Manoj Jarange and Dhananjay Munde: धनुभाऊकडून माझ्या अंगावर गाडी घालण्याचा डाव, अजितदादा पापात सहभागी होऊ नका, अन्यथा... मनोज जरांगेंचा इशारा
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांनी माझ्या हत्येचा कट आखल्याचा गंभीर आरोप केला आहे. धनंजय मुंडेंची चौकशी करा, नाहीतर भारी पडेल, असे त्यांनी म्हटले.

Manoj Jarange and Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांनी माझा घातपात करण्यासाठी सुपारी दिली आहे. मी नार्को टेस्टसाठी तयार आहे. माझी आणि धनंजय मुंडे दोघांची नार्को टेस्ट करा. धनंजय मुंडे यांना माझ्या अंगावर गाडी घालायची आहे. त्यांनी मैदानात यावे. मी तयार आहे, असे वक्तव्य मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केले. ते सोमवारी नवी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर गंभीर आरोप केले. धनंजय मुंडे यांना मला ठार मारायचे आहे. पोलिसांच्या ताब्यातील तीन आरोपींनी धनंजय मुंडे यांचे नाव घेतले आहे. तरीही जालना पोलीस आणि गृहमंत्रालयाने धनंजय मुंडे यांना अटक का केली नाही किंवा त्यांची चौकशी का केली नाही, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारला. माझ्या कोर्टात सिध्द झालंय . धन्याने माझी 2.5 कोटींची सुपारी दिली आहे. मी पोलीस बंदोबस्त नाकारला आहे. फडणवीससुध्दा त्याला सांभाळत आहेत. क्रुर माणसाला सांभाळू नका . पहिले देवेंद्र फडणवीस असे नव्हते. हे चांगलं नाही. ते क्रुर माणसांना पाठिंबा देत आहेत. फडणवीस पूर्वीसारखे वागले तर गरिबांना न्याय मिळेल, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
मराठा आरक्षणाच्या नोंदी शोधण्यासाठी स्थापित करण्यात आलेली शिंदे समिती नोंदी शोधत नाही, मग सरकारने ही समिती तयारच कशाला केली? कुणबी नोंदी शोधण्यापासून रोखले जात आहे. मराठवाडा , पश्चिम महाराष्ट्रमध्ये नोंदी शोधल्या जात नाहीत. प्रमाणपत्र दिले जात नाही. काही अधिकारी अडथळा करीत आहेत. तातडीने जीआर प्रमाणे नोंदी सापडल्या आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. सातारा , पुणे , औंध संस्थानचा जीआर तातडीने काढा. अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन उभा करु, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
राज्य सरकारने सारथीच्या योजना थांबवल्या आहेत. मराठा तरुणांना शिष्यवृत्ती मिळत नाही. त्यांची हेळसांड केली जात आहे. सरकारने मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत करावी. त्यांना पिक विमा द्या. मालाला भाव द्या. पाणी द्या. मदत मिळाली नाही तर शेतकऱ्यांनी मतदानातून सरकार पाडावे. भीती निर्माण करा. तर राजकारणी घाबरतील. 2029 च्या निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसणार आहे. कारण घातपात करणाऱ्या लोकांना हे पाठीशी घालत आहेत. भाजपाचे अनेक आमदार मंत्री मला भेटायला येतात. मी करत असलेल्या कामाला पाठिंबा देत आहेत, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला.
आणखी वाचा























