![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Bacchu Kadu : राज्यमंत्री बच्चू कडू अडचणीत, 1 कोटी 95 लाखांच्या अपहाराचा आरोप, गुन्हे दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
Bacchu Kadu : महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका मंत्र्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक अपहार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
![Bacchu Kadu : राज्यमंत्री बच्चू कडू अडचणीत, 1 कोटी 95 लाखांच्या अपहाराचा आरोप, गुन्हे दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश Maharashtra Political marathi News Minister of State Bacchu kadu accused of embezzling Rs 1 crore 95 lakh court orders to file charges Bacchu Kadu : राज्यमंत्री बच्चू कडू अडचणीत, 1 कोटी 95 लाखांच्या अपहाराचा आरोप, गुन्हे दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/27/a5ee92ccb4425e7f405aa54a17684e95_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bacchu Kadu : महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका मंत्र्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यमंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडूंविरोधात तपास करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश अकोला जिल्हा न्यायालयाने दिले आहेत. कलम 156/3 अंतर्गत हे गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकरांनी यासंदर्भात बच्चू कडूंविरोधात ही तक्रार दाखल केली होती. अकोला जिल्ह्यातील तीन रस्ते कामांत 1 कोटी 95 लाखांच्या आर्थिक अनियमिततेचा हा आरोप होता. पालकमंत्र्यांनी अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांच्या कामांना मंजूरी देत आर्थिक अपहार केल्याचा गंभीर आरोप वंचितनं केला होता. वंचितनं यासंदर्भात राज्यपालांकडेही कारवाईसाठी परवानगी मागितली होती. न्यायालयानं या प्रकरणात अपहार झाल्याचं प्राथमिक मत नोंदवत गुन्हे दाखल करण्याचे आदेश सिटी कोतवाली पोलिसांना दिले आहेत.
काय आहे प्रकरण?
वंचित बहुजन आघाडीनं अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर आर्थिक अपहाराचे गंभीर आरोप केले होते. पालकमंत्री बच्चू कडूंनी अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर निधी वळता करीत 1 कोटी 95 लाखांचा अपहार केल्याचा आरोप वंचितनं केला होता. याची ठिणगी तीन रस्त्यांच्या कथित कामांवरून पडली. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील शिफारस केलेली रस्त्यांची कामं पालकमंत्री कडूंनी डावलल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेला डावलत आपल्या मर्जीतील रस्त्यांची कामं नियमबाह्यपणे करवून घेतल्याचा आरोप वंचितनं केला. यातील दोन रस्ते अस्तित्वातच नसल्याचे पुरावे त्यांनी सादर केले होते. या तीन रस्त्यांच्या कामांत बच्चू कडूंनी १ कोटी ९५ लाखांचा अपहार केल्याचा आरोप वंचितनं केला होता. यात जिल्हा परिषदेच्या अधिकारावर पालकमंत्र्यांनी अतिक्रमण केल्याचं वंचितनं म्हटलं होतं. यात रस्त्यांचे 'ग्रामा (ग्रामीण मार्ग) क्रमांक' नसतांना कामांना प्रशासकीय मान्यता कशी मिळू शकते, असा सवाल वंचितनं केला होता. दरम्यान, वंचितच्या तक्रारीनंतर अकोल्याच्या जिल्हाधिकारी निमा अरोरांनी या तीन रस्त्यांसह 25 कामांना दिली स्थगिती दिली होती.
'या' रस्त्यांच्या कामात अपहार झाल्याचा वंचितचा आरोप
-गायगाव ते रिधोरा रस्त्याला जोडणारा लहान पुल आणि पोचमार्गाच्या कामात 50 लाखांच्या अपहाराचा आरोप.
-इजिमाला जोडणाऱ्या धामना ते नवीन धामना जोड रस्ता सुधारणेच्या कामात 20 लाखांच्या अपहाराचा आरोप.
-कुटासा ते पिंपळोद मार्गाला जिल्हा मार्ग मार्ग दाखवत यासाठी निधी वळता करीत 1 कोटी 25 लाखांच्या अपहाराचा आरोप.
-पोलिसांनी तक्रार न घेतल्याने वंचितची न्यायालय आणि राज्यपालांकडे धाव.
राज्यमंत्री बच्चू कडू यांनी फेटाळले होते आरोप
याप्रकरणी पोलिस कारवाई होत नसल्यानं वंचितनं अकोला जिल्हा न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर जिल्हा न्यायालयाने या प्रकरणात सकृतदर्शनी गैरव्यवहार झाल्याचं प्राथमिक निरिक्षण नोंदवलं होतं. यासंदर्भात पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर कारवाईसाठी राज्यपालांची परवानगी घेण्याचं न्यायालयानं सुचित केलं होतं. यासाठी 90 दिवसांची मुदत देण्यात आली होती. यासंदर्भात वंचितच्या शिष्टमंडळानं 7 फेब्रूवारीला प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांची भेट घेत कारवाईसाठी परवानगीची मागणी केली होती. मात्र, वंचितनं यासंदर्भात सर्वात आधी आरोप केल्यानंतर बच्चू कडू यांनी आर्थिक अनियमिततेचे आरोप फेटाळले होते. यासंदर्भात वंचितकडून तांत्रिक बाबींचा आधार घेत गैरसमज पसरवला जात असल्याचं राज्यमंत्री कडू म्हणाले होते. दरम्यान, यासंदर्भात आपले राजकीय मित्र असलेल्या प्रकाश आंबेडकरांच्या पक्षानं हे आरोप केल्याचं दु:ख असल्याचे राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले होते.
बच्चू कडूंवर त्वरीत गुन्हे दाखल करा : वंचित बहुजन आघाडी
दरम्यान, न्यायालयाच्या या आदेशानंतर वंचित बहुजन आघाडीनं राज्यमंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडूंवर त्वरीत गुन्हे दाखल करण्याची मागणी अकोला पोलिसांकडे केली आहे. न्यायालयाच्या आदेशाला तरी अकोला पोलीस माननार की नाही?, असा प्रश्न वंचित बहूजन आघाडीनं अकोला पोलिसांना केला आहे. बच्चू कडू आणि प्रकाश आंबेडकरांचे राजकीय संबंध तसे चांगले आहेत. मात्र, वंचितनं थेट बच्चू कडूंवर आर्थिक अपहाराचा आरोप करणं त्यांच्या अलीकडे बिघडलेल्या संबंधावर प्रकाश टाकणारा आहे. या दोन नेते आणि पक्षांमधले संबंध या आरोप-प्रत्यारोपांनंतर भविष्यात कसे राहतात?, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)