![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Maharashtra Lockdown : रेड झोनमधील जिल्हे वगळता राज्यातील लॉकडाऊन 1 जूननंतर शिथिल होण्याची शक्यता, विजय वडेट्टीवार यांचे संकेत
रेड झोनमधील जिल्हे वगळता राज्यातील लॉकडाऊन 1 जूननंतर शिथिल होण्याची शक्यता आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबतचे संकेत दिले. तसंच मुंबईतील लोकल पुढील 15 दिवस तरी सर्व प्रवाशांसाठी खुली करता येणार नाही, असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं.
![Maharashtra Lockdown : रेड झोनमधील जिल्हे वगळता राज्यातील लॉकडाऊन 1 जूननंतर शिथिल होण्याची शक्यता, विजय वडेट्टीवार यांचे संकेत Maharashtra Lockdown is likely to ease after June 1, with the exception of districts in the red zone of covid-19 Maharashtra Lockdown : रेड झोनमधील जिल्हे वगळता राज्यातील लॉकडाऊन 1 जूननंतर शिथिल होण्याची शक्यता, विजय वडेट्टीवार यांचे संकेत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/18/78f4565ac7b3c49828f6aa4f6f657080_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : महाराष्ट्रातील कोरोना संसर्ग असलेल्या रेड झोनमधील जिल्हे वगळता राज्यातील लॉकडाऊन 1 जूननंतर शिथिल होण्याची शक्यता आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी हे संकेत दिले आहेत. पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. राज्यातील 14 जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या बघूनच लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाईल, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं.
महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे राज्य सरकार रेड झोनमधील जिल्हे वगळता इतर जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याच्या विचारात आहे. पुढच्या पाच ते सहा दिवसात काय परिस्थिती असेल हे पाहून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.
रेड झोनमधील जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आठवड्याभर आढावा घेऊन जिल्हानिहाय त्याबाबत निर्णय घेतले जातील. रेड झोनमधील जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी झाली नाही तर कडक लॉकडाऊन कायम राहणार आहे, असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं.
राज्यातील 14 जिल्हे रेड झोनमध्ये
विजय वडेट्टीवार म्हणाले की, "कालच्या माहितीप्रमाणे राज्यातील 14 जिल्हे रेड झोनमध्ये आहेत.
तिथले निर्बंध सरसकट शिथिल करता येणार नाहीत. कन्टेन्मेंट झोन करुन तिथे नियम कडक करावे लागतील तर जिथे रुग्ण संख्या कमी तिथे नियम शिथिल करावे लागतील.
सर्वसामान्यांसाठी मुंबईल लोकलचा प्रवास पुढील 15 दिवस नाहीच
मुंबईतील कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे, पण संपलेला नाही. लोकल ट्रेन आम्ही अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरु ठेवल्या आहे आणि त्याचा परिणाम दिसत आहे. काही वेळ तरी यावर निर्बंध ठेवावे लागतील. सरसकट सूट दिली तर गर्दी होईल. त्यामुळे लोकल पुढील 15 दिवस तरी सर्व प्रवाशांसाठी खुली करता येणार नाही, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.
रुग्णांना होम क्वॉरन्टीन नाही तर कोविड सेंटर किंवा संस्थात्मक क्वॉरन्टीन करणार
"रुग्णसंख्या वाढत असणाऱ्या जिल्ह्यात घरातच क्वॉरन्टीन करण्याची सुविधा रद्द करण्यात आली आहे. तिथे कोविड सेंटर किंवा संस्थेमध्येच क्वॉरन्टीन केलं जाणार आहे. कोरोनाबाधित रुग्णांना गृह विलगीकरण ठेवण्यात अर्थ नाही. कारण यामुळे कुटुंबच्या कुटुंब कोरोनाबाधित होतात. त्यामुळे त्यांना संस्थात्मक विलगीकरणातच ठेवलं पाहिजे," असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)