भास्कर जाधव नको हे तुम्ही कोण ठरवणार? जी व्यक्ती जमिनीवर कब्जा करण्यासाठी गावात जाऊन भानगडी करते ते विधानसभा अध्यक्ष, तुम्ही कसली अपेक्षा करणार? संजय राऊतांचा सडकून प्रहार
तुम्ही आज आहात उद्या नाही पण आणि या परंपरा तुम्ही तोडताय आणि त्या आसनावर बसून तुम्ही व्यक्तिगत स्वार्थ आणि व्यक्तिगत हित पाहताय हे अनेकदा उघड झालंय, असा हल्लाबोल राऊत यांनी नार्वेकरांवर केला.

Sanjay Raut Scathing Attack on Rahul Narwekar: भास्कर जाधव यांच्या नावावर महाविकास आघाडीने शिक्कामोर्तब केलं आहे, पण भास्कर जाधव नको हे तुम्ही कोण ठरवणार? विधान परिषदेमध्येही विरोधी पक्षनेतेपद द्यायचं नाही यासाठी कारस्थान केली जात असल्याची सडकून टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. ज्या मातीतून डॉक्टर आंबेडकर यांनी संविधान निर्माण केलं त्या राज्यामध्ये लोकशाहीची अशी गळचीपी आणि हत्या होत असेल तर त्याची इतिहासामध्ये नोंद होईल हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, अशी टीकाही राऊत यांनी केली. तुम्ही आज आहात उद्या नाही पण आणि या परंपरा तुम्ही तोडताय आणि त्या आसनावर बसून तुम्ही व्यक्तिगत स्वार्थ आणि व्यक्तिगत हित पाहताय हे अनेकदा उघड झालंय, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.
विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
संजय राऊत म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर जी व्यक्ती बसली आहे त्या व्यक्तीचं पॉलिटिकल कॅरेक्टर आहे ते पाहता ते निर्णय घेतील की नाही हा पहिला प्रश्न आहे आणि घेतला तर नक्की काय असेल ही सुद्धा शंका लोकांना आहे. मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षनेतेपदासाठी एक वर्षापूर्वी पत्र दिलं आहे, पण नियमांकडे बोट दाखवलं जातं, मुख्यमंत्री म्हणतात तो माझा अधिकार नाही तो विधानसभा अध्यक्षांचा अधिकार आहे, विधानसभा अध्यक्ष म्हणतात की मी निर्णय घेईन. जी व्यक्ती जमिनीचा कब्जा करण्यासाठी गावात जाऊन भानगडी करते ते विधानसभा अध्यक्ष आहेत, जी व्यक्ती विधानसभेच्या अध्यक्षतेमध्ये बसून पक्षांतराच्या बाबतीमध्ये निर्णय घेणार असल्याचा टोला त्यांनी लगावला.
अविश्वास ठराव आणला पाहिजे
राऊत यांनी सांगितले की, विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर जी व्यक्ती बसली आहे आणि त्या व्यक्तीचं पॉलिटिकल कॅरेक्टर पाहता ते निर्णय घेतील की नाही हा पहिला प्रश्न आहे. जी व्यक्ती विधानसभेच्या अध्यक्षतेमध्ये बसून जी व्यक्ती संविधानाच्या विरोधात पक्षांतरामध्ये तद्दन खोटा आणि भंपक निर्णय देते त्यांच्याकडे तुम्ही काय अपेक्षा करणार? असा सवालही त्यांनी केला. विधानसभा अध्यक्षांवरती अविश्वास ठरावच आणला पाहिजे. लोकशाहीच्या भाषेत म्हणायचं तर मनमानी आणि झुंडशाही अशा पद्धतीने विधानसभा किंवा विधिमंडळ चालवल जातं, अशी टीका त्यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या

























