कारवाईचा इशारा, ठाकरेंचा बेपत्ता झालेला नगरसेवक घरी परतला, कल्याणमध्ये जल्लोषात केलं स्वागत
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ठाकरे गटाचे चार नगरसेवक मागील अनेक दिवसांपासून बेपत्ता असल्याने उबाठा गट आक्रमक झाला आहे.
Kalyan Dombivli News : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ठाकरे गटाचे चार नगरसेवक मागील अनेक दिवसांपासून बेपत्ता असल्याने उबाठा गट आक्रमक झाला आहे. या चार नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संबंधित चार जागांवर पोटनिवडणूक होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. अशातच ठाकरे गटाच्या बेपत्ता असलेल्या चार नगरसेवकांपैकी एक मधुर म्हात्रे अखेर घरी परतले आहेत.
शिवसेना ठाकरे गटाकडून या नगरसेवकांवर कारवाईचा इशारा देण्यात आला होता
मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास 16 दिवसानंतर मधुर म्हात्रे घरी आले आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं आहे. ठाकरे गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक मधुर म्हात्रे कीर्ती ढोणे राहुल कोट आणि स्वप्नाली केने हे अनेक दिवसापासून नॉटरिचेबल आहेत. यापैकी मधुर म्हात्रे घरी परतले आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून या नगरसेवकांवर कारवाईचा इशारा देण्यात आला होता.
ठाकरे गटाच्या तक्रारीनंतर नगरसेवकांचे कुटुंबीय आक्रमक झाले होते
ठाकरे गटाने पोलिसात जाऊन आमचे नगरसेवक गायब असल्याची तक्रार केल्यानंतर आता गायब असलेल्या नगरसेवकांच्या कुटुंबीयांनी आक्रमक होत थेट ठाकरे गटाविरोधातच तक्रार केली आहे. ठाकरे गटाचे नगरसेवक मधुर म्हात्रे यांच्या वडिलांनी कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात एक तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. आमचा मुलगा आमच्या संपर्कात असून त्यांचे हरवल्याचे पोस्टल लाऊन बदनामी केली जात आहे, असा आरोप मधुर म्हात्रे यांच्या वडिलांनी केला आहे. ठाकरे गटाच्या तीन पदाधिकाऱ्यांविरोधात कोळसाळी पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल १६ जानेवारी रोजी लागल्यानंतर, ठाकरे गटाच्या ‘मशाल’ या चिन्हावर निवडणूक जिंकलेले मधुर म्हात्रे, कीर्ती ढोणे हे दोन नगरसेवक गायब झाले आहेत. त्यानंतर कल्याण पश्चिमेकडील ठाकरे गटाचे राहुल कोट आणि स्वप्नाली केने हे दोन नगरसेवक मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेल्यानंतर, तिथूनच ते गायब झाले होते. या चार नगरसेवकांना पक्षाच्या जिल्हाप्रमुखांनी गट नोंदणीसाठी उपस्थित राहण्यासाठी आदेश वजा नोटीस धाडली होती. मात्र ते गट नोंदणीसाठी उपस्थित राहिले नाहीत. दरम्यान, आता नगरसेवक मधुर म्हात्रे हे घरी परतले आहेत. त्यांचं आज मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या:























