपाला गेला आणि गाडीतच गोळीबार केला, पिंपरीतील खून प्रकरणात दोघे अटकेत Pimpri Chinchwad Crime News Argument over money escalated two arrested for killing Sagar Shinde Pimpri Chinchwad Crime : भिशीच्या पैशांवरुन वाद विकोपाला गेला आणि गाडीतच गोळीबार केला, पिंपरीतील खून प्रकरणात दोघे अटकेत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/24/6573aeaaf63301f42a2b0d1ae77eb0b0169284268142783_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये भरदिवसा अन् रहदारीच्या रस्त्यावर झालेल्या हत्याकांड (Murder) प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. सागर शिंदे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर योगेश जगताप आणि हृषिकेश खरात अशी अटकेतील दोघांची नावं आहेत. मृत सागर शिंदे आणि दोघे मारेकरी एकाच वाहनातून जात असताना त्यांच्यात भिशीच्या (Bhishi) पैशांवरुन वाद झाले आणि त्याचे पडसाद हत्येत उमटले.
गोळीबारानंतर वाहनाची इतर गाड्यांना धडक
पिंपरी चिंचवडमध्ये काल (23 ऑगस्ट) भरदिवसा सागर शिंदेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. फिल्मी स्टाईलने घडलेल्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. सायंकाळी पाच वाजता औंध-रावेत बीआरटी मार्गावरील रक्षक चौकालगत ही धक्कादायक घटना घडली. गोळीबार झाल्यानंतर त्याच वाहनाने काही गाड्यांना धडकही दिली. दिवसा घडलेल्या घटनेने मार्गावरुन प्रवास करणारे नागरिक भयभीत झाले. गोळीबाराचा आवाज आल्याने नागरिकांना तिथून काढता पाय घेणं पसंत केलं.
या घटनेची सांगवी पोलिसात नोंद करण्यात आली. पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरु केला. तपासादरम्यान योगेश जगताप आणि हृषिकेश खरात यांना अटक करण्यात आली. सागर शिंदे याच्या बंदुकीनेच त्याची हत्या करण्यात आल्याची कबुली या दोघांनी दिली.
बंदूक हिसकावली आणि पाठीमागून सागरवर गोळी झाडली
सागर शिंदे हा 2013 साली हत्येच्या गुन्हेत अटकेत होता. तर 2018 साली तो तुरुंगात बाहेर आला, त्यानंतर तो पेपर आणि दूध विक्री व्यवसाय करायचा. तर योगेश आणि हृषिकेश हे सलून आणि रिक्षा चालवतात. प्रत्येक महिन्याला दीड लाखांच्या भिशीचं वाटप होतं, यावेळी नंबर कोणाला द्यायचा यावरुन त्यांची चर्चा सुरु होती. तिघेही चतु:शृंगी मंदिर परिसरातून काळेवाडीकडे निघाले होते. हृषिकेश गाडी चालवत होता, सागर पुढे डावीकडे तर योगेश मागे बसला होता. यावेळी भिशीच्या वाटपावरुन वाद विकोपाला गेला. चालत्या गाडीतच सागरने बंदूक बाहेर काढली अन् धमकवायला सुरुवात केली. त्यावेळी योगेशने बंदूक हिसकावली अन् पाठीमागून सागरवर गोळी झाडली. त्यानंतर सागर गाडीचे दार उघडून धावू लागला मग योगेशने दुसरी गोळी झाडली. यात सागरचा जागीच मृत्यू झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सागरला तिथेच सोडून योगेश आणि हृषिकेश पसार झाले. त्यानंतर दोन तासांतच गुंडा विरोधी पथकाने या दोघांना बेड्या ठोकल्या.
हेही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)