पगार साडे 7 हजारांहून 40,000 पर्यंत; धनंजय मुंडेंच्या पीएची आठवण, म्हणाले, हजारो वर्षात जन्मतो अजित दादांसारखा नेता
अजित दादांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धगधगतं पर्व संपलं आहे. प्रशासनावर मजबूत पकड असलेला, कडक शिस्तीचा हा नेता आतून किती हळवा आणि माणुसकी जपणारा होता.

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या बीड(Beed) जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, मात्र बीडमधील नेते धनंजय मुंडे यांच्यासह येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसोबत अजित पवारांचा वेगळाच जिव्हाळा होता. त्यामुळे, आज बारामतीसह बीड जिल्हाही अजित दादांच्या (Ajit pawar) निधनाच्या वृत्तानंतर बंद ठेवण्यात आला होता. येथील कित्येकांनी सोशल मीडियातून अजित पवारांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अजित दादांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धगधगतं पर्व संपलं आहे. प्रशासनावर मजबूत पकड असलेला, कडक शिस्तीचा हा नेता आतून किती हळवा आणि माणुसकी जपणारा होता, याचा प्रत्यय आम्हाला 2012 साली आला, असे मत धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक यांनी आपल्या भावना व्यक्त करताना मांडले. त्यावेळी त्यांनी मंत्रालयातील सर्व स्वीय सहाय्यकांच्या पगारवाढी संदर्भातल्या प्रश्नाचा एक अनुभव यावेळी व्यक्त केलाय. त्यावेळी आम्ही आमदारांचे स्वीय सहाय्यक (PA) म्हणून नुकतेच रुजू झालो होतो. केवळ 7,825 रुपये इतक्या तुटपुंज्या मानधनावर घर चालवणं अवघड होतं. पगारवाढीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. ही फाईल जेव्हा अजित दादांकडे आली, तेव्हा त्यांनी जे केलं, ते केवळ दादाच करू शकतात, असे त्यांनी म्हटलं.
विधिमंडळाच्या लॉबीमध्ये सचिवांनी अवघ्या 2 ते 2.5 हजार रुपयांच्या वाढीचा प्रस्ताव मांडला होता. तो प्रस्ताव ऐकताच दादा त्यांच्या खास शैलीत कडाडले “अरे, 10 हजारात काय होतं? ही पोरं कुठे जाणार? थेट 15 हजारांचा प्रस्ताव द्या!” एका क्षणात आमचा पगार दुप्पट झाला. पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे, त्या निर्णयाने आम्हाला जगण्याचा आत्मविश्वास आणि कामाचा आत्मसन्मान मिळाला, असे प्रशांत जोशी यांनी म्हटलं.
दादांचं दातृत्व इथेच थांबलं नाही.
फडणवीस सरकारच्या काळात सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी वेतन 25 हजार रुपये केलं.महाविकास आघाडी सरकारमध्ये दादांनी पुन्हा पुढाकार घेत हे वेतन 30 हजार रुपये केलं. आणि विशेष म्हणजे, मागील वर्षी अर्थसंकल्पात हे वेतन 40 हजार रुपये करण्याचा त्यांचा ठाम मानस होता. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या होत्या. यावर्षी ते नक्कीच प्रत्यक्षात उतरलं असतं… कारण ते शब्दांचे पक्के दादा होते. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. या निर्णयाची अंमलबजावणी होण्याआधीच काळाने त्यांना आमच्यातून हिरावून नेलं. सामान्य माणसाच्या पोटाचा विचार करणारा, पदापेक्षा माणूस मोठा मानणारा असा नेता पुन्हा होणं कठीण आहे. दादा, तुमचे उपकार आमची पिढी कधीच विसरणार नाही, अशी भावनिक पोस्ट प्रशांत जोशी यांनी मांडली .
“हज़ारों साल नर्गिस अपनी बे-नूरी पे रोती है,
बड़ी मुश्किल से होता है चमन में दीदा-वर पैदा।”
(हजारो वर्षे निसर्ग वाट पाहतो, तेव्हा कुठे एखादा असा कर्तृत्ववान माणूस जन्माला येतो.)
दरम्यान, आज सकाळी बारामती येथे विमान दुर्घटनेत अजित पवार यांचे निधन झाले असून उद्या बारामतीत त्यांच्या पार्थिवावार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
हेही वाचा
Before You Go
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?























