Eknath Shinde Shivsena: प्रताप सरनाईकांवर बॉटल भिरकावली, 50 खोकेच्या घोषणा; त्या घटनेनं शिंदेंच्या आमदारांची धाकधूक वाढली
Eknath Shinde Shivsena: मतदारसंघात कामे जोरदार सुरू आहेत. मात्र भाजपची हिंदीबाबतची भूमिका आणि मराठीच्या मुद्यावरून नागरिकांमध्ये शिंदेंच्या शिवसेनेविषयी नाराजी व्यक्त करत आहेत.

Eknath Shinde Shivsena: मनसे (MNS) आणि शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena Thackeray) विजयी मेळाव्याची शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांनी धास्ती घेतल्याचं सांगण्यात येत आहे. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेने मराठीचा मुद्दा मांडण्यात शिवसेना शिंदे गट मागे पडत असल्याची आमदारांमध्ये कुजबूज सुरु असल्याची सूत्रांची माहिती आहे. अशातच मित्र पक्ष भाजपकडून हिंदीचा मुद्दा उचलून धरत असल्याने मतदारसंघात शिंदेंच्या आमदारांची गोची झालाचे शिवसनेचे आमदार खासगीत बोलत आहेत.
शिंदे गटातील आमदार चिंताग्रस्त-
मतदारसंघात कामे जोरदार सुरू आहेत. मात्र भाजपची हिंदीबाबतची भूमिका आणि मराठीच्या मुद्यावरून नागरिकांमध्ये शिंदेंच्या शिवसेनेविषयी नाराजी व्यक्त करत आहेत. आज प्रताप सरनाईकांना ज्या रोषाला सामोरे जावे लागले, उद्या तिच परिस्थिती आमच्यावर ओढावू शकते, या भितीने शिवसेना आमदार चिंताग्रस्त असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वेळीच ही बाब न सावरल्यास महापालिका निवडणुका असोत किंवा स्थानिक स्वराज्य संस्था, त्यात याचा फटका नक्कीच बसू शकतो, असे आमदार खासगीत बोलत आहेत.
प्रताप सरनाईंकांसोबत काय घडलं?
मराठी एकीकरण समितीकडून मीराभाईंदरमध्ये काल मराठीचा मुद्दा आणि अस्मितेवरुन मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने देखील पाठिंबा दिला होता. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी न दिल्याने आणि अनेक नेत्यांना ताब्यात घेतल्याने राडा पाहायला मिळाला. दरम्यान मोर्चात सहभागी होण्यासाठी आलेल्या प्रताप सरनाईकांना मोठ्या नामुष्कीला तोंड द्यावं लागलं. प्रताप सरनाईकांना मोर्चेकऱ्यांनी अक्षरशः मोर्चातून हुसकावून लावलं, त्यांच्यासमोर पन्नास खोके एकदम ओकेच्या घोषणा दिल्या. मी मराठी अशी डोक्यावर टोपी घालून प्रताप सरनाईक मोर्चात सहभागी झाले. मात्र प्रताप सरनाईक दाखल होताच त्यांच्या दिशेने बॉटलही भिरकावल्याचे पाहायला मिळाले.
मीराभाईंदरमधील मोर्चावर सरनाईक काय म्हणाले?
पोलिसांनी एका पक्षासाठी काम करू नये, मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील बोलणार आहे. मी पोलीस आयुक्तांशी बोलून नाराजी व्यक्त केली आहे, असंही प्रताप सरनाईक म्हणाले. गृहखात्याचे आदेश नव्हते, तरी देखील पोलिसांनी कुणाच्या सांगण्यावरून धरपकड केली, याची माहिती घेत आहोत, असंही प्रताप सरनाईकांनी सांगितले. पोलिसांची भूमिका अत्यंत चुकीची आहे. व्यापाऱ्यांना मोर्चा काढायला परवानगी देता मग मराठी एकीकरण समिती मोर्चा काढत होती. तर तुम्हाला काय अडचण होती? त्यांना मोर्चा का काढू दिला नाही. यामुळे महायुती सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत, असंही प्रताप सरनाईक म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणे आहे. मीरा रोडमध्ये जे सुरुय ते अत्यंत चुकीचं आहे, असं थेट प्रताप सरनाईकांनी सांगितले. तसेच मी देखील मोर्चामध्ये सहभागी होण्यास निघालोय, हिंमत असेल तर मला अडवा, असं आव्हान प्रताप सरनाईकांनी दिलं.
























