Maharashtra Corona LIVE Updates : नाशिकमध्ये तूर्तास लॉकडाऊन होणार नाही : पालकमंत्री छगन भुजबळ
Maharashtra Covid 19 Cases LIVE Updates | राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तर काही ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत

Background
राज्यात लॉकडाऊन लागणार का? आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणतात...
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत रोज विक्रमी वाढ होताना दिसत आहे. त्यामुळ सर्वांनाच एक प्रश्न पडला आहे तो म्हणजे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू होणार का? राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत बोलताना म्हटलं की, लॉकडाऊन सध्या कुणालाच नको आहे. पण परिस्थिती येते तेव्हा तहान लागल्यावर विहीर खोदू शकत नाही. लॉकडाऊन ऐनवेळी लावणे शक्य नाही, त्याचा अभ्यास करावा लागतो, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली, असं राजेश टोपे यांनी म्हटलं. राज्यात कोरोनाची संख्या वाढते, याबाबत चिंता आहे. सर्व क्षेत्राचा अभ्यास करुन लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जातो. परिस्थितीवर नजर ठेवून निर्णय होतो. निर्बंध अधिक कडक करावे लागतात. लोकांकडून प्रतिसाद मिळत नाही, जनतेचा बिनधास्तपणा कोरोना रुग्णवाढीला कारणीभूत आहे, असंही राजेश टोपे यांनी म्हटलं.
राज्यात 'इतक्या' कोरोनाबाधितांची वाढ; बरं होणाऱ्या रुग्णांपेक्षा नव्या बाधितांचा आकडा जास्तच
महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. दररोज हजारोंच्या संख्येनं नव्या कोरोनाबाधितांचा आकडा आरोग्य विभागाकडून प्रसिद्ध करत परिस्थिती किती गंभीर वळणावर पोहोचली आहे, याची माहिती देण्यात येते. सोमवारी महाराष्ट्राच्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार दिवसभरात 20854 कोरोना रुग्णांनी या संसर्गावर मात केली असून, त्यांना रग्णालयातून रजा देण्यात आली. तर, दिवसभरात 31 हजार 643 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. राज्यात नव्यानं आढळणाऱ्य़ा कोरोना रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा कमीच दिसत आहे. सध्याच्या घडीला राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 85.71 टक्क्यांवर पोहोचलं आहे. तर मृत्यूदर 1.98 टक्क्यांवर पोहोचला आहे. सोमवारी दिवसभरात कोरोनामुळं 102 जणांचा मृच्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या राज्यात विविध भागांमध्ये 336584 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करण्यावर राज्य शासनानं भर दिला आहे. या निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण राज्यात रविवारी (दिनांक 28 मार्च 2021) रात्रीपासून जमावबंदी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.
महाराष्ट्रात आज उच्चांकी लसीकरण, 3 लाखांहून अधिक जणांचे लसीकरण
राज्यात आजपासून 45 वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाला सुरूवात झाल्याच्या पहिल्याच दिवशी 3295 लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून सुमारे ३ लाखांहून अधिक जणांना लस देण्यात आली. राज्यात आज आतापर्यंतचे सर्वाधिक लसीकरण झाले असून एकाच दिवशी 57 हजार जणांना लसीकरण करून पुणे जिल्हा राज्यात अग्रेसर राहीला आहे. त्यापाठोपाठ मुंबईत देखील 50 हजार जणांचे लसीकरण आज झाले.
आज अखेर महाराष्ट्राने देशभरात सर्वाधिक सुमारे 65 लाखांहून नागरिकांना लसीकरण करून पहिल्या क्रमांकात सातत्य राखले आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्य पहिल्यापासूनच अग्रसेर राहीले आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी दररोज तीन लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असून दररोज किमान पावणे तीन लाख नागरिकांना लसीकरण केले जात आहे. आज तीन लाखांहून अधिक जणांना लसीकरण करण्यात आले.
नाशिकमध्ये तूर्तास लॉकडाऊन होणार नाही : पालकमंत्री छगन भुजबळ
नाशिकमध्ये तूर्तास लॉकडाऊन होणार नाही असं मत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलय. आज संध्याकाळी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला संपूर्ण नाशिक जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं. शासकीय अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. लॉकडाऊन हा मार्ग होऊ शकत नाही, गरिबांचे हाल होतील अनेक उद्योगधंदेही बसतील तसेच रोजीरोटीचा प्रश्न उभा राहील, असं मत भुजबळांनी व्यक्त करत कोरोना पूर्ण कधीच बरा होऊ शकत नाही. त्यामुळे सध्या आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यावर आम्ही भर देत असल्याचंही म्हंटलय. विशेष म्हणजे कोरोना रुग्णसंख्येला नागरिकांसोबतच आमच्या अधिकाऱ्यांनीही बेफिकिरपणा दाखवला, एक महिन्यापूर्वीच अधिक जोमाने कारवाया झाल्या असता तर फरक पडला असता असं म्हणत अधिकाऱ्याना त्यांनी चांगलेच धारेवर धरल्याने हा चर्चेचा विषय ठरलाय.























