![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Majha Maharashtra Majha Vision | दहावी-बारावीच्या परीक्षा एप्रिल ते मे महिन्यात घेण्याचा विचार सुरु : वर्षा गायकवाड
MajhaVision2020 : एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात 'कोरोना काळात शिक्षण क्षेत्रासमोर अनेक मोठी आव्हानं आली. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्रात तंत्रज्ञानाचं एक फोरम निर्माण केलं पाहिजे.', असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी त्यांचं महाराष्ट्राबाबतचं व्हिजन स्पष्ट केलं.
![Majha Maharashtra Majha Vision | दहावी-बारावीच्या परीक्षा एप्रिल ते मे महिन्यात घेण्याचा विचार सुरु : वर्षा गायकवाड Majha Maharashtra Majha Vision 2020 Education Minister Varsha Gaikwad vision for Maharashtra Majha Maharashtra Majha Vision | दहावी-बारावीच्या परीक्षा एप्रिल ते मे महिन्यात घेण्याचा विचार सुरु : वर्षा गायकवाड](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/11/27200404/Varsha-Gaikvaad.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
#माझामहाराष्ट्रमाझंव्हिजन : 'कोरोना काळात शिक्षण क्षेत्रासमोर अनेक मोठी आव्हानं आली. कोरोना काळात एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली की, शैक्षणिक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा विकास होणं गरजेचं आहे. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्रात तंत्रज्ञानाचं एक फोरम निर्माण केलं पाहिजे'; असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. तसेच दहावी-बारावीच्या परीक्षा साधारणतः एप्रिल किंवा मे महिन्या दरम्यान घेण्याचा विचार सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्या एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमात बोलत होत्या.
'कोरोनामुळे शिक्षण व्यवस्था कशी सुरु करायची हा प्रश्न केवळ राज्यचं नाहीतर, संपूर्ण जगासमोर होता. त्यानंतर विविध माध्यमांतून शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु झाला. ऑनलाई, ऑफलाईन, एवढंच नाहीतर प्रत्येक जिल्ह्यांत जाऊन शिक्षकांनी विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही लोकांकडे मोबाईल नाही ही बाब लक्षात आल्यानंतर टेलिव्हिजन आणि काही दिवसांतच गूगलचा पर्याय निवडण्यात आला. एवढंच नाहीतर मुलांपर्यंत अभ्यासक्रम पोहोचवण्यासाठी व्हॉट्सअॅपचाही मार्ग वापरण्यात आला.'; कोरोना काळात शिक्षण खात्याने केलेल्या कामांबद्दल बोलताना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.
वर्षा गायकवाड यांनी बोलताना सांगितले की, 'कालांतराने विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळा सुरु करण्याचाही निर्णय घेण्यात आला. त्याअनुषंगाने नियमावली तयार करण्यात आली. त्यामध्ये निर्जंतुकीकरण, स्वच्छता आणि इतर सोयीसुविधांसह शिक्षकांच्या आरटीपीसीआर टेस्टही करण्यात आल्या. यानुसार, जवळपास 25 जिल्ह्यांमध्ये 9 हजार 127 शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. तर त्या शाळांमध्ये 3 लाख विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली आहे.'
दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतोय : वर्षा गायकवाड
'दहावी बारावीच्या परीक्षा या साधरणतः फेब्रुवारी आणि मार्चमध्ये घेतल्या जातात. परंतु, अद्यापही काही ठिकाणी शाळा सुरु आहेत, काही ठिकाणी सध्या शाळा सुरु करणं शक्य नाही. यासंदर्भात आपण शिक्षण तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेत आहोत. यासंदर्भात माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळासोबत चर्चा सुरु आहेत. प्रयत्न असा सुरु आहे की, सर्वसाधारणपणे मे किंवा एप्रिलमध्ये परीक्षा घेतल्या जाव्यात. कारण जूनमध्ये कोकणात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस असतो, तर मे महिन्यात विदर्भात प्रखर उन्हाळा असतो. त्यामुळे येत्या काळात निर्णय घेतला जाईल. ', असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांच्या मनावर दडपण राहू नये म्हणून आधीच 25 टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे, असंही त्यांनी सांगितलं.
पाहा व्हिडीओ : ...म्हणून शाळा सुरु करण्याचाही निर्णय घेण्यात आला : वर्षा गायकवाड
दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याचा प्रस्ताव तज्ज्ञांसमोर ठेवला होता, पण... : वर्षा गायकवाड
'दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यासंदर्भात उच्च माध्यमिक शिक्षण मंडळासमोर प्रस्ताव ठेवला होता. परंतु, दहावीचे, बारावीचे विषय हे खूप असतात. तसेच वेगवेगळ्या भाषाही असतात. त्यामुळे ऑनलाईन परीक्षा घेणं हे त्यांच्या दृष्टीने काहीसं कठीण आहे. त्यामुळे या दृष्टीकोणातून आधी काही बाबी तपासून घ्याव्या लागतील, असं त्यांना सांगितलं. त्या अनुषंगाने प्रयत्न सुरु आहेत.' ; असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.
दिवसभर दिग्गज नेत्यांकडून महाराष्ट्राचं व्हिजन फक्त एबीपी माझावर
नव्या सरकारला सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण होतंय. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झालं आणि एक नवी आघाडी उदयास आली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं. 28 नोव्हेंबर 2019 रोजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात यानिमित्ताने महाराष्ट्रातील गेल्या वर्षभरातील सरकारच्या कामाचा आढावा आणि महाराष्ट्राच्या भविताव्याविषयीचं सरकारच्या धोरणांबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
ऊर्जामंत्री नितीन राऊत, उद्योग मंत्री सुभाष देसाई, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे, अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि आदित्य ठाकरे या नेत्यांचा सहभाग असणार आहे. हे नेते महाराष्ट्रासाठीचं त्याचं व्हिजन मांडणार एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमात मांडणार आहेत.
'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' हा कार्यक्रम आज सकाळी दहा वाजल्यापासून एबीपी माझावर पाहता येणार आहे. एबीपी माझाच्या अधिकृत यू-ट्यूब चॅनल, फेसबुक पेजवर प्रेक्षकांना हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- 'मराठा आरक्षणाबाबत अपप्रचार, भाजपप्रणित संघटनांकडून मिठाचा खडा' : अशोक चव्हाण
- मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार ताकदीनं लढतंय : एकनाथ शिंदे
- वीजबिल माफीचं काय? 'राज्याचे पैसे केंद्रानं अडवले!', आजी-माजी ऊर्जामंत्री आमनेसामने
- Majha Maharashtra Majha Vision | 51 हजार कोटींच्या सामंजस्य करारातून नवे एक लाख रोजगार तयार होत आहेत : सुभाष देसाई
- Majha Maharashtra Majha Vision | वीजबिल माफी माझं व्यक्तिगत मत नव्हतंच, तो सरकारचा निर्णय : नितीन राऊत
- वीज बिलमाफीचं क्रेडिट शिवसेनेनं घ्यायचं की राष्ट्रवादीनं, यात नितीन राऊतांचा बळी : चंद्रशेखर बावनकुळे
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)