तिरंगा झळकतोय आमच्या शिवारात, शक्तिपीठ नको आमच्या वावरात! जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन
Innovative Agitation Against Shaktipeeth Expressway: भुदरगड आणि कागल तालुक्यामध्ये आमदार सतेज पाटील यांनी आंदोलन केलं. हातकंणगले आणि शिरोळ तालुक्यात राजू शेट्टी यांनी आंदोलन केलं.

Innovative Agitation Against Shaktipeeth Expressway: राज्य सरकारच्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला बाधित जिल्ह्यांमधून कडाडून विरोध होत आहे. मात्र, सर्वाधिक विरोध कोल्हापूर जिल्ह्यामधून होत आहे. शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर आंदोलन सुरू आहेत. आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अभिनव आंदोलन करण्यात आलं. शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी 'तिरंगा आमच्या वावरात शक्तीपीठ नको शिवारात' अशा पद्धतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाने पुन्हा एकदा न शक्तीपीठ महामार्ग विरोधाला पुन्हा एकदा धार आली आहे. भुदरगड आणि कागल तालुक्यामध्ये विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी आंदोलन केलं. हातकंणगले आणि शिरोळ तालुक्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलन केलं.
सुपीक जमीन शक्तीपीठ गिळंकृत करणार असल्याने शेतकरी आक्रमक
सतेज पाटील यांनी गारगोटी आकुर्डे रोडवरील दौलत देसाई यांच्या शेतात शक्तिपीठ विरोधात झेंडा झळकवून आदोलन केले. दुसऱ्या टप्प्यात एकोंडी, ता कागल येथील शिवारामध्ये झेंडा झळकवून सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची अशा गगनभेदी घोषणा दिल्या. दुसरीकडे, ज्या जमिनीतून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे त्या शिवारात तिरंगा झेंडा ऊभारून शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशी मागणी करत साजणी ता. हातकंणगले व निमशिरगांव ता. शिरोळ येथील शिवारात स्वातंत्र्यदिनी आंदोलन केले. दरम्यान, शक्तिपीठ महामार्ग 12 जिल्ह्यांमधून जाणार असला जाणार असला, तरी कोल्हापूरमधून सर्वाधिक विरोध आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक सुपीक जमीन शक्तीपीठ गिळंकृत करणार असल्याने शेतकरी सुद्धा अल्पभूधारक असल्याने सर्वाधिक विरोध होत आहे.
शेतकऱ्यांवर वरवंटा फिरविला जात आहे
यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, रत्नागिरी -नागपूर हा महामार्ग अस्तिवात असताना व तो तोट्यात चाललेला असताना राज्य सरकारकडून 50 हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठी अनावश्यक शक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या व राज्यातील जनतेच्या माथी मारला जात आहे. या महामार्गामुळे पुढील जवळपास 90 वर्षाहून अधिक काळ जनतेला टोल भरावा लागणार आहे. मुठभर उद्योगपतींना व त्यांच्या व्यवसाय वृध्दीला डोळ्यांसमोर ठेवून हा महामार्ग करण्याचा घाट फडणवीस सरकारकडून केला जात आहे. देशातील 150 कोटी जनतेला दोन वेळ पुरेल एवढे अन्नधान्य पिकविणाऱ्या शेतकऱ्यांवर वरवंटा फिरविला जात आहे.
शेतकऱ्यांच्या मनगटात मोदी सरकारला झुकविण्याची ताकद
काॅम्रेड गिरीष फोंडे बोलताना म्हणाले की, देशातील सामान्य नागरीकांच्यावर कराचा व टोलचा बोजा टाकून मोदी-फडणवीस सरकारने बेजार केले आहे. देशातील शेतकऱ्यांच्या मनगटात मोदी सरकारला झुकविण्याची ताकद आहे हे शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे. यामुळे राज्यातील सर्वच्या सर्व 12 जिल्ह्यातील शेतक-यांनी शक्तीपीठ रद्द करण्यासाठी वज्रमुठ केली असून हा लढा यशस्वी करण्याचा निर्धार शेतक-यांनी केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























