जिन्नांचा आत्मा तुमच्यात बसलाय, संजय राऊतांचा हल्लाबोल, म्हणाले हिंदुत्वाच्या नव्या मुल्लांनी मला शिकवू नये
Sanjay Raut on Waqf bill : मुसलमानांची इतकी काळजी तर पाकिस्तानच्या मोहम्मद अली जिन्नांनाही नव्हती. जिन्नांचा आत्मा उठून तुमच्यात बसला आहे का? असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला.

नवी दिल्ली : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यसभेत वक्फ विधेयकावर चर्चा सुरू असताना सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली. केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संजय राऊत म्हणाले, "तुम्ही (भाजप) खुश दिसत आहात, पण मुसलमानांची इतकी काळजी तर पाकिस्तानच्या मोहम्मद अली जिन्नांनाही नव्हती. जिन्नांचा आत्मा उठून तुमच्यात बसला आहे का?" त्यांच्या या टीकेमुळे सभागृहात गोंधळ उडाला.
तुम्ही स्वतःच हिंदुत्वाचे नवीन मुल्ला बनले
सत्ताधाऱ्यांनी हिंदुत्वाचा नारा दिला असला तरी आता तेच वक्फ बोर्डासंदर्भात मुसलमानांसाठी विशेष काळजी घेत आहेत, असा आरोप करत राऊत म्हणाले, "मला वाटायचं आम्ही हिंदुराष्ट्र बनवणार आहोत, पण आता गरीब मुसलमानांची काळजी घेण्याचा नवा अजेंडा सुरू आहे. एकेकाळी तुम्ही मंगळसूत्र, गाय-बैल मुसलमानांकडे जातील म्हणून आक्षेप घेत होतात, आता मात्र तुम्ही स्वतःच हिंदुत्वाचे नवीन मुल्ला बनले आहात."
अयोध्येतील जमीन घोटाळ्यावर निशाणा
अयोध्येत मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी-विक्री झाली, त्यावरही राऊत यांनी सवाल उपस्थित केला. "अयोध्येत जमीन घोटाळा झाला आहे. हिंदूंच्या जमिनीची रक्षा करता येत नसेल, तर मुसलमानांची काय करणार? तुमच्या सरकारला जमीन विक्रीच करायची आहे," असे म्हणत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
काश्मिरी पंडितांचा मुद्दा
यावेळी संजय राऊत यांनी काश्मिरी पंडितांचा मुद्दा उपस्थित केला. काश्मीरमधील विस्थापित हिंदूंची समस्या उपस्थित करत ते म्हणाले, "काश्मिरी पंडितांना अद्याप जमीन आणि घरे मिळालेली नाहीत, त्यांची तुम्हाला काहीही चिंता नाही. पण जमिनीचा व्यापार करण्यासाठी तुम्ही विशेष धोरण राबवत आहात."
सरकारवर 'व्यापारी' असल्याचा आरोप
सरकारच्या धोरणांवर टीका करत राऊत म्हणाले, "व्यापारी असेच असतात, गोड-गोड बोलतात आणि नंतर स्वतःचा फायदा पाहतात. तुम्हीही तसेच करत आहात. एकीकडे हिंदुत्वाची भाषा करता, आणि दुसरीकडे मुसलमानांची विशेष काळजी घेताय."
संजय राऊत यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे राज्यसभेत मोठा गोंधळ उडाला. भाजप नेत्यांनीही त्याला प्रत्युत्तर दिले, मात्र राऊत यांनी आपल्या भाषणातून सरकारच्या भूमिकेवर थेट हल्ला चढवला.
Sanjay Raut Speech on Waqf Bill Rajya Sabha Video :
























