राष्ट्रवादी विलीनीकरण निव्वळ अफवा, मुद्दाम ही बातमी पसरवण्यात आली : शरद पवार
आपला पक्ष लोकांच्या प्रभावीपणे समोर कसा येईल, आपली विचारधारा लोक आपलीशी कशी करतील, हाच विचार करा, त्यासाठी प्रयत्न करा. आपण लोकसभा निवडणुकांप्रमाणे विधानसभेतही तरुण चेहऱ्यांना संधी देऊ, असंही शरद पवारांनी सांगितलं.

मुंबई : राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होण्याच्या चर्चांवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादी पक्ष विलीनीकरणाची बातमी ही अफवा होती. ज्यांना वाटतं की आपण मित्रांसोबत एकत्र राहू नये, अशा विचारांच्या पत्रकारांना सोबत घेऊन ही बातमी मुद्दाम पसरवली गेली. असं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची बातमी साफ खोटी आहे. राष्ट्रवादीचे स्वतंत्र अस्तित्व आहे आणि ते अस्तित्व कायम राहील.
लवकरच राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहे. लोकसभा निवडणुकीत काय निकाल लागले ते डोक्यातून काढा, अशा सूचनाही शरद पवारांनी यावेळी दिल्या.
आपला पक्ष लोकांच्या प्रभावीपणे समोर कसा येईल, आपली विचारधारा लोक आपलीशी कशी करतील, हाच विचार करा, त्यासाठी प्रयत्न करा. आपण लोकसभा निवडणुकांप्रमाणे विधानसभेतही तरुण चेहऱ्यांना संधी देऊ, असंही शरद पवारांनी सांगितलं.
एक वेळ अशी होती की, आपल्यासोबतचे 58 लोक साथ सोडून गेले होते. सभागृहात आम्ही फक्त 6 जण होतो. मात्र आम्ही मेहनत घेतली आणि पुन्हा ६० लोक सभागृहात आणले, त्यात सर्व नवे चेहरे होते.
आजची निवडणुकीनंतरची परिस्थिती इतकी वाईट नाही. तुम्ही 40 लोक आहात, तुमचा 40 लोकांचा एक संच आहे. तुम्ही खंबीरपणे लढा, असं शरद पवारांनी म्हटलं.
ईव्हीएम मशीनबाबत शंका
ईव्हीएम मशीन आणि त्यांच्या संख्येबाबत माझ्या मनात फार आधीपासून शंका होती. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड इथे भाजपची सत्ता असताना भाजपाचा पराभव झाला आणि काँग्रेस पार्टी विजयी झाली. पण कदाचित हा पराभव देशाच्या निवडणुका जिंकण्यासाठी तर नाही, अशी शंका माझ्या डोक्यात आली होती.
निवडणूक यंत्रणेबाबत निवडणुकीत कधी नव्हे तितका विचार करण्यात आला. माझे मत हे बरोबर गेले आहे की नाही त्याबाबत लोकांना शंका वाटत आहे. देशात लोकांच्या मनात अशी शंका याआधी कधी निर्माण झाली नव्हती. आजही लोकांची शंका कायम आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका
समाजात उन्माद कसा वाढेल असा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान सोयीस्कररित्या केला. लोकांच्या भावनेला आवाहन करून त्यांनी प्रखर राष्ट्रवाद मांडला आणि प्रचाराची दिशाच बदलून टाकली. आज देशात बेरोजगारीचा उच्चांक झाला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. सर्व गोष्टींचा फटका सरकारला बसणार होता, मात्र पंतप्रधान मोदींनी सोयीस्कर आढावा घेत प्रचाराचे सूत्रच बदलले, अशी टीका शरद पवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
