Maharashtra Mumbai Rains LIVE : राज्यात पावसाचा जोर कमी, पुराचं पाणी ओसरु लागल्यानं नागरिकांना दिलासा
राज्यात काही प्रमाणात पावसाचा जोर कमी झाला आहे. हळूहळू पूरस्थिती नियंत्रणात येत आहे. त्यामुळं नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Background
Maharashtra Rain Updates LIVE : आठवडाभरात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले होते. तर अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्यानं शेतीचंही नुकसान झालं आहे. दरम्यान, कालपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळं ज्या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती, त्या ठिकाणी पाणी हळूहळू कमी होत आहे. त्यामुळं नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, कोकण, गोवा, कर्नाटक आणि उत्तर केरळ किनारपट्टीलगत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्याच्या अनेक भागात पावसानं धुमाकूळ घातल्यानं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पूर आल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच शेतीला देखील मोठा फटका बसला आहे. विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यात गंभीर स्थिती झालीी आहे. तसेच मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली या भागात देखील पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्याचबरोबर मुंबईसह ठाणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातही चांगला पाऊस पडत आहे.
वर्धा जिल्ह्यात पावसाचा जोर कमी
आठवडाभरापासून वर्धा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणचे मार्ग ठप्प झाले आहेत. कालपासून पावसाने थोडीशी उघडीप दिल्याने पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. मात्र अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.
कोल्हापुरात पुराचा धोका टळला
गेल्या आठवडाभर कोल्हापूर जिल्ह्यासह शहरात पावसाने धूमशान घातल्यानंतर पावसाचा जोर कमी होऊ लागला आहे. त्यामुळं सद्यस्थितीमध्ये पुराचा धोका टळला आहे. पंचगंगा नदी काल स्थिर पातळीवर राहिल्यानंतर आता पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. दिलासादायक म्हणजे अलमट्टी धरणातूनही पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे. अलमट्टीतून दीड लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पुराचा जोर ओसरू लागला असला, तरी अजूनही जिल्ह्यातील 61 बंधारे पाण्याखाली आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे. पावसाचा जोर असाच कमी राहिल्यास पाणी वेगाने कमी होण्याची शक्यता आहे.
गडचिरोलीतल सिरोंचामध्ये भितीदायक स्थिती
मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहेत. विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी भयावह स्थिती झाली आहे. जिल्ह्यातील तेलंगणाच्या टोकावर असलेल्या सिरोंचा इथं भयावह स्थिती झाली आहे. गेल्या पाच दिवसांपासून या शहराला चारही बाजूनं पाण्यानं वेढा दिला आहे. त्यामुळं नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
Aurangabad: दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर औरंगाबादमध्ये पाऊसाची पुन्हा जोरदार बॅटिंग
Aurangabad Rain: गेल्या आठवड्यात जोरदार हजेरी लावणाऱ्या पावसाने गेली दोन दिवस विश्रांती घेतली होती. त्यांनतर मात्र आज पुन्हा पाऊसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली आहे. गंगापूरमध्ये दुपारी तीन वाजता जोरदार पावसाला सुरवात झाली आहे. गंगापूर शहरातील चौकात अचानक आलेल्या पावसामुळे काही वेळेसाठी लोकांची धावपळ उडाल्याची पाहायला मिळाली.
उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएकडून जगदीप धनकड यांना उमेदवारी, थोड्याच वेळात विरोधकांची बैठक
उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएकडून जगदीप धनकड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर थोड्याच वेळात विरोधकांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक आहे.
























