Jayant Patil : राष्ट्रवादीच्या शिबिरात जयंत पाटलांच्या नाराजीची चर्चा, नाशिकमध्ये उशिराने पोहोचताच नेमकं काय घडलं?
Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नाशिकमध्ये आयोजित एक दिवसीय शिबिराला जयंत पाटील उशिराने दाखल झाले.

Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (NCP Sharad Pawar Faction) वतीने नाशिकमध्ये (Nashik) रविवारी (दि. 14 सप्टेंबर) एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाला माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) अनुपस्थित होते. जयंत पाटील अनुपस्थित असल्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, या शिबिराला जयंत पाटील हे उशिराने दाखल झाले.
जयंत पाटील आल्यानंतर ज्या ठिकाणी पक्षाचे शिबिर सुरू आहे. तिथे बाहेरच्या बाजूला होम हवन केले जात आहे. पितृ पक्षाच्या निमित्ताने दरवर्षी स्वामी नारायण ट्रस्टच्या वतीने होम हवन केले जाते, या विषयी जयंत पाटील यांना कल्पना नव्हती. जयंत पाटील हे गाडीतून उतरल्यानंतर थेट होम हवनच्या दिशेने गेलेत. कार्यकर्त्यांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला, तोपर्यंत जयंत पाटील मंडपापर्यंत पोहचले होते.
जयंत पाटलांची मिश्कील टिप्पणी
यानंतर जयंत पाटील हे शिबिराकडे जात असताना त्यांनी मिश्किल टिप्पणी केली. मला वाटले आपल्या धोरणाचा भाग म्हणून हे सुरू केले आहे की काय? असे ते म्हणाले. यानंतर पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांना प्रश्न विचारला असता काय भानगड सुरू आहे ते बघण्यासाठी गेलो होतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तर शिबिरात उशिरा येण्यासाठी भारतीय रेल जबाबदार असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला आहे.
जयंत पाटलांचा भाजपवर हल्लाबोल
जयंत पाटील पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, आज अधिवेशन होत आहे. त्यामुळे या अधिवेशनात मंथन होईल. पाकिस्तानने ज्या प्रकारे पहलगाम हल्ला केला. त्यामुळे पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणे चुकीचे आहे. खून और पाणी साथ मै नही बहेगा, असे भाजप नेते सांगत होते. आता ते क्रिकेट खेळत आहेत. त्यांची महिन्याला धोरणं बदलतात, असे म्हणत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय.
"देवा भाऊ" कॅम्पेनला शरद पवार गटाचं प्रत्युत्तर
दरम्यान, भाजपने राबवलेल्या "देवा भाऊ" कॅम्पेनला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. नाशिक जिल्ह्यातील विविध दैनिकांमध्ये जाहिरात देत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट सवाल केला आहे. "शेतकरी कर्जमाफी, आत्महत्या, पीक विमा, कांदा निर्यातबंदी, अतिवृष्टीचं नुकसान, २१०० रुपये बहिणींना आणि युवांना रोजगार या प्रश्नांची उत्तरं कधी मिळणार?" असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर, पक्षाच्यावतीने सोमवारी नाशिकमध्ये भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.
आणखी वाचा
























