कुपोषणामुळेच बालमृत्यू! कोट्यावधींचा खर्च करुन नेमकं कुणाचं पोषण? रोहित पवारांचा हल्लाबोल, बालकांच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्यांची चौकशी व्हावी
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी बालमृत्यू च्या मुद्यावरुन राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी बालमृत्यू च्या मुद्यावरुन राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. कुपोषणामुळेच बालमृत्यू होत असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. कोट्यवधी रुपये खर्च होऊनही यातून नेमकं कुणाचं पोषण होतं? असा सवाल करत रोहित पवारांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. नेमकं रोहित पवार काय म्हणालेत ते पाहुयात?
नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
राज्यात गेल्या तीन वर्षांत तब्बल 14.5 हजार बालमृत्यू हे केवळ कुपोषणामुळं झाले आहेत. महाराष्ट्रासाठी ही अत्यंत लज्जास्पद बाब आहे. कुपोषण निर्मुलनावर राज्य सरकारचा दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होऊनही यातून नेमकं कुणाचं पोषण होतं? असा गंभीर प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. सरकारने याची संपूर्ण वस्तूनिष्ठ चौकशी करून बालकांच्या टाळूवरचं लोणी वरपणाऱ्यांचे खरे चेहरे पुढं आणावेत, अशी मागणी देकील रोहित पवार यांनी कली आहे.
छापील उत्तर देण्यापलीकडं सरकारने काहीही केलं नाही
यापूर्वी अनेक अधिवेशनात कुपोषणामुळं होणाऱ्या मृत्यूचा विषय मांडला, पण केवळ छापील उत्तर देण्यापलीकडं सरकारने काहीही केलं नाही. आतातरी सरकारने संवेदना दाखवाव्यात आणि जग पाहण्यापूर्वीच जगातून एक्झिट घेणाऱ्या बालकांचा जीव वाचवावा असे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले.
बालमृत्यूच्या संदर्भात आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत दिली माहिती
महायुती सरकारच्या कार्यकाळात म्हणजे 2022-23 ते 2024-25 या 3 वर्षात राज्यात कुपोषणामुळे 14 हजार 526 बालमृत्यू झाले, अशी कबुली आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत दिली. हे बालमृत्यू मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, अकोला आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये शून्य ते पाच वर्षे वयोगटातील मुलांचे असल्याची धक्कादायक माहिती आबिटकर यांनी विधानसभेत उपस्थित झालेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात देण्यात आली आहे. कुपोषणामुळे होत असलेले बालमृत्यूं रोखण्यासाठी राज्य सरकार करोडो रुपये खर्च करुन विविध योजना राबवीत आहे. पण कुपोषणाचे प्रमाण वाढले असून 49 हजार बालमृत्यू झाले आहेत का, असा प्रश्न स्नेहा दुबे, मनोज जामसुतकर, चेतन तुपे आदींनी विधानसभेत उपस्थित केला होता. त्यावर आबिटकर यांनी 14 हजार 526 बालमृत्यू झाल्याचे म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या शाश्वत विकास ध्येय 2030 नुसार नवजात शिशू मृत्यू दर प्रति एक हजारामागे 12 पेक्षा कमी करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या:
























