एकनाथ शिंदेवरील 'योद्धा कर्मयोगी' पुस्तकात दोन कमतरता, दादा-फडणवीसांची लेखकाला सूचना
Eknath Shinde Book : एकनाथ शिंदे यांच्या पुस्तकावरील फोटोवरून अजित पवारांनी लेखकाला एक सूचना केली तर सत्तांतराच्या वेळी घडलेल्या घटनेवरून देवेंद्र फडणवीसांनी एक सूचना केली.

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संघर्षावर आधारीत ‘योद्धा कर्मयोगी- एकनाथ संभाजी शिंदे’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आलं. त्यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. या पुस्तकावर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो हवे होते असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं. तर देवेंद्र फडणवीसांनी यातील एक चूक सांगितली. मुख्यमंत्रिपदाची घोषणा ही सागर बंगल्यावर झाली असं पुस्तकात म्हटलंय, पण ती राजभवनवर केली असं दुरूस्त करून घ्या अशा सूचना फडणवीसांनी दिल्या.
मुख्यमंत्र्यांच्या पुस्तकावर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे याचा फोटो असायला हवा होता हे माझं मत आहे, ते टाकायला हवं अशा सूचना अजित पवारांनी केल्या. ते म्हणाले की, "कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना ठाण्याच्या किसन नगरमधील शाखाप्रमुख हा मुख्यमंत्री होतो हा त्याच्या मेहनतीचा भाग आहे. एक कट्टर शिवसैनिक आणि धाडसी नेता या पुस्तकातून दिसला."
तर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आताच दादांनी बोलताना काही गोष्टी सूचवल्या, बदल करण्याच्या सूचना केल्या. यात पुस्तकात एका पॅरात लिहिले की मुख्यमंत्रिपदाची घोषणा सागर बंगलयावर केली. पण ती राजभवनात केली असं दुरूस्त करायला हवे."
शिंदे-फडणवीस पुढे गेले, मी तिथेच राहिलोय : अजित पवार
एकनाथ शिंदे यांच्यावर आधारीत पुस्तकाचे प्रकाशन कार्यक्रमावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, "ठाण्याच्या या ऐतिहासिक नगरीत खूप काही घडलंय. सामान्य नागरीक ते मुख्यमंत्री असा प्रवास एकनाथराव शिंदे यांनी केलाय. देवेंद्र फडणवीस यांची टर्म 1999 साली सुरु झाली. तर एकनाथ शिंदेंची कारकिर्द 2004 पासून सुरू झाली. मी यांच्या आधीचा आहे, पण हे दोघे पुढे गेले आणि मी तिथेच राहिलो. मी देवेंद्र फडणवीस यांना म्हटलं की मला जर मुख्यमंत्री करणार असं बोलला असता तर संपूर्ण पार्टीच घेवून आलो असतो."
लोकांच्या गराड्यात राहणारा मुख्यमंत्री
मी अनेक मुख्यमंत्री पाहिले मात्र लोकांच्या गराड्यात अडकलेला हा पहिला मुख्यमंत्री पाहिला अशी स्तुतीसुमनं अजित पवारांनी उधळली. ते म्हणाले की, कॅबिनेट बैठकीतही मुख्यमंत्र्यांच्या बाजूला गराडा असतो. लोकांच्या अर्जावर सर्वाधिक सह्या करणारा हा मुख्यमंत्री आहे.
माझा फॅन फॉलोविंग कमी
अजित पवार म्हणाले की, साताऱ्यातील दरे या गावी एकनाथ शिंदे सातत्याने जात असतात. ते शेती करत असतानाचे अनेक व्हिडिओ मी पाहतो. मलाही शेतीची आवडं आहे. मीही सकाळी फेरफटका मारायला जातो. मात्र आमचे काही फोटो, व्हिडीओ असे येत नाहीत, कारण आमचा तेवढा फॅन फॉलोविंग नाही.
अजित पवार म्हणाले की, उदय सामंत यांना मी तिकीट दिलं, त्यांना मंत्री केलं, दिपक केसरकर यांनाही मीच तिकिट दिलं. शिंदेंसोबत असणारी अर्धी अधिक मंडळी माझी आहेत. पण शिंदेंनी ही मंडळी हेरली, त्यांना सोबत घेतलं आणि आता मलाही घेऊन गेले.
एकनाथ शिंदे हेच खरे नायक
शिंदे सत्तापक्षात असताना त्यांनी सत्ता सोडायची आणि सर्वांना सोबत घ्यायचं, त्यानंतर पुन्हा सत्तास्थापन करायची ही गोष्ट सोपी नव्हती, त्यामुळे शिंदे हेच खरे नायक आहेत. आम्ही अनेक पदं भूषवली मात्र आमचे संबध चांगले राहिले. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार संपवण्याचा प्रयत्न सुरू झाला तेव्हा आम्ही एकत्र आलो. आमच्यातील मॅग्नेटने दादांनाही खेचून घेतलं आणि सरकार बनवलं. आनंद दिघेंनी शिंदेंच्या आयुष्याला वळण दिलं, वाईट प्रसंगातून दिघेंनी बाहेर काढून उर्जा दिली. त्यानंतर समाजसेवासाठी उतरलेल्या शिंदेंनी मागे फिरून पाहिले नाही. पडेल ते काम केलं, रिक्षाही चालवली. मात्र जाज्वल्य हिंदुत्वाचा परिणामही त्यांच्यावर दिसतो. लोकांमध्ये राहणारा व्यक्ती अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्याकडे सर्वाधिक पेशन्स आहे. मात्र पेशन्स संपले की ते कोणाचंही एकत नाहीत.
ही बातमी वाचा:
Before You Go
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
महत्त्वाच्या बातम्या






















