Keshav Upadhye : अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी हिंदू मंदिरं पुढे, मग दर्गा-मशिदी मागे का? भाजपचा सवाल
Keshav Upadhye : कितीतरी मंदिरे, ट्रस्ट, सार्वजनिक मंडळांनी आपापल्या परीने अन्न, निधी आणि जीवनावश्यक वस्तू संकटग्रस्तांपर्यंत पोहोचवून माणुसकीचे दर्शन घडविल्याचे केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे.

Keshav Upadhye : महाराष्ट्रावर अतिवृष्टी व महापुराचे (Maharashtra Flood) मोठे संकट कोसळले असताना लाखो कुटुंबे अन्न, पाणी, निवाऱ्याविना अडकून पडली आहेत. या कठीण प्रसंगी हिंदू धर्मातील अनेक प्रमुख मंदिरांनी कोट्यवधी रुपयांची मदत सरकारकडे पारदर्शकपणे दिली असून, अन्न, जीवनावश्यक वस्तू आणि सेवाकार्य हाती घेतले आहेत. मात्र, अन्य धर्मीयांची प्रार्थनास्थळे दर्गा-मशिदी मागे का? असा सवाल भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे.
केशव उपाध्ये यांनी 'एक्स'वर पोस्ट करत म्हटले आहे की, अतिवृष्टी आणि महापूराच्या वेढ्यात सापडलेल्या महाराष्ट्रात लाखो कुटुंबे संकटात सापडली, शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त झाली. अशा कठीण प्रसंगी तुळजाभवानी मंदिर, शेगाव गजानन महाराज संस्थान, सिद्धिविनायक मंदिर यांसारख्या हिंदू मंदिरांनी कोट्यवधी रुपयांची पारदर्शक मदत सरकारकडे पाठवली. कितीतरी मंदिरे, ट्रस्ट, सार्वजनिक मंडळांनी आपापल्या परीने अन्न, निधी आणि जीवनावश्यक वस्तू संकटग्रस्तांपर्यंत पोहोचवून माणुसकीचे दर्शन घडविले.
अतिवृष्टी आणि महापूराच्या वेढ्यात सापडलेल्या महाराष्ट्रात लाखो कुटुंबे संकटात सापडली, शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त झाली.
— Keshav Upadhye (@keshavupadhye) September 30, 2025
अशा कठीण प्रसंगी तुळजाभवानी मंदिर, शेगाव गजानन महाराज संस्थान, सिद्धिविनायक मंदिर यांसारख्या हिंदू मंदिरांनी कोट्यवधी रुपयांची पारदर्शक मदत सरकारकडे पाठवली.…
दर्गा-मशिदी मागे का आहेत?
पण राज्यातील अन्य धर्मीयांची प्रार्थनास्थळे दर्गा-मशिदी मागे का आहेत? त्यांच्या व्यवस्थापनाकडे कोट्यवधींचा निधी असतानाही, एकही ठोस मदतीची जाहीर घोषणा, निधीची उघड माहिती किंवा पूरग्रस्तांसाठी दिलासा का नाही? कधी बोगस हिंदुत्वाचे बेगडी मुखवटे चढवून तर कधी गंगाजमनी तहजीबचे प्रेम दाखवत मंदिरांची टिंगल आणि हिंदूंवर टीका करणाऱ्या लांगूलचालनवादी नेत्यांनी व विचारवंतांनी हे प्रश्न आज स्वत:ला विचारायला हवेत. प्रश्न हिंदू-मुस्लिमचा नाही प्रश्न संवेदनशीलतेचा आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
केशव उपाध्येंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
दरम्यान, राज्यातील पूरपरिस्थितीवरून महायुती सरकारवर सातत्याने टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना भाजपने कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत ठाकरे गटाने येऊ घातलेला दसरा मेळावा रद्द करून तो खर्च पूरग्रस्तांना द्यावा, अशी मागणी केली आहे. उपाध्ये यांनी म्हटले आहे की, "मुख्यमंत्री असताना कृती केली नाही, आता तरी प्रायश्चित्त घ्या. मेळाव्यात ‘गद्दार-मिंधे’च्या गजरापेक्षा मदत महत्त्वाची आहे." शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात दसरा मेळाव्यात विचार मांडले जात असत, पण आता तो एक थयथयाट आणि खर्चिक सोहळा झाला आहे, अशी टीकाही त्यांनी केली होती.
आणखी वाचा
























