कृषीमंत्री कोकाटेंनी शेतकऱ्यांची माफी मागावी, त्यांच्या वक्तव्यामुळं स्वाभिमानी शेतकऱ्यांचा अपमान, किसान सभा आक्रमक
कृषीमंत्री कोकाटे यांचे विधान शेतकऱ्यांचा स्वाभिमान दुखावणारे आहे. किसान सभेच्या वतीने त्यांच्या या वक्तव्याचा धिक्कार करत असल्याचे मत किसान सभेचे नेते डॉ. अजित नवलेंनी (Ajit NaWal) व्यक्त केले. Crop Insurance

Ajit NaWale on Manikrao Kokate : भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही. आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा (Crop Insurance) दिला, असं वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचा विविध स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. त्यांचे हे विधान शेतकऱ्यांचा स्वाभिमान दुखावणारे व स्वाभिमानी शेतकऱ्यांचा अपमान करणारे आहे. किसान सभेच्या वतीने त्यांच्या या वक्तव्याचा आम्ही धिक्कार करत असल्याचे मत किसान सभेचे नेते डॉ. अजित नवलेंनी (Ajit NaWal) व्यक्त केलं आहे.
कोकाटेंनी शेतकऱ्यांची अप्रत्यक्षपणे भिकाऱ्यांशी तुलना केली आहे, त्यांच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध असल्याचे नवले म्हणाले. भिकारी सुद्धा दिलेला एक रुपया घेत नाही, आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा दिला, असे वक्तव्य राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले आहे. कृषीमंत्र्यांचे हे विधान स्वाभिमानी शेतकऱ्यांचा घोर अपमान करणारे आहे.
भिकारी एक रुपया घेत नाही, शेतकरी मात्र एक रुपयात पीक विमा घेतात असाच त्यांच्या वक्तव्याचा अर्थ होतो असे नवले म्हणाले.
शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे रास्त दाम दिले असते तर...
शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे रास्त दाम दिले असते, त्यांची लूट केली नसती, तर त्यांना अशा दीड दमडीच्या योजनांची कोणतीही आवश्यकता भासली नसती, ही बाब कृषीमंत्र्यांनी लक्षात ठेवावी असे नवले म्हणाले. शेतकऱ्यांसाठी किंवा श्रमिकांसाठी राबवण्यात येत असणाऱ्या योजना, शेतकरी श्रमिकांच्या कष्टाच्या पैशातून भरलेल्या सरकारी तिजोरीतूनच राबवण्यात येतात. कृषिमंत्र्यांच्या किंवा इतर कोणत्याही मंत्र्यांच्या खाजगी मालमत्तेच्या पैशातून या योजना राबवण्यात येत नाहीत ही बाब सुद्धा कृषिमंत्र्यांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे.
कृषिमंत्र्यांनी मानसिकता सुधारण्याची आवश्यकता
सोयाबीनची सरकारी खरेदीची मुदत वाढवण्याबाबत पत्रकारांनी कृषिमंत्र्यांना प्रश्न विचारला असता, ही बाब कृषी विभागाच्या अखत्यारीत येत नसून ती पणन विभागाच्या अंतर्गत येते असे उत्तर देत, याच कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांना घामाचे दाम देण्याची जबाबदारी झटकली होती असे नवले म्हणाले. स्वतः शेतकऱ्यांची लूट थांबवण्याची व त्यांना घामाचे दाम देण्याची जबाबदारी घ्यायची नाही. दुसऱ्या बाजूला त्यांच्याच कष्टाच्या पैशातून भरलेल्या तिजोरीतून राबवण्यात येत असलेल्या योजनांच्या अंमलबजावणी बाबत, शेतकरी श्रमिकांचा अपमान करणारी विधाने करायची. कृषिमंत्र्यांची ही मानसिकता सुधारण्याची नितांत आवश्यकता आहे असे नवले म्हणाले.
कृषीमंत्र्यांनी व राज्य सरकारने माफी मागावी
कृषीमंत्र्यांनी व राज्य सरकारने सदरील वक्तव्याबद्दल माफी मागावी, आपले विधान मागे घ्यावे व शेतकऱ्यांना घामाचे दाम देता येईल यासाठी शेतीमालाची रास्त दराने सरकारी खरेदीची मुदत वाढवत शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी किसान सभेच्या वतीने आम्ही करतो आहोत असे नवले म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
Crop Insurance Manikrao Kokate: हल्ली भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयांत पीक विमा दिला: माणिकराव कोकाटे
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

