kolhapur Municipal Corporation: कंत्राटदारांचे खिसे भरण्याचं काम पालिकेचे अधिकारी करत आहेत का? पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागरांनी अधिकाऱ्यांना झापलं
कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेवरून पालकमंत्री आबिटकर, आमदार क्षीरसागर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरले. 100 कोटींच्या रस्त्यांचे काम सुद्धा काही दिवसातच उखडल्याने नागरिक त्रस्त.

kolhapur Municipal Corporation: कोल्हापुरात शहरात रस्त्यांच्या अत्यंत दयनीय अवस्थेवरून (Kolhapur road potholes) पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांना खरडपट्टी करत धारेवर धरलं. कंत्राटदार यांचे खिसे भरण्याचं काम पालिकेचे अधिकारी करत आहेत का? अशी विचारणा आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली. कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत भीषण झाली आहे. 100 कोटींचे रस्ते करून 100 दिवस सुद्धा टिकले नाहीत, अशी स्थिती झाली आहे. अनेक मार्गावर महाकाय खड्डे पडल्याने प्रवास करताना वाहने आणि कमरेचा मणका दिवसागणिक बाद होत चालला आहे. कोल्हापूर शहरातील रस्त्याचा प्रश्न एबीपी माझाने गेल्या काही दिवसांपासून लावून धरला असून आजही (3 ऑक्टोबर) भीषण स्थिती समोर आणली होती.
हे प्रशासन गुंड चालवणार की अधिकारी याचं उत्तर द्या?
कोल्हापूर शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात पालकमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. या बैठकीत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेण्यात आली. दरम्यान, या भूखंडावर खासगी कंत्राटदाराने महापालिकेच्या भूखंडावर इमारत बांधल्याचा मुद्दा सुद्धा उपस्थित झाला. यासंदर्भात कोणतीच कारवाई अधिकाऱ्यांकडून होत नसल्याने क्षीरसागर भडकले. हे प्रशासन गुंड चालवणार की अधिकारी याचं उत्तर द्या, म्हणत त्यांनी जाब विचारला.
अवघ्या काही तासात लिक्विड कोर्ट पूर्णपणे वाहून गेला
दुसरीकडे, कोल्हापूर सर्किट बेंच समोरील भाऊसिंगजी रोडवर महिनाभरापूर्वी डागडूजी करण्यात आली होती. हा रस्ता केल्यापासून सुदैवाने सुस्थितीत होता. तथापि, 25 सप्टेंबर रोजी संध्याकाळी मनपाकडून याच रस्त्यावर लिक्विड कोट मारून खडी पसरण्यात आली. मात्र, दुसऱ्याच दिवशी एका पावसामध्येच हा लिक्विड कोर्ट पूर्णपणे वाहून गेला. त्यामुळे महापालिकेच्या दर्जावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. कोल्हापूरमध्ये सर्वाधिक वेगाने काय विरघळून जातं याची चर्चा नेहमीच होते. इतकेच नव्हे तर काही चपखल फलक रिक्षा चालकांच्या रिक्षाच्या मागील बाजू सुद्धा दिसून येतात. मात्र असं का होतं याचे उत्तर आजतागायत मिळालेलं नाही.
भरलेले खड्डे सुद्धा दयनीय स्थितीत
कोल्हापुरात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर खड्डे मुजवण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र, पुढे पाठ मागे सपाट अशा पद्धतीने अवघ्या काही दिवसांमध्ये भरलेले खड्डे पुन्हा उखडले आहेत. खानविलकर चौकात एकाच किमान तीनवेळा खड्डे भरण्यात आले. अशीच स्थिती अन्य मार्गावर सुद्धा झाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























