65000 शाळा भांडवलदारांच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव, मराठी शाळा वाचवण्यासाठी विद्यार्थी संघटना आक्रमक
मराठी शाळांचं अस्तित्व वाचवण्यासाठी डावे प्रणित विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरली आहे. नागपुरात विद्यार्थ्यांच्या माध्यमातून लाल वादळ रस्त्यावर अवतरल्याचं पाहायला मिळालं.
Nagpur : मराठी शाळांचं अस्तित्व वाचवण्यासाठी डावे प्रणित विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरली आहे. नागपुरात विद्यार्थ्यांच्या माध्यमातून लाल वादळ रस्त्यावर अवतरल्याचं पाहायला मिळालं. "ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन" म्हणजेच AISF या डावे प्रणित विद्यार्थी संघटनेने आज नागपुरात शेकडो महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सोबत घेऊन मोठा मोर्चा काढला. हातात लाल झेंडे घेऊन यशवंत स्टेडियम वरून टेकडी पॉईंट पर्यंत पायी निघालेल्या शेकडो महाविद्यालयीन आणि शाळकरी विद्यार्थ्यांनी त्यांच्या सरकार विरोधी घोषणांनी सर्वांचे लक्ष वेधले.
65000 शाळांना भांडवलदारांच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव
विद्यमान राज्य सरकार मराठी शाळा बंद पाडण्याचा घाट घालत आहेत. राज्यात 18 हजार शाळा बंद करण्यात आल्या असून शाळा दत्तक योजनेचे नावाखाली आणखी 65000 शाळांना भांडवलदारांच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. शिवाय शिक्षणाचे बाजारीकरण करुन शिक्षण सामान्यांचे आवाक्याच्या बाहेर नेले जात आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे नावाखाली शिक्षण क्षेत्राचं भगवेकरण केले जाणार असल्याचा आरोपही या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
मोर्चानंतर शिष्टमंडळ पोलिसांसोबत शिक्षण मंत्र्यांना भेटण्यासाठी विधानभवनात दाखल, मात्र भेट झाली नाही
दुपारी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन म्हणजेच एआयएसएफने नागपूरच्या यशवंत स्टेडियम टेकडी रोड मोर्चा काढला होता. या मोर्चानंतर शिष्टमंडळ पोलिसांसोबत शिक्षण मंत्र्यांना भेटण्यासाठी विधानभवनात दाखल झाले आहे. तिथे असूनही शिक्षण मंत्री भेटले नाहीत. आम्हाला त्यांच्या स्टाफकडून अपमानास्पद वागणूक देण्यात आली अशा पद्धतीचा आरोप शिष्यमंडळामध्ये आलेल्या तरुणांनी केला आहे. यावेळी डावे प्रणित ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी विधान भवन समोर लाल सलाम अशा घोषणाबाजी देखील केल्याचं पाहायला मिळालं.
महाराष्ट्रात अनेक मराठी शाळा विद्यार्थी संख्या कमी झाल्याने आणि शिक्षण विभागाच्या धोरणांमुळे बंद पडण्याच्या मार्गावर
महाराष्ट्रात अनेक मराठी शाळा विद्यार्थी संख्या कमी झाल्याने आणि शिक्षण विभागाच्या धोरणांमुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. ज्यामुळे शिक्षक, पालक आणि भाषाप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यावर उपाय म्हणून शिक्षक संघटना आणि मराठी अभ्यास केंद्रासारख्या संस्थांनी आंदोलने सुरू केली आहेत. अनेक मराठी शाळांमध्ये विद्यार्थीसंख्या घटली आहे, विशेषतः १० पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळांवर बंद होण्याचा धोका आहे.
महत्वाच्या बातम्या:
Marathi : मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र सरसावले, 14 डिसेंबर रोजी परिषद, ठाकरे बंधूंना निमंत्रण
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI























