Raj Thackeray VIDEO : धर्माच्या आधारे देश उभा राहू शकत नाही, जाती-पातीच्या राजकारणात अडकू नका; राज ठाकरेंचे आवाहन
Raj Thackeray Speech : लोकांना धर्माच्या आधारे भडकवलं जात आहे आणि त्यांच्या मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray Speech : आपल्या देशातील मूळ प्रश्न बाजूला ठेऊन लोकांना जातीपातीच्या राजकारणात गुंतवलं जात आहे. आपली तरूण पीढी याला बळी पडत आहे. धर्माच्या आधारे कोणतेही राष्ट्र उभारू शकत नाही असं राज ठाकरे म्हणाले. जगातले सर्व देश धर्माला बाजूला करून विकासाकडे जात आहेत, पण आपण धर्माच्या दिशेने परत जात आहोत असंही राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे हे मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात संबोधन करत होते.
काय म्हणाले राज ठाकरे?
धर्माच्या आधारे देश उभा करू शकत नाही हे पहिल्यांदा टर्की या देशाला समजलं. त्या ठिकाणी केमाल पाशा आले आणि त्यांनी धर्मावर आधारित सत्ता बाजूला ठेवली. धर्मामुळे देशाची प्रगती होणार नाही हे त्यांना समजलं. टर्की धर्मनिरपेक्ष करून इस्लामला राज्याचा धर्म म्हणून काढून टाकलं. शरिया कायदा बंद केला.
टर्कीला दरवर्षी पाच कोटी प्रवासी भेट देतात. वर्षाकाठी 400 अब्ज डॉलर्स त्यांना उत्पन्न मिळतंय.
हे देश धर्मातून बाहेर पडत आहेत आणि आपण धर्माकडे जातोय. ज्यावेळी लाऊड स्पीकर बंद करा म्हटल्यावर आमच्या कार्यकर्त्यांवर केसेस दाखल केल्या. आता देवेंद्र फडणवीस म्हणतात की आम्ही त्यावर कारवाई करणार. पण पाऊल मात्र उचललं नाही. त्या उत्तर प्रदेशात लाऊड स्पीकर बंद केली.
संतोष देशमुखांना क्रूरपणे मारलं
संतोष देशमुखांना किती क्रूरपणे मारण्यात आलं. पण हे सगळं झालं कशातून? खंडणी आणि राखेच्या पैशातून बीडमध्ये या घटना घडतात. बीडमधून राखेतून गुंड उभे राहतात. वाल्मिक कराडच्या खंडणीला विरोध केल्यानंतर संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली. त्यानंतर मराठा आणि वंजारी असा वाद निर्माण केला गेला आणि लोकांना त्यामध्ये गुंतवलं जात आहे.
आमच्या मुलांच्या शिक्षणाचा विषय कधीच आणणार नाहीत. रोज शेतकरी आत्महत्या करत आहेत. रोजगार निर्माण होत नाहीत. पण तरुणांना यांनी जातीच्या राजकारणात अडकवलं आहे.
मराठा समाजाला आरक्षण मागावं लागतंय
आजपर्यंत सर्वात जास्त मुख्यमंत्री, मंत्री, आमदार आणि खासदार हे मराठा समाजाचे होते. पण त्यांनी मराठा समाजासाठी काय केलं? समाजाला आरक्षण का मागावं लागतंय? जात जातीसाठी काहीच करत नाही. निवडणुकीच्या तोंडावर वाटेल त्या गोष्टी करणार आणि निवडणूक झाल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जाची रक्कम भरा म्हणून सांगत आहेत.
लाडक्या बहिणींना देण्यात येणारे पैसे हे वाढवणार असं हे म्हणतात. पण सरकारकडे पैसे आहेत का? कर्ज काढून दिवाळी साजरी का करता? मूळ रोजगाराचे, नोकऱ्यांचे प्रश्न आहेत ते पहिला सोडवलं पाहिजेत. या मुलांना जातीपातीमध्ये अडकवून राजकारण केलं जात आहे.























