'ऑपरेशन मालेगाव मॅजिक', तब्बल 96 टक्के लोकांची इम्युनिटी स्ट्रॉंग, पहिल्या टप्प्यातील सर्व्हेतून स्पष्ट
Coronavirus : मालेगावातील तब्बल 96 टक्के नागरिकांच्या शरिरात रोगप्रतिकार शक्तीचे प्रमाण 100 टक्के आढळून आले आहे.

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी ती धगधग अजूनही कायम आहे. कोरोनाच्या दोन वर्षांत अनेकांनी हॉस्पिटलचा आधार घेतला तर अनेकांना आयुर्वेदिक काढा घेत स्वतःला या गर्तेतून बाहेर काढले. यात मालेगावच्या काढ्याने त्यावेळी चांगलेच मॅजिक केले. याच मॅजिक पाठीमागचा शोध घेण्यासाठी सर्व्हे घेण्यात आला होता. या पहिल्या टप्प्यातील सर्व्हेचा धक्कादायक अहवाल पुढे आला आहे.
कोरोनाची मागील दोन वर्ष सर्वांसाठीच भयावह होती. या दोन वर्षांत बाधित झालेल्यांनी औषधे, काढे घेत स्वतःला वाचवले. या दरम्यान जिल्ह्यातील मालेगाव काढ्याची विशेष चालती होती. सामान्य नागरिकांसह प्रतिष्ठित नागरिकांनी देखील या काढ्याचा अनुभव घेतला. शिवाय यामुळे इतर ठिकाणी रुग्ण वाढत असताना मात्र मालेगावात रुग्णसंख्या अल्प होती. अखेर मालेगावातील कोरोना रुग्ण नियंत्रणांचा शास्त्रीय शोध घेण्यासाठी जानेवारी महिन्यात ऑपरेशन 'मालेगाव मॅजिक' अंतर्गत सर्व्हे करण्यात आला होता. सर्व्हेमध्ये वयोगटाच्या वर्गवारीनुसार 2735 जणांचे रक्त नमुने घेण्यात आले होते. या नमुन्यांच्या तपासणी अहवालातून मालेगाव मॅजिकचा उलगडा झाला आहे.
सदर अहवालानुसार तब्बल 96 टक्के नागरिकांच्या शरिरात रोगप्रतिकार शक्तीचे प्रमाण 100 टक्के आढळून आले आहे. दरम्यान दांडग्या रोगप्रतिकारशक्तीमुळेच कोरोनाच्या डेल्टा किंवा ओमायक्रॉनसारख्या विषाणूंचा फारसा प्रादूर्भाव शहरात दिसून आला नसल्याची माहिती सर्व्हे पथकांचे समन्वयक डॉ. मिनहाज सय्यद यांनी दिली.
दरम्यान कोरोना उद्रेक काळात शहरात रुग्णसंख्या नियंत्रणात राहिल्याने मालेगाव पॅटर्न राज्यभर चर्चेत आला होता. शहराच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेत आरोग्य विज्ञान विद्यापीठाने अभ्यास सुरु केला आहे. जानेवारी महिन्यात तत्कालीन जिल्हाधिकारी सूरज मांढरे, विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. माधुरी कानिटकर, मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेत एका सर्व्हेचे नियोजन केले होते. सर्व्हेनुसार 12 जानेवारीपासून 18 ते 45, 45 ते 60 आणि 60 वर्षावरील व्यक्तींचे रक्त संकलन करून अर्जाद्वारे माहिती जाणून घेण्यात आली. संबंधित व्यक्तीचे राहणीमान, खाणे पिणे, कोविड काळातील काळजी आदी बाबी समजून घेतल्या होत्या. शहराच्या पूर्व व पश्चिम पट्ट्यातील 20 वार्डांमध्ये 22 पथकांच्या माध्यमातून 2735 जणांच्या रक्ताचे नमुने घेतले होते.
यासाठी धुळे येथील हिरे मेडिकल कॉलेजमध्ये रक्त नमुन्यांची तपासणी करुन अँटीबॉडीजचे प्रमाण तपासले गेले. विविध आजारांशी लढा देत शरिराला सुरक्षित ठेवण्याचे काम अँटीबॉडीज अर्थात रोगप्रतिकारशक्ती करते. हीच रोगप्रतिकारशक्ती 96 टक्के नागरिकांच्या शरीरात 100 टक्के असल्याचे समोर आले आहे. फक्त 04 टक्के नागरिकांमध्ये हे प्रमाण कमी दिसून आले. प्रथमदर्शनी रोगप्रतिकारशक्तीमुळेच मालेगावकरांनी कोरोनाला दूर ठेवण्यात यश मिळवले आहे.
सदर सर्व्हेक्षणातील पहिला टप्पा पार पडला असून दुसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात झाली आहे. दुसरा सर्व्हे सामान्य रुग्णालयाचे उपअधीक्षक डॉ. हितेश महाले, मनपाच्या आरोग्याधिकारी डॉ. सपना ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त वैद्यकीय महाविद्यालयांच्या 22 पथकांद्वारे होणार आहे.
Before You Go
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
महत्त्वाच्या बातम्या





















