एक्स्प्लोर
पोलिसांचं धाडसत्र, मग भिडेंना अटक का नाही?, मुख्यमंत्र्यांचं उत्तर...
पुणे, नागपूरमध्ये कबीर कला मंच आणि रिपब्लिकन पँथरच्या कार्यालय आणि घरावर पोलिसांनी छापेमारी केली.

मुंबई: पोलिसांचं धाडसत्र हे एल्गार परिषदेला डोळ्यासमोर ठेऊन नाही, तर देशपातळीवर केंद्रीय पथकांकडून सुरु असलेली कारवाई आहे, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. पुणे पोलीसांनी आज पहाटेपासून एल्गार परिषदेसंबंधीतांवर धाडी टाकल्या. मुंबई, पुणे, नागपूरमध्ये कबीर कला मंच आणि रिपब्लिकन पँथरच्या कार्यालय आणि घरावर पोलिसांनी छापेमारी केली. याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारलं असता ते म्हणाले, “ एल्गार परिषदेला डोळ्यासमोर ठेऊन कारवाई नाही. ही देशपातळीवर सेंट्रल एजन्सीजकडून सुरु असलेली कारवाई आहे. दिल्लीतही काही ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. याध्ये शहरी भागातील नक्षली हालचालींशी संबंधित असलेल्या लोकांवर कारवाई होत आहे”. संभाजी भिडेंना अटक का नाही? मुख्यमंत्र्यांच्या या स्पष्टीकरणानंतर त्यांना संभाजी भिंडेबाबत प्रश्न विचारण्यात आला. या धाडी सुरु आहेत, मग अजून संभाजी भिडेंवर कारवाई का नाही? या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, “ज्यांच्याविरोधात पुरावे सापडतील, त्यांच्याच विरोधात कारवाई केली जात आहे”. एल्गार परिषद पुण्यात 31 डिसेंबर 2017 रोजी एल्गार परिषद झाली होती. त्यानंतर 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव इथे हिंसाचार उफाळला होता. त्याच्या निषेधार्थ दलित संघटनांनी 3 जानेवारीला राज्यभरात बंद पुकारला होता. या घटनेनंतर 7 जानेवारी 2018 रोजी कबीर कला मंचचे चार जण, तर रिपब्लिकन पँथरच्या चार जणांविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता या प्रकरणात आज पहाटेपासून पुण्यातील कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांच्या घरावर तर मुंबईत रिपब्लिकन पँथरच्या कार्यालयावर पुणे पोलिसांनी धाडी टाकल्या आहेत. कोणा-कोणाच्या घरी धाडी?
- एल्गार परिषदे प्रकरणी कबीर कला मंच आणि रिपब्लिकन पँथरच्या कार्यालय आणि घरात झडतीसत्र
- पुण्यात रमेश गायचोर, सागर गोरखेच्या वाकडमधील घरी पहाटेपासून छापा
- नागपूरमध्ये अॅड सुरेंद्र गडलिंग यांच्या घरी झडती सुरु
- मुंबईत सुधीर ढवळे, हर्षाली पोतदार यांच्या घरी झडतीसत्र
Before You Go
Abhijeet Dipke Cockroach Janta Party PC : आता मी एकटा नाही, लाखो तरुण माझ्यासोबत : अभिजीत दीपके



















