अयोध्येत 30 एकर जमिनीवर भव्य बौद्धविहार बांधणार : रामदास आठवले
अयोध्येत राम मंदिराच्या आधीदेखील बौद्ध विहार होतं. त्याचे अवशेष देखील मिळाले आहेत. त्यामुळे भव्य बौद्ध विहार करण्याचा आमचा मानस आहे.

मुंबई : गायक आनंद शिंदे यांच्या मागणीच्या आधीपासूनच मी अयोध्येत बौद्ध विहार करण्यासाठी प्रयत्नशील आहे. अयोध्येत राम मंदीर होतंय. मशिद देखील व्हायला हवी आणि बौद्ध विहार देखील व्हायला हवं. यासाठी मी स्वतः लवकरच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार आहे. तसेच त्याठिकाणी एका ट्रस्टची स्थापना करून तीस एकर जागा खरेदी करणार आहे. आणि त्या ठिकाणी बौद्ध विहार बांधणार आहे. कारण त्याठिकाणी राम मंदिराच्या आधीदेखील बौद्ध विहार होतं. त्याचे अवशेष देखील मिळाले आहेत. त्यामुळे भव्य बौद्ध विहार करण्याचा आमचा मानस आहे. अशी माहिती खासदार रामदास आठवले यांनी दिली आहे.
आठवले म्हणाले, यासाठी लवकरच एका ट्रस्टची स्थापना करणार आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून जमीन खरेदी करण्यात येईल. येत्या काळात अयोध्येत राम मंदिरासोबतच़ बौद्ध विहार देखील अयोध्येत येणाऱ्या भाविकांना पाहिला मिळणार आहे. गायक आनंद शिंदेनी या प्रश्नावर सर्व नेत्यांनी एकत्र यावं असं आवाहन केलं आहे अशी माहिती मला मिळाली आहे. आनंद शिंदे यांनी यामध्ये राजकारण आणण्याची गरज नाही.सध्याची परिस्थिती पाहता सगळे नेते एकत्र येणार नाहीत. शिवाय मी देखील त्यांच्यासोबत जाणारं नाही. बौद्ध विहार बांधण्यासाठी माझे प्रयत्न मी सुरु ठेवणार आहे.
दरम्यान आगामी राम मंदीर उद्घाटनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपने आमंत्रण द्यायला हवं असं वाटतं का ? या प्रश्नावर बोलताना रामदास आठवले म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी राम मंदिर व्हावं यासाठी खुप मेहनत घेतली आहे. 5 ऑगस्टच्या कार्यक्रमासाठी देशातील अनेक मुख्यमंत्र्याना निमंत्रण देण्यात येणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देखील राम मंदिराच्या उद्घाटनासाठी जावं. त्यांना देखील लवकरच नक्कीच आमंत्रण येईल.
शरद पवारांनी एनडीएमध्ये सामील व्हावं असा सल्ला तुम्ही शरद पवारांना दिला होता तर दूसरीकडे चंद्रकांत पाटील म्हणतायत शिवसेनेने भाजप सोबत यावं? या प्रश्नावर बोलताना रामदास आठवले म्हणाले की, उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस व्यवस्थित काम करु देणारं नाही. याचच उदाहरण म्हणजे अनेकवेळा आघाडीत वादविवाद होतं असल्याचं समोर येतं आहे. मुळात महाराष्ट्रात जनतेने भाजपलाचं बहुमत दिलं होतं. परंतु शिवसेनेने फारकत घेत कॉंग्रेस- राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. हे सरकार जास्त काळ टिकणार नाही. त्यामुळे भविष्यात शिवसेना पुन्हा आपल्या जुन्या मित्राकडे येऊ शकते.
सध्या राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या दबावाखाली शिवसेना महाराष्ट्रात काम करत आहे. यानिमित्ताने शरद पवारांना देखील माझं सांगण आहे की त्यांनी भाजप-आरपीआय सोबत यावं.राज्यात एक भक्कम सरकार आपण देऊ. सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून कॉंग्रेसला दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे. अशोक चव्हाणांनी नुकतीच राष्ट्रवादीवर 'सारथी' संस्थेवरुन नाराजी व्यक्त केलीय या प्रश्नाला उत्तर देताना आठवले म्हणाले की, राज्यात कॉंग्रेसला विश्वासात घेतलं जात नाही. हे वारंवार स्पष्ट झालं आहे. कॉंग्रेसचे अनेक नेते देखील नाराज आहेत. त्यामुळे कॉंग्रेसने आपल्या 42 आमदारांचा पाठिंबा काढून घ्यावा. सत्तेमधून कॉंग्रेसने बाहेर पडावं. त्यांच्यावर सतत अन्याय होत आहे. जर कॉंग्रेसने पाठिंबा काढून घेतला तर हे सरकार पडेल. याची जाणीव शिवसेना राष्ट्रवादीला व्हायला हवी.
संबंधित बातम्या :
Before You Go
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
महत्त्वाच्या बातम्या






















