आता ते मुख्यमंत्री नाहीत, याचा विसर पडलाय का? मंत्री नवाब मलिक यांची राज्यपालांवर खोचक टीका
राज्यपाल आता मुख्यमंत्री नाहीत, हे ते विसरले आहे का? असा खोचक प्रश्न मंत्री नवाब मलिक यांनी विचारला आहे.

मुंबई : राज्यात तीन पक्षांचं महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राज्य सरकारचे वाद सुरु आहेत. राज्यपाल सरकारच्या कामात हस्तक्षेप करत असल्याचे अनेकदा आरोप महाविकास आघाडीतील सरकारने केले आहेत. अशातच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहे. राज्यपालांच्या या दौऱ्यावर अल्पसंख्यांक मंत्री नबाब मलिकांनी आक्षेप घेतला आहे. असे दौरे, उद्घाटन आणि अधिकाऱ्यांच्या बैठका हे राज्य सरकारच्या अधिकारांवर अतिक्रमण असल्याचं मलिकांनी म्हटलंय. राज्यपाल कधीकाळी मुख्यमंत्री होते. मात्र, आता ते राज्यपाल आहेत, मुख्यमंत्री नाही, हे ते विसरले आहे का? असा खोचक प्रश्न मलिक यांनी विचारला आहे.
काय म्हणाले नवाब मलिक?
राज्यघटनेनुसार राष्ट्रपती यांच कामकाज चालत असतं. राष्ट्रपती यांच्याकडील अधिकार राज्यपाल यांच्याकडे असतात. महाराष्ट्राचे राज्यपाल सरकारचे अधिकार नेहमी वर्ग करत असतात, अशी टीका मलिक यांनी केलीय. ते म्हणाले, राज्यपाल यांचा 5 आणि 6 तारखेचा कार्यक्रम नांदेडचा आहे. अल्पसंख्यक विभागाने दोन वसतीगृह बांधले आहेत. त्यांचं उद्घाटन आणि वर्ग करण्याचा अधिकार सरकारचा आहे. मात्र, राज्यपाल यांनी स्वतः त्यांच उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याशी आढावा बैठक घेणार आहेत.
आता ते मुख्यमंत्री नाहीत, याचा विसर पडला आहे का? : मंत्री नवाब मलिक
हिंगोली या ठिकाणी कोणतंही विद्यापीठ नाही. तरीही त्यांनी 1 तास आढावा बैठक घेतली आहे. थेट राज्यसरकारच्या अधिकारांचा वापर राज्यपाल करत आहेत. आज कॅबिनेटमध्ये यावर चर्चा करून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. कॅबिनेट संपल्यानंतर मुख्य सचिव राज्यपाल यांच्या सचिवांची भेट घेतील. आजच्या बैठकित जे झालं त्याची माहिती राजभवनला दिली जाईल. हे पहिल्यांदा घडत नाही. कोविड काळातही त्यांनी आढावा घेतला होता. राज्यपाल मुख्यमंत्री होते. त्यांना या सर्व अधिकारांची माहिती आहे. मात्र, आता ते मुख्यमंत्री नाहीत, याचा विसर पडला आहे का? असा प्रश्न मंत्री मलिक यांनी उपस्थित केलाय. दरम्यान, कॅबिनेटमधील राज्यपालांविषयी झालेल्या चर्चेचा निरोप घेऊन मुख्य सचिव राजभवनला आले होते. आता ते राजभवनच्या बाहेर पडले आहेत.
'राजभवन भाजप कार्यालय झालंय, राज्यपाल भाजप कार्यकर्त्यासारखे वागताहेत', नाना पटोलेंचा आरोप
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्याच्या दोऱ्यावर
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. 5 ते 7 ऑगस्ट दरम्यान ते नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. 5 ऑगस्टला राजपाल सकाळी नांदेड येथे दाखल होणार असुन पहिल्यांदा ते नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात जाणार असुन विद्यापीठातील अनेक कार्यक्रमांना ते हजेरी लावून नांदेड येथील गुरुद्वारा येथे भेट देऊन तिथला आढावा घेणार आहेत. शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकही घेणार आहेत. नांदेडला मुक्काम करून 6 ऑगस्ट रोजी ते हिंगोली दौऱ्यावर जाणार आहेत. त्यानंतर हिंगोलीत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन परभणीला निघणार आहेत. परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे मुक्कामी राहणार आहेत. 7 ऑगस्टला दिवसभर कृषि विद्यापीठाच्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावून सांयकाळी मुंबईत परतणार आहेत. राज्यपाल येणार असल्याने तिन्ही जिल्ह्यातील प्रशासन कामाले लागले आहेत.
Before You Go
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती





















