Kolhapur Crime News: गेल्या चार-पाच वर्षांपासून लग्न जुळेना, नैराश्याने ग्रासल्याने गळ्याला दोरी लावून संपवलं आयुष्य
वय होऊनही लग्न न झाल्याने आत्महत्या केल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. त्याच्या पश्चात आई, वडील आणि दोन विवाहित भाऊ असा परिवार आहे. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
Kolhapur Crime: कोल्हापुरात धक्कादायक आत्महत्यांचे (Kolhapur Crime) सत्र सुरुच आहे. आता या यादीमध्ये लग्न ठरत नसल्याने तरुणाने टोकाचे पाऊल उचलताना गळफास घेत आयुष्याचा शेवट केला. ही धक्कादायक घटना शिंगणापूरमध्ये (ता. करवीर) घडली. चेतन भिवाजी चौगले (वय 33) असे मृताचे नाव आहे. वय होऊनही लग्न न झाल्याने आत्महत्या केल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. त्याच्या पश्चात आई, वडील आणि दोन विवाहित भाऊ असा परिवार आहे. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
चेतनच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार लग्न ठरवण्यासाठी गेल्या चार-पाच वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. मात्र, योग जुळून न आल्याने चेतन नैराश्यात होता. या नैराश्यातून चौगुले मळ्यातील जनावरांच्या शेडमध्ये दोरीने गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. त्याला तातडीने सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले, पण उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी स्पष्ट केले. चेतन दहावीपर्यंत शिकला होता. तो वडिलांसह शेत करत होता. दूध व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळत असतानाही लग्न होत नसल्याने त्याला नैराश्याने ग्रासले होते. गेल्या काही वर्षांपासून शेती करणाऱ्या मुलांच्या विवाहाचा गंभीर प्रश्न झाला आहे. यामधून विवाह जुळवण्याच्या नावाखाली फसवणुकीचेही प्रकार झाले आहेत.
रागाच्या भरात पोटच्या मुलाचा वडिलांसह भावानेच केला खून
दुसरीकडे, कागल तालुक्यातील बामणी गावच्या हद्दीत झालेल्या तरुणाच्या खूनाचा कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून अवघ्या 24 तासात छडा लावण्यात आला आहे. आयफोन मागितल्याने रागाच्या भरात वडिलांसह भावानेच खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमरसिंह दत्ताजीराव थोरात अस खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. कोल्हापूर एलसीबीनं मयत अमरसिंहचे वडिल दत्ताजीराव थोरात आणि भाऊ अभिजित थोरात या दोघांना जेरबंद केलं आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील गोटखिंडी गावचे थोरात रहिवासी आहेत.
दारुच्या आहारी गेल्याने वाद
दरम्यान, अमरसिंह दारुच्या आहारी गेल्याने घरात सातत्याने भांडणे होत होती. अमरसिंहने आयफोन घेण्यासाठी वडिलांकडे दीड लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र, त्याला पैसे देण्यास वडिलांनी नकार दिला होता. यामुळे घरात वाद झाला होता. याच वादातून वडिलांनी घरामध्ये अमरसिंहच्या डोक्यात लोखंडी पाईप घातली. या मारहाणीत प्रचंड रक्तस्रावाने अमरसिंहचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी घाबरून रस्त्या शेजारी मृतदेह टाकला होता.
इतर महत्वाच्या बातम्या