महाराष्ट्रात 30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान पावसाची शक्यता
विदर्भात मात्र थंडीने जोर पकडला असून अनेक जिल्ह्यातील किमान सरासरी तापमान 15 अंश सेल्सिअस खाली आले आहे. त्यामुळे अनेक शहरांमध्ये गारवा निर्माण झाला आहे.

मुंबई : ऑक्टोबरमध्ये हिट आणि पावसाळा अनुभवल्यानंतर नोव्हेंबरमध्ये देखील वरुणराज बरसल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. आता पुन्हा एकदा डिसेंबरच्या सुरुवातीला राज्यात पुन्हा एकदा पावसाच्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 30 नोव्हेंबर रोजी अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने सोबतच बंगालच्या उपसागरात देखील कमी दाबाचे क्षेत्र असल्याने आंध्र प्रदेश, तामिळनाडूत पाऊस होतो आहे. अशातच राज्यात देखील अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने पावसाची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून व्यक्त करण्यात आली आहे. तिकडे विदर्भात मात्र थंडीने जोर पकडला असून अनेक जिल्ह्यातील किमान सरासरी तापमान 15 अंश सेल्सिअस खाली आले आहे. त्यामुळे अनेक शहरांमध्ये गारवा निर्माण झाला आहे.
30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात पाऊस बघायला मिळू शकतो. प्रामुख्याने उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पालघर, ठाणे, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगावआणि औरंगाबादमध्ये काही ठिकाणी 1 आणि 2 डिसेंबर रोजी सरी कोसळतील. अशात शेतकऱ्यांना याचा फटका बसू शकतो.
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने वाऱ्यांचा वेग अधिक असल्याने मच्छिमारांना 1 आणि 2 डिसेंबर रोजी समुद्रात जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. वाऱ्याचा वेग ताशी 65 किलोमीटरवर पोहोचण्याची शक्यता असल्यानं एक आणि दोन तारखेला दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीजवळच्या तर दोन आणि तीन तारखेला उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीजवळच्या समुद्रात मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून देण्यात आला आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना 1 आणि 2 डिसेंबर रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे. ज्यात 15 मिमी ते 64 मिमीपर्यंतच्या पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यातआला आहे. ज्यात मेघगर्जनांसह पावसाची शक्यता आहे तर मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबादसारख्या जिल्ह्यांनादेखील 1 आणि 2 डिसेंबरला यलो अलर्ट देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना ह्या पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
संबंधित बातम्या :



















