![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Vitthal Mandir : अरेच्चा! चक्क विठुराया सुट्टीवर... मार्गशीर्ष महिन्यात देवाचा मुक्काम पोस्ट ॲट विष्णूपद; काय आहे यामागची आख्यायिका
Lord Vitthal on Leave : सध्या विठुराया चक्क एक महिन्याच्या सुट्टीवर आहे. गेल्या शेकडो वर्षांपासूनची ही परंपरा आजही पाळली जात आहे.
![Vitthal Mandir : अरेच्चा! चक्क विठुराया सुट्टीवर... मार्गशीर्ष महिन्यात देवाचा मुक्काम पोस्ट ॲट विष्णूपद; काय आहे यामागची आख्यायिका Vitthal mukkampost at vishnupad majha special Pandharpur news Maharashtra News Vitthal Mandir : अरेच्चा! चक्क विठुराया सुट्टीवर... मार्गशीर्ष महिन्यात देवाचा मुक्काम पोस्ट ॲट विष्णूपद; काय आहे यामागची आख्यायिका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/28/ce19a609bba02d86ca34ce70ae959f261669616644633322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Vishnupad Temple : दैनंदिन जीवनातील थकवा घालवण्यासाठी सर्वजण विश्रांतीसाठी निसर्गरम्य ठिकाणच्या शोधात असतात. या ठिकाणी प्रत्येकाला मानसिक शिणवटा घालवण्यासाठी शांतता हवी असते. हीच अवस्था देवाची देखील होत असेल का? त्यामुळेच सध्या विठुराया ( Vitthal Mandir, Pandharpur ) चक्क एक महिन्याच्या सुट्टीवर आहे. गेल्या शेकडो वर्षांपासूनची ही परंपरा आजही पाळली जात आहे. या परंपरेनुसार सांगितलं जातं की, मार्गशीर्ष महिना हे देवाचा विश्रांती काळ असून चंद्रभागेच्या तीरावर ( Chandrabhaga River) निर्जन आणि निसर्गरम्य अशा विष्णूपदावर ( Vishnupad Temple, Pandharpur ) देव सुट्टीसाठी येत असतो. आषाढी यात्रेनंतरचा चातुर्मास आणि त्यानंतर आलेली कार्तिक यात्रा ( Kartiki Yatra ) यामुळे शिणलेला विठुराया मार्गशीर्ष महिन्याच्या प्रतीक्षेत असतो आणि हेमंत ऋतूचे वेध लागताच देवालाही विष्णुपदावर येण्याची ओढ सुरु होते. यंदा परतीच्या पावसाच्या दणक्यानंतर अजूनही चंद्रभागेच्या पात्रात भरपूर पाणी असल्याने विष्णुपदावर दर्शनासाठी येतानाही घोटभर पाण्यातून जावे लागत असल्याने प्रत्येक भाविकांचे पाय धुतले जाऊन त्याचे दर्शन होत आहे.
पंढरपूरपासून दोन किलोमीटर अंतरावर हे विष्णूपद नावाचे असंच एक निसर्गरम्य ठिकाण आहे. विठ्ठल मंदिराकडून गोपाळपुरला येताना रस्त्यापासून आतल्या बाजूला दाट झाडीत चंद्रभागा तीरावरील या मंदिराला बहुसंख्य पर्यटक हे नदीमार्गे होडीतून येतात. पुंडलिक मंदिरापासून रोज अनेक होड्या दिवसभर पर्यटकांना नौकानयनाच्या आनंदसह देवाच्या विश्रांती ठिकाणी नेत असतात. गेल्या शेकडो वर्षांपासून दरवर्षी कार्तिक वद्य अमावास्येला विठुराया येथे सुट्टीवर येतात आणि तब्बल महिनाभर विश्रांती घेऊन मार्गशीर्ष वद्य अमावास्येला पुन्हा वाजत गाजत मंदिराकडे परततात. चंद्रभागेच्या पाण्यातून प्रवास करत या मंदिराकडे येताना वाटेत पात्राच्या माढ्यातच पाण्यात अर्धवट बुडालेले नारदमुनीचे बैठेंखानी लहानसे मंदिर लागते. या मंदिरात पद्मासन घातलेली नारदमुनींची पुरातन मूर्ती आहे. विष्णूपदाला जाण्यापूर्वी सर्व भाविक होडीतूनच नारदमुनींचे दर्शन घेऊन पुढे प्रवास करतात. नारदमुनींच्या मंदिराबाबतही भाविकांच्या विविध प्रकारच्या आख्यायिका असून देव आणि रुक्मिणी मातेचे भांडण लागल्यामुळेच विठुरायाने नारदाला नदीच्या पात्रात बसविले असून सहा महिने ते पाण्याबाहेर आणि सहा महिने पाण्यात असते. नारदांच्या मंदिराच्या पुढे येताच विष्णुपदाचे दगडी मंदिर दिसू लागते. देवाचे प्रिय भक्त संत ज्ञानेश्वर यांनी संजीवनी समाधी घेतल्यावर दुःखी झालेले विठुराया अज्ञातवासात गेल्याची आख्यायिका देखील सांगितली जाते. हे अज्ञातवासाचे ठिकाण म्हणजे विष्णूपद होय. याच ठिकाणी पूर्वी देवाने बालगोपांसोबत गोपाळकाला केल्याच्या खूणा येथील दगडावर उमटल्याने हे मंदिर येथे उभारण्यात आले आहे.
पुंडलिक मंदिराच्या दक्षिणेला नदीतच पाऊण किलोमीटर वर हे मंदिर चंद्रभागा आणि पुष्पावती या नद्यांच्या संगमावर आहे. विष्णूपदाचे मुख्य मंदिर इ.स.1640 साली कोणी धामणगावकर बुवा यांनी बांधले असून 1785 साली चिंतो नागेश बडवे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे सांगितले जाते. या मंदिराचे संपूर्ण बांधकाम हे पूर्णतः काळ्या पाषाणातील असून चारी बाजूला मोकळ्या कमानी आणि मध्यभागी भगवान श्रीविष्णूंचे जवळपास तीन-साडेतीन फुटांचे पाऊल आहे. याठिकाणी देव गोपालक आणि आपल्या गाईंसमवेत येऊन क्रीडा करत असल्याच्या आख्यायिका असून येथील दगडावर अनेक ठिकाणी गाईच्या आणि गोपालकांच्या पायाच्या आकाराच्या खूणा दगडात तयार झालेल्या आहेत. मध्यभागी देवाचे समचरण, बासरी, काठी आणि गोपाळकाल्याच्या भांड्याच्या खुणा दगडात दिसतात. मंदिराच्या चार पायऱ्या उतरून खाली असलेल्या दगडी ओट्यावर शेकडो वर्षांपूर्वीची प्रताप मारुतीची मूर्ती आहे. होडीतून देवाच्या विश्रांतीस्थानावर प्रवेश करताच प्रत्येक जण या ठिकाणच्या प्रेमात पडतो. एका बाजूला चंद्रभागा तर दुसऱ्या बाजूला पसरलेली हिरव , पक्षांच्या किलबिलाटाशिवाय कसलेली आवाज नाहीत त्यामुळे देवाला खऱ्या अर्थाने येथे शांती आणि समाधान मिळत असल्यानेच देव अशा निवांतस्थळी सुट्टीवर येत असावा. मात्र भाविक आणि पर्यटक देवाला एकटे सोडायला तयार नसल्यानेच महिनाभर विठ्ठल मंदिराप्रमाणेच विष्णूपदावरही देवाला भक्तांच्या गर्दीला सामोरे जावेच लागते.
विठुराया मंदिरातून विष्णूपदावर आल्याने देवाचे मंदिरात होणारी नित्यपूजा, धुपारती, शेजारती, सकाळच्या खिचडीचा, दुपारचा महानैवेद्य आणि रात्रीचा बालभोग नैवेद्य याच ठिकाणी दाखविले जातात. देव विश्रांतीसाठी आले की, भक्तही त्याच्या पाठोपाठ येथे पिकनिकसाठी येत असतात. तेही सोबत जेवणाचे डबे घेऊन येथे गोपाळकाल्याच्या आनंद घेतात. एकंदर विश्रांतीसाठी आलेल्या देवाला येथेही भाविक आणि पर्यटकांच्या गर्दीमुळे मनासारखा विश्रांती घेत येत नसला तरी भाविक मात्र येथे येऊन दर्शन घेण्यास पर्वणी मानतात. याच मंदिराच्याकडून पायऱ्या चढून गोपाळपूर रस्त्याकडे जाताना वाटेतच संत जनाबाईचे मंदिर असून याच ठिकाणी जनाबाईला सुळावर चढवले असता त्या सुळाचे पाणी झाल्याची आख्यायिका सांगितली जाते. मंडळी तुम्ही देखील विठ्ठल दर्शनासाठी येणार असाल तर विठ्ठल मंदिरात जावंच पण सध्या देवाचा महिनाभरासाठी बदलेल पत्ता मुक्कामपोस्ट विष्णूपद हा आहे हे ध्यानात ठेवा म्हणजे झालं.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)