Jayakwadi Dam Water Storage: मराठवाड्याला मोठा दिलासा! अवघ्या 27 दिवसांत जायकवाडीत 25 टीएमसी पाण्याची भर; पाणीसाठा कुठवर?
आगामी काळातही पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातील पाणीसाठा आणखी वाढण्याची शक्यता जलसंपदा विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Chhatrapati Sambhajinagar: नाशिक जिल्ह्यासह गोदावरी नदीच्या वरच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसाचा मोठा फायदा मराठवाड्यातील हजारो गावांची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाला (Jayakwadi Dam Water Storage) झाला आहे. अवघ्या 27 दिवसांत जायकवाडी धरणात सुमारे 25 टीएमसी पाण्याची भर पडली असून, धरणातील जिवंत पाणीसाठा 62 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
28 जुलै रोजी सकाळी प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, जायकवाडी धरणात 610.880 दशलक्ष घनमीटर इतका जिवंत पाणीसाठा नोंदविण्यात आला आहे. वरच्या धरणांतून सुरू असलेल्या विसर्गामुळे धरणात पाण्याची आवक कायम असून, येत्या काही दिवसांतही पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अवघ्या 27 दिवसांत 25 टीएमसी पाण्याची भर
मान्सूनच्या सुरुवातीला जायकवाडी धरणातील कमी पाणीसाठ्यामुळे चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, जुलै महिन्यात नाशिकसह गोदावरीच्या वरच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. 1 जुलै रोजी धरणातील जिवंत पाणीसाठा 130. 659 दशलक्ष घनमीटर (27 टक्के) इतका होता. त्यानंतर अवघ्या 27 दिवसांत तो वाढून 610. 880 MCM (62 टक्के) इतका झाला आहे.
वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा
जायकवाडीतील सध्याचा पाणीसाठा छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या गरजा, सुमारे 300 गावांचा पाणीपुरवठा तसेच औद्योगिक वापरासाठी वर्षभर पुरेसा मानला जात आहे. त्यामुळे मराठवाड्यातील पाणीटंचाईची चिंता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. दरम्यान, गोदावरीच्या वरच्या धरणांतून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे जायकवाडीतील आवक कायम आहे. त्यामुळे आगामी काळातही पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातील पाणीसाठा आणखी वाढण्याची शक्यता जलसंपदा विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्हा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे गोदावरी नदीला मोठा पूर आला असून, धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. परिणामी, जायकवाडीतील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत असून मराठवाड्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. खरीप हंगामासाठी सिंचनाची उपलब्धता आणि पिण्याच्या पाण्याची भविष्यातील गरज लक्षात घेता ही पाण्याची आवक अत्यंत दिलासादायक ठरत असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
Before You Go
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!
महत्त्वाच्या बातम्या






















