![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Nanded News : नांदेड जिल्ह्यातील 89 मंडळापैकी 69 मंडळांत अतिवृष्टी; जुलैमध्ये पावसाचा कहर
Nanded Rain News : या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक भागात पिकांच्या नुकसानीचा आकडा वाढतांना पाहायला मिळत आहे.
![Nanded News : नांदेड जिल्ह्यातील 89 मंडळापैकी 69 मंडळांत अतिवृष्टी; जुलैमध्ये पावसाचा कहर Nanded Rain News Heavy rains in 69 out of 89 mandals in Nanded district Heavy rains in July Nanded News : नांदेड जिल्ह्यातील 89 मंडळापैकी 69 मंडळांत अतिवृष्टी; जुलैमध्ये पावसाचा कहर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/26/26b9841d56d6a708818a23896271744b1690355910943737_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nanded Rain News : मागील आठवड्यापासून नांदेड (Nanded) जिल्ह्यात पाऊस (Rain) सतत कमी-अधिक प्रमाणात सुरू आहे. दरम्यान 21 आणि 22 जुलै रोजी नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसामुळे हाहाकार पाहायला मिळाला. विशेष म्हणजे जुलै महिन्यात 89 पैकी तब्बल 69 मंडळांत अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तर या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक भागांत पिकांच्या नुकसानीचा आकडा वाढताना पाहायला मिळत आहे.
मान्सूनला उशीर झाल्याने यंदा पावसाचे आगमन देखील उशिरा झाले. जून महिना कोरडा गेल्यामुळे पेरण्यादेखील उशिरा झाल्या. काही पेरण्या जुलै महिन्यात झाल्या. दरम्यान, जुलै महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात नांदेड जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. अनेक भागांत अतिवृष्टी झाली. ज्यामुळे नद्या नाल्यांना पूर आले. विशेष म्हणजे, 19, 21 आणि 22 जुलै रोजी पावसाने कहर केला आणि पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला. तर 7 ते 24 जुलै या 17 दिवसांमध्ये 69 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिकांसह शेतातील माती खरडून वाहून गेली आहे.
'या' मंडळांत तीन वेळा अतिवृष्टी
नांदेड जिल्ह्यातील अनेक भागांत अतिवृष्टी झाली आहे. दरम्यान यात आठ अशी मंडळे आहेत, ज्याठिकाणी तीन वेळ अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. ज्यात आदमपूर (बिलोली), मोघाली (भोकर), बोधडी, इस्लापूर, दहेली, उमरी बाजार (सर्व किनवट) आणि माहूर, सिंदखेड (माहूर) या मंडळांमध्ये तीन वेळा अतिवृष्टी झाली आहे. त्यात माहूर मंडळात या वर्षातील सर्वाधिक विक्रमी 305 मिमी पाऊस 24 तासांत झाला आहे. तसेच जिल्ह्यातील 22 मंडळांमध्ये दोन वेळा अतिवृष्टी झाली आहे.
पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी...
मागील वर्षे सुद्धा नांदेड जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात अतिवृष्टी झाली होती. नद्या नाल्यांना पुर आल्याने शेतात पाणी घुसले होते. तर अनेक ठिकाणी शेतातील माती वाहून गेली होती. गेल्यावर्षी आलेल्या या संकटाचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला होता. त्यातून सावरत यंदा पुन्हा शेतकऱ्यांनी पैशांची जुडवा-जुडवी करत पेरणी केली आहे. मात्र यंदाही पुन्हा अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकसानीची पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहे. दरम्यान, आता सरकार यावर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
अतिवृष्टी! दोन दिवसांत नांदेडमधील 9 हजार हेक्टर शेती खरडून गेली; 2 लाख हेक्टरवरील पिके आडवी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)