Baban Taywade : सरकार पाडण्याची भाषा करता, मनोज जरांगेंकडे आमदार किती? बबनराव तायवाडे यांचा प्रश्न
Baban Taywade on Maratha Reservation : मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनावर आमचे लक्ष असेल असं वक्तव्य ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे यांनी केलं. त्यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली.

नागपूर : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे हे 29 ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलन करणार आहेत. त्यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली आहे. मराठा आरक्षण मिळालं नाही तर मनोज जरांगे सरकार पाडण्याची भाषा करताहेत, त्यांच्यामागे आमदार किती असा सवाल तायवाडे यांनी विचारला. तसेच मनोज जरांगे यांच्या आंदोलनाकडे आमचे लक्ष असेल असंही ते म्हणाले.
मनोज जरांगेनी राज्य सरकारला दोन दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. नाहीतर सरकार उलथून टाकेन असं म्हटलं. येत्या 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे हे मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. राज्य सरकारने मराठा आरक्षणाची मागमी मान्य करण्यासाठी आणखी दोन दिवस आहेत असा इशारा त्यांनी दिला.
त्यावेळी माघार का घेतली?
मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिलेल्या अल्टिमेटमवर ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "सरकार उलथून टाकायचे होते तर विधानसभा निवडणुकीतून माघार का घेतली? तेव्हाच आपले उमेदवार उभे करून मोठ्या संखेने आमदार निवडून आणायचे होते. तसे केले नाही आणि आज सरकार उलथून टाकण्याची भाषा करता. मनोज जरांगे यांच्या याच भूमिकेमुळे त्यांना कोणी गांभीर्यन घेत नाही."
ओबीसी महासंघाचे मराठा आंदोलनावर लक्ष
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे लक्ष हे मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि सरकारच्या भूमिकेवर आहे. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. मात्र ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला तर ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल हे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी स्पष्ट केलं. मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर या आधी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघ यांनीही टीका केली आहे.
राज्य सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम
29 ऑगस्टला कोणत्याही परिस्थितीत मुंबईमध्ये आंदोलन करणार असल्याचा निर्धार मनोज जरांगे यांनी केलाआहे .मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी आंतरवाली सराटीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मराठ्यांना सर्व कामधंदे बाजूला ठेवून मुंबईमध्ये येण्याचे आवाहन केलं. तर फडणवीसांना दोन दिवसांचा अल्टिमेटमही जरांगेंनी दिला. तसंच आरक्षण न दिल्यास सरकारही उलथून टाकण्याचा इशाराही जरांगेंनी दिला.
ही बातमी वाचा:
























