![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Balasaheb Thackeray : असं काय घडलं होतं की, बाळासाहेब ठाकरेंनी दोन वेळा दिला होता राजीनामा!
Maharashtra Political Crises : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना आवाहन करत पक्षप्रमुख पद आणि मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार असल्याचं सांगितलं. यापूर्वी बाळासाहेब ठाकरेंनीही दोन वेळा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं होतं.
![Balasaheb Thackeray : असं काय घडलं होतं की, बाळासाहेब ठाकरेंनी दोन वेळा दिला होता राजीनामा! Maharashtra Political Crises When Shiv Sena supremo Balasaheb Thackeray had resigned twice CM Uddhav Thackeray Marathi News Balasaheb Thackeray : असं काय घडलं होतं की, बाळासाहेब ठाकरेंनी दोन वेळा दिला होता राजीनामा!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/23/66ca65da9fac59f8d9371dcdbc9b2651_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra Political Crises : महाराष्ट्रात सुरू असलेलं राजकीय घमासान हे क्षणाक्षणाला चिघळत चाललं आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेलं बंड जितकं अनपेक्षित, तितकंच धक्कादायक. शिवसेनेनं याआधी बंड पाहिलं नाही असं कधी झालं नाही. बळवंत मंत्री, माजी महापौर हेमचंद्र गुप्ते, छगन भुजबळ, नारायण राणे (Narayan Rane) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) अशा अनेकांनी बंड केला. पण शिवसेना (Shivsena) संपवण्यात यशस्वी तसं कुणीच झालं नाही. अगदी शिवसेनेच्या स्थापनेपासून ते अलिकडच्या काळातसुद्धा शिवसेना संपली, असं अनेकवेळा म्हटलं गेलं, पण मुख्यमंत्री म्हणाले तसे, राखेतून पुन्हा नव्यानं शिवसेना उभी राहिलीच.
एकनाथ शिंदे यांना कदाचित अखेरचा प्रयत्न म्हणून उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदाचाच नाही तर पक्षप्रमुख पदाचा ही राजीनामा देतो, असं म्हटलं आणि शिंदेंसह तमाम शिवसैनिकांना भावनिक साद घातली. मात्र या संपूर्ण घटनेत अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे, शिवसेनेत हे पहिल्यांदा घडत नाहीए. नाराजी, बंड, राजीनामे हे सगळं शिवसेना सुरुवातीपासून पाहत आली आहे. आधी नगरसेवक, नंतर आमदार, खासदार, मंत्री आणि आता थेट मुख्यमंत्री बसवण्यापर्यंतचा हा शिवसेनेचा प्रवास रंजक आहे.
शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे म्हणजे शिवसेना हे समीकरणच. शिवसेनेच्या याच वाटचालीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी चक्क दोनदा राजीनामा देण्याचं जाहीर केलं होतं.
1978 : पहिला राजीनामा
1973 साली मुंबईत शिवसेनेचा चांगलाच दबदबा होता. मुंबईचे महापौर होते सुधीर जोशी आणि शिवसेनेच्या एकूण जागा होत्या 40. मुंबईत इतकी ताकत असतानाही आणीबाणी उठवल्यानंतर 1978 साली झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेची एकही जागा निवडून आली नाही, पक्षाचा दारुण पराभव झाला होता. त्यावेळी शरद पवार यांनी काँग्रेसला धक्का देत राज्यात पुलोदची सत्ता आणली होती. शिवसेनेच्या पराभवानंतर बाळासाहेब ठाकरे चांगलेच चिडले आणि शिवसैनिकांना त्यांनी अट घातली. येणारी मुंबई मनपा निवडणूक हरलो तर शिवसेनाप्रमुख पदाचा राजीनामा देईन, असं बाळासाहेब ठाकरे यांनी स्पष्टच सांगितलं. त्याच वर्षी झालेल्या मुंबई मनपाच्या निवडणुकीत शिवसैनिकांनी प्रचंड मेहनत घेतली. मात्र यश काही हाती लागलंच नाही. शिवसेनेच्या 1973 च्या तुलनेत 19 जागा कमी आल्या, फक्त 22 जागांवर शिवसेना नगरसेवक निवडणून आले.
यानंतर काहीच दिवसात शिवसेनेची मुंबईत एक सभा झाली. त्या सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. शिवसैनिकांसाठी हा मोठा धक्का होता. बाळासाहेबांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी होऊ लागली. सर्व कार्यकर्त्यांनी मंचाजवळ येऊन बाळासाहेबांची मनधरणी केली. अखेर बाळासाहेब तयार झाले आणि त्यांनी राजीनामा मागे घेतला. इथं असंही म्हणतात की, या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव हा 1975 सालच्या आणीबाणीला दिलेल्या अघोषित समर्थनामुळे झाला.
1992 : दुसरा राजीनामा
शिवसेनेचा विस्तार हळुहळु राज्यभर झाला. मराठवाडा नामांतरासारख्या विषयांमध्ये बाजू मांडत पक्ष कानाकोपऱ्यात नेला. मात्र याच दरम्यान ठाकरे कुटुंबातील दोन लहान मुलं मोठी होत होती. बाळासाहेब ठाकरे यांचे फट्या आणि दादू म्हणजेच, राज आणि उद्धव ठाकरे. 80च्या दशकात राज ठाकरे 20 वर्षांचे असताना त्यांच्यावर भारतीय विद्यार्थी सेनेची जबाबदारी टाकली तर उद्धव ठाकरे यांना 1989 साली सामानाची जबाबदारी देण्यात आली. ठाकरे घराण्यातील दोन्ही मुलं आता थोडं फार का होईना राजकारणात सक्रिय झाली होती. मात्र हीच बाब अनेकांना खटकली आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यावर घरणेशाहीचे आरोप होऊ लागले.
अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिट्ठी दिली होती. तर काही जाण्याच्या मार्गावर होते. शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याविरोधात जणू बंडच पुकारला होता. मात्र यावेळी सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांनी मी राजीनामा देतो, असं म्हणत राज्यभरात धुरळा उडवला. जुलै महिन्यात त्यांनी पक्षाचं मुखपत्र असलेल्या सामानात 'जय महाराष्ट्र' अशी हेडलाईन देत स्पष्ट इशाराच दिला. तेव्हा मुंबईत वातावरण चांगलंच तापलं होतं. मात्र कट्टर शिवसैनिक जुलैच्या त्या भर पावसात मातोश्री बाहेर जमले आणि बाळासाहेबांची मनधरणी करण्याचे प्रयत्न करू लागले. काही वेळ गेला आणि त्यांना यश आलंच, कार्यकर्त्यांचं प्रेम पाहून त्यांनी पुन्हा आपला राजीनामा मागे घेतला.
राजकारणात संघर्ष हा कधी संपत नसतो. पक्षांतर्गत वाद देखील अनेक होतात. मात्र Damage Control ज्याला जमतं तोच सिकंदर मानला जातो. येत्या काळात उद्धव ठाकरे डॅमेज कंट्रोल करतात की, राजीनामा देतात हे पाहण्यासारखं असेल.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)