Manoj Jarange Patil Mumbai Maratha Morcha: मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा चौथा दिवस; आंदोलकांसाठी राज्यभरातून भाकरींचा ओघ मुंबईत
Manoj Jarange Patil Mumbai Maratha Morcha

Manoj Jarange Patil Mumbai Maratha Morcha: मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून सरसकट आरक्षण देण्यासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आजचा (1 सप्टेंबर) चौथा दिवस आहे. सरकार पातळीवर मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर अजूनही विचार सुरू असला तरी कोणताही ठोस पर्याय काढण्यात आलेला नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पाण्याचा सुद्धा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आजपासून मुंबईमधील आंदोलनाची धग आणखी वाढत जाणार आहे. दरम्यान जरांगे पाटील यांच्या समर्थनासाठी राज्यपालातून मराठ्यांची मुंबईकडे कूच सुरूच आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईचा परिसर मराठा आंदोलकांनी भरून गेला आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत.
रसद तोडण्याचा प्रयत्न झाल्यानंतर राज्यभरातून संतापाचा उद्रेक
दुसरीकडे, मराठा आंदोलकांसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पहिल्या दिवशी मराठ्यांची आझाद मैदान परिसरातील खाण्यापिण्याची दुकाने बंद ठेवून रसद तोडण्याचा प्रयत्न झाल्यानंतर राज्यभरातून संतापाचा उद्रेक झाला. त्यानंतर राज्यभरातून भाकरी ठेचा आणि चिवडा जमा करून मुंबईला पाठवून देण्यात येत आहे. सर्व स्तरातून ही मदत आता मुंबईकडे रवाना केली जात आहे. राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाकरी मुंबईमध्ये आंदोलकांसाठी येत आहेत.
शेतातील सात टन पेरू भरून ट्रक आझाद मैदानावर
दुसरीकडे, मुंबईत मराठा बांधव हजाराच्या संख्येने आझाद मैदान परिसरात आले आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या नाश्त्याची आणि जेवणाची व्यवस्थाही केली जात आहे. अहिल्या नगरमधील मराठा बांधवांनी आपल्या शेतातील सात टन पेरू भरून ट्रक आझाद मैदानावर आणला आहे. सकाळपासून त्याचं वाटप वेगवेगळ्या ठिकाणी ते करत आहेत. महाराष्ट्रामधून प्रचंड मोठ्या संख्येने मदत येण्यास सुरवात झाली आहे. भाकरी, चपात्यांबरोबर, तांदूळ,गहू,पाणी,बिस्किट,मसाले,लोणचं आदी साहित्य येण्यास सुरवात झाली.
आलेल्या मदतीचे लागले ढीग
प्रत्येक जिल्ह्यातील खेडेगावातून शेतकरी बांधव मदत पाठवत आहेत. आंदोलनाचे दिवस वाढू लागल्याने उपासमार होवू नये म्हणून मतदतीचा ओघ सुरू आहे. मोठ्या संख्येनं टेम्पो, ट्रक आझाद मैदानाच्या दिशेने येत आहेत. त्यामध्ये पुढील आठवडाभर हजारो मराठा आंदोलकांच्या जेवणाची सोय होईल अशा प्रकारचे नियोजन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर मधील ग्रामीण भागातून दहा हजार लोकांसाठी पुरी ठेचा चटणी लोणचं चिवडा ठेवून एक मोठा टेम्पो आझाद मैदानात आला आहे. सरकारसोबत आरक्षणासंदर्भात सुरू असलेल्या चर्चेतून अद्याप देखील कोणताही मार्ग निघाला नाही त्यामुळे आंदोलनांचा टप्पा हा तीव्र होताना दिसून येतोय या अनुषंगाने खबरदारी म्हणून मंत्रालय परिसरातील रस्ते वाहतुकीसाठी पोलिसांकडून बंद करण्यात आलेले आहेत. ठिकठिकाणी मोठा पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.


















