Sanjay Raut on Raj Thackeray and Uddhav Thackeray : कदाचित राज ठाकरे-उद्धव ठाकरे फोनवर बोलले असतील; संजय राऊतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण, पडद्यामागे गुप्त घडामोडी?
Sanjay Raut on Raj Thackeray and Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांकडे एकमेकांचे नंबर आहेत. त्यामुळे युती करण्याची इच्छा असेल तर दोन भावांनी बोलले पाहिजे, असे अमित ठाकरे यांनी म्हटले होते.

Sanjay Raut on Raj Thackeray and Uddhav Thackeray : गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे एकत्र येण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. यावर बोलताना राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांकडे एकमेकांचे नंबर आहेत. त्यामुळे युती करण्याची इच्छा असेल तर दोन भावांनी बोलले पाहिजे. त्यांनी एकमेकांना फोन करावा. आम्ही बोलून काही फरक पडणार नाही, असे वक्तव्य केले. तर गुरुवारी नाशिकमध्ये ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन झाल्याचे पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
संजय राऊत म्हणाले की, आम्ही सकारात्मक आहोत, म्हणून खाली कार्यकर्त्यांचे मनोमिलन सुरू आहे. नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले आहे. आम्ही सकारात्मक आहोत. माननीय राज ठाकरे सकारात्मक आहेत. त्यांचे सहकारी सकारात्मक आहेत. माननीय उद्धव ठाकरे सकारात्मक आहेत. अत्यंत सकारात्मक असल्यामुळे जमिनीवरच्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन झाले असेल तर त्यात चिंतेचे कारण काय? असे त्यांनी म्हटले.
कदाचित फोन झाले सुद्धा असतील
अमित ठाकरे यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता अमित ठाकरे म्हणाले की, ही जी सगळी मुलं आहेत, त्यांच्या जन्माच्या आधीपासून हे दोन भाऊ आहेत. मी त्या दोघांनाही पाहिले आहे. दहा मिनिटांनी मी राज ठाकरेंना फोन करतोय किंवा उद्धव ठाकरे यांना फोन करतोय, असे सोशल मीडियावर सांगून कोणी एकमेकांना फोन करत नाही. कदाचित फोन झाले सुद्धा असतील, असे त्यांनी म्हटले आहे.
तुम्हाला फळ दिसेल
संजय राऊत पुढे म्हणाले की, मी वारंवार सांगतोय की, तुम्हाला फळ दिसण्याशी मतलब आहे ना. तुम्हाला फळ दिसेल, फळ झाडावर यायला आधी बी लावावे लागते, मग पाणी घालावे लागते, मग रोपट वाढवावं लागतं, मग फांद्या येतात, अशा अनेक प्रक्रियेतून फळ येते. त्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. मला पूर्ण खात्री आहे की, काही दिवसांनी तुम्ही म्हणाल झाडाला खूपच फळं आलेली आहेत. इतक्या लवकर फळं आली कशी? पण फळं येतील, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे.
आमच्यासाठी ते कॅफे नाही तर दुसरे घरच
अमित ठाकरे यांनी तुम्हाला शिवतीर्थ कॅफेटेरियावर येण्याचे आमंत्रण दिले आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, अमित ठाकरे यांना मी त्यांच्या जन्मापासून पाहिलेले आहे. गोड मुलगा आहे तो. जसा आमचा आदित्य आहे तसा अमित आहे. त्याची विधाने देखील फार गोड आहेत. त्याच्या मनामध्ये ज्या भावना आहेत, त्या भावनेचे मी त्याचा काका म्हणून स्वागत करतो. त्यांची विधाने आजकाल फार चांगली आहेत. आदित्य देखील भूमिका फार उत्तम आहे. आता तुम्हाला मनोमिलन म्हणजे अजून काय मनोमिलन हवे आहे? मी कॅफेमध्ये नाही तर मी घरी जाईल. आमच्यासाठी ते कॅफे नाही तर दुसरे घरच आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
आणखी वाचा



















