RTMNU Exams : अतिवृष्टीमुळे पुन्हा आज आणि उद्याच्या नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा रद्द, 'या' हेल्पलाईन क्रमांकावर साधा संपर्क
रद्द करण्यात आलेले पेपर कधी घेण्यात येतील याबद्दल अद्याप अस्पष्टता आहे. अधिक माहितीकरिता नागपूर विद्यापीठाचे प्रफुल्ल साबळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

नागपूरः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आज (ता. 16) आणि उद्या होणाऱ्या तिन्ही सत्रातील सर्व परीक्षा पुन्हा रद्द करण्यात आल्या आहेत. यापूर्वी अतिवृष्टीमुळे रद्द करण्यात आलेले पेपर आज आणि उद्या घेण्यात येणार होते. मात्र हवामान खात्याच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करुन अतिघाईत जारी करण्यात आलेल्या परीक्षांच्या तारखांमुळे विद्यार्थ्यांचा मनस्ताप वाढला आहे.
राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे सर्वत्रच पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पूर्व विदर्भातही अशीच स्थिती आहे. एकीकडे शहरात घराघरात पावसाचे पाणी शिरत असताना, ग्रामीण भागात नद्या आणि नाले दुथडी भरुन वाहत आहेत. शिवाय भंडारा, गोंदिया आणि इतर जिल्ह्यांमध्येही अशीच पुरपरिस्थिती असल्याने विद्यार्थी परीक्षा केंद्रांपर्यंत कसे पोहोचणार हा प्रश्न निर्माण झाला होता. रद्द करण्यात आलेले पेपर कधी घेण्यात येतील याबद्दल अद्याप सांगण्यात आले नाही आहे.
या संदर्भात अधिक माहितीकरिता परीक्षा व मूल्यमापन संचालक प्रफुल्ल साबळे यांच्याशी दुरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
गेल्या आठवड्यातही पेपर परीक्षा रद्द
शिवाय पुर परिस्थितीमध्ये बस तसेच इतर वाहतूक सेवा विस्कळीत झाली. याच कारणामुळे विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठांच्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान आज मंगळवारीही भंडारा, गोंदिया जिल्ह्यात पाऊस आहे. त्यामुळे विद्यापीठाने दोन दिवसांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वीही गेल्या आठवड्यात बुधवारचे 72 आणि गुरुवारचे 42 अशा एकूण 114 परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. बुधवारी रद्द झालेले पेपर हे 16 ऑगस्ट रोजी तर गुरुवारचे रद्द झालेले पेपर 21 ऑगस्टला घेण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने जाहीर केले होते.
पूर्वानुभवातून नियोजन केलेच नाही
यापूर्वी नागपूर विद्यापीठाने अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे परीक्षा रद्द करुन त्या पुढे ढकलल्या होत्या. या घटनेला महिनाही झालेला नाही. पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाली. रविवारी पावसाने जोर धरला होता. यानंतर विद्यापीठाने दूरस्थ भागात असलेल्या विद्यार्थ्यांच्या येण्या-जाण्याच्या दृष्टीने निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र त्यासाठी विद्यार्थ्यांनी फोन करून माहिती व महाविद्यालयांकडून विनंती करण्यात यावी याची वाट पाहिली. परीक्षा विभागात नियोजनाचा अभाव असल्यानेच वेळेवर पेपर रद्द करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.
येथे साधा संपर्क
परीक्षांसंदर्भात काही अडचणी असल्यास तर विद्यार्थ्यांनी 8421464216, 8999567428, 9890007313, 9022877472 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा.
Palghar News : दवाखाना गाठण्यासाठी गर्भवतीची डोलीतून पायपीट, आरोग्य सेवा न मिळाल्याने जुळ्या बाळांचा मृत्यू
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
Before You Go
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर






















