![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Maratha Reservation Judgement | मराठा आरक्षणावर हायकोर्टात गुरुवारी अंतिम निकाल
सामाजिक-शैक्षणिक गटामध्ये मागास असलेल्या समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार सरकारला आहे, असा दावा सरकारी वकिलांना केला होता. मात्र केंद्र सरकारने 15 ऑगस्ट 2018 मध्ये केलेल्या 102 व्या घटनादुरुस्तीमुळे आरक्षण जाहीर करण्याचा अधिकार हा केवळ राष्ट्रपतींना आहे.
![Maratha Reservation Judgement | मराठा आरक्षणावर हायकोर्टात गुरुवारी अंतिम निकाल Maratha Reservation final judgement on 27th June in high court Mumbai latest update Maratha Reservation Judgement | मराठा आरक्षणावर हायकोर्टात गुरुवारी अंतिम निकाल](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/09/11124048/maratha.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालय गुरुवारी आपला अंतिम निकाल जाहीर करणार आहे. मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायलयात 4 याचिका विरोधात, 2 याचिका समर्थनात दाखल झाल्या आहेत. तर एकूण 22 हस्तक्षेप अर्ज आले आहेत. ज्यातील 16 मराठा आरक्षणाच्या समर्थनात तर 6 विरोधात आहेत.
26 मार्च 2016 रोजी सर्व युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता. फेब्रुवारी ते मार्च दरम्यान दीड महिना सुरू अससेली दैनंदिन सुनावणी, मराठा आरक्षणाला आव्हान देत विरोधक याचिकाकर्त्यांचा मुद्देसूद युक्तिवाद, राज्य सरकारच्यावतीने मातब्बर वकिलांची फौज, त्यांचा आरक्षणाच्या समर्थनार्थ झालेला जोरदार युक्तिवाद, हजारो पानांच्या नोंदी, राज्य मागास प्रवर्गाचा अहवाल आणि आजवरच्या इतर आयोगांनी यासंदर्भात सादर केलेली माहिती पाहता न्यायालयाचा अंतिम निकाल महत्त्वपूर्ण असणार आहे.
न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे आरक्षण विरोधी आणि समर्थनार्थ दाखल झालेल्या याचिकांवर सुनावणी झाली. राज्य सरकारने राज्य मागास प्रवर्ग आयोगाच्या अहवालाला महत्वपूर्ण आधार मानत आरक्षणाचा निर्णय जाहीर केला आहे.
सामाजिक-शैक्षणिक गटामध्ये मागास असलेल्या समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार सरकारला आहे, असा दावा राज्य सरकारकडून जेष्ठ वकील विजय थोरात, अनिल साखरे, मुकूल रोहतगी, पलविंदर पटवारीया यांनी केला. या युक्तिवादात गायकवाड समितीच्या अहवालाचं सर्व्हेक्षण, गुणात्मक पद्धत, शिफारशी, मराठा-कुणबी समाजाच्या चालीरिती इत्यादींचा सविस्तर उल्लेख करण्यात आला.
मात्र केंद्र सरकारने 15 ऑगस्ट 2018 मध्ये केलेल्या 102 व्या घटनादुरुस्तीमुळे आरक्षण जाहीर करण्याचा अधिकार हा केवळ राष्ट्रपतींना आहे. त्यामुळे राज्य सरकारने जारी केलेलं मराठा आरक्षण वैध नाही, असा युक्तिवाद आरक्षण विरोधी याचिकाकर्त्यांनी केला आहे. ज्येष्ठ वकील श्रीहरी अणे, अरविंद दातार, प्रदीप संचेती, गुणरत्न सदावर्ते, सतीश तळेकर, एजाज नक्वी इत्यादी वकिलांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात बाजू मांडली.
या युक्तिवादात गायकवाड समितीच्या अहवालाबाबत साशंकता व्यक्त करण्यात आली असून मंडल आयोगापासून बापट आयोगापर्यंत मराठा समाज प्रगत असल्याचा दावा करण्यात आल्याचंही विरोधकांनी ठळकपणे कोर्टापुढे मांडले. तसेच याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्रांचे अनेक दाखलेही दोन्ही पक्षकारांनी न्यायालयाला दिले आहेत. त्यामुळे हजारो पानांच्या अहवालासह आपला सविस्तर युक्तिवाद दोन्ही पक्षकारांनी हायकोर्टात दिला आहे. त्यामुळे गुरुवारी जाहीर होणाऱ्या या निकालावर विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया, सरकारी नोकरभर्ती या सर्वांचं भवितव्य अवलंबून आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)