Supriya Sule : महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी आमचे खासदार पीएम मोदींना भेटणार, सुप्रिया सुळेंनी कारण सांगितलं; FCRA आणि डिलिमिटेशन विधेयकाबाबत राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट
Supriya Sule : सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे 8 खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना येत्या सोमवारी भेटण्याचं कारण सांगितलं.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेण्याचं कारण सांगितलं. याशिवाय केंद्र सरकार आणत असलेल्या एफसीआरएला दुरुस्ती विधेयकाला विरोध राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मतदारसंघ फेररचना विधेयक आलेलं नाही, असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पीएम मोदींना का भेटणार?
एक दोन खासदारांची भूमिका होती की महाराष्ट्राचे गंभीर प्रश्न आहेत. दुर्दैवानं संसद चालत नाही. त्यामुळं माननीय पंतप्रधानांना जी परिस्थिती महाराष्ट्रात आहे ज्यात पाण्याचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील. सातत्यानं शहरीकरणात होणारे मोठे प्रश्न आहेत. सगळ्या खासदारांना ५ कोटी रुपयांचा विकासनिधी मिळतो, त्याच्या अंमलबजावणीला आव्हानं येतात. महाराष्ट्र सरकारकडून अपेक्षित मदत खासदारांना मिळत नाहीत,असे प्रश्न जे विकासाच्या चौकटीतील आहेत, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. आपण हे सगळे प्रश्न घेऊन पंतप्रधानांकडे जाऊ या का या भूमिकेतून आठ खासदारांनी मोदींकडे वेळ मागितली होती. आमच्या आठ खासदारांना पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी सकाळी 11 वाजता संसदेतील कार्यालयात भेटीची वेळ दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या खासदारांना नाश्त्याला बोलावलं होतं, आम्हाला नाश्त्याला बोलावलं नाही, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.
FCRA ला विरोध
एफसीआरएचं बिल आताच्या ज्या स्वरुपात आहे त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा विरोध आहे, असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं. जर विधेयक आलं आणि सरकार चर्चेला बसलं, त्यानंतर ते जेपीसीकडे पाठवलं तर आमची चर्चा करण्याची तयारी आहे. एफसीआरए बिल परत घ्यावं किंवा मागं घ्यायचं नसेल तर ते जेपीसीकडे पाठवावं, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.
जंतरमंतर आणि नीट बाबत चर्चा झाली होती तेव्हा याबाबत एसआयटी नेमून नेमकं काय झालं ते भारत सरकार आणि प्रत्येक भारतीयाला कळलं पाहिजे की पॅलेट गनचा वापर कसा झाला, संसदेत टिअर गॅसचा आवाज ऐकायला येत होता. पार्लमेंटची दारं बंद झाली होती, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.
डिलिमिटेशनचं बिल आलेलंच नाही, त्यावर कसं भाष्य करणार असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलं. या सगळ्या बिलांची चर्चा इंडिया आघाडी बैठक दररोज सकाळी 10 वाजता खर्गे यांच्या नेतृत्त्वात होते. डिलिमिटेशनचं बिल आलेलं नाही तोपर्यंत त्यावर कसं भाष्य करणार, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. बिल आल्यावर काँग्रेस, सपा, शिवसेना, टीएमसी, यांच्यासोबत चर्चा करुन पुढील दिशा ठरवू, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.























