Pune Jain Boarding House: मूळ गुन्हेगार ट्रस्टी, त्यांनीच सगळ्या पापांचे प्रायश्चित करावं; जैन मुनी गुप्तीनंद महाराजांची संपूर्ण व्यवहार रद्द करण्याची विनंती
Pune : पुण्यातील जैन बोर्डिंगच्या (Jain Boarding) वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणी मुंबईत धर्मदाय आयुक्तांपुढे सुनावणी होणार आहे.

Jain Muni Guptinanda Maharaj on Pune Jain Boarding House : पुण्यातील सेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंगच्या (Seth Hirachand Nemchand Digambar Jain Boarding) जागेच्या विक्रीवरून नवा वाद पेटला असून यात रोज नव्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात येत आहे. अशातच आज (28 ऑक्टोबर) पुण्यातील जैन बोर्डिंगच्या (Jain Boarding) वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणी मुंबईत धर्मदाय आयुक्तांपुढे सुनावणी होणार आहे. तर या प्रकरणातील संपूर्ण व्यवहार रद्द करण्याची विनंती जैन मुनी गुप्तीनंद महाराज यांनी धर्मादाय आयुक्तांना केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आम्हाला निरोप आहे की ते जैन समाजासोबत आहेत. मुख्यमंत्री यांनी सुद्धा धर्मदाय आयुक्त यांना सांगायला पाहिजे की याबाबत योग्य न्याय द्या, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केलीय.
Jain Muni Guptinanda Maharaj : नेमकं काय म्हणाले जैन मुनी गुप्तीनंद महाराज?
धर्मादाय आयुक्त यांच्यासमोर आज सुनावणी होणार आहे. त्यांना आवाहन आहे की त्यांच्याकडे सुरुवातीला बोगस फाइल आली त्यात मंदिर नसल्याचं सांगितलं गेलं. पण नवीन अहवालात इथे मंदिर आहे, असं दिसलं आहे. पाप कार्यात तुम्ही कुठला ही सहभाग घेऊ नका, संपूर्ण व्यवहार रद्द करा, अशी आमची त्यांना विनंती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आम्हाला निरोप आहे की ते जैन समाजासोबत आहेत. मुख्यमंत्री यांनी सुद्धा धर्मदाय आयुक्त यांना सांगायला पाहिजे की याबाबत योग्य न्याय द्या. आमचं आंदोलन सुरू आहे, देशात काल अनेक ठिकाणी मोर्चा काढला गेला. आज भगवान महावीर यांच्या मंदिरात पूजा-आरती करण्यात येईल. ट्रस्टी यांच्याकडून आत्तापर्यंत काही आलं नाही, विशाल गोखले ने विशालता दाखवली. ट्रस्टी यांनी भगवान महावीर यांच्याकडे बघून योग्य भूमिका घ्यावी. तसेच ट्रस्टी यांनी घेतलेली रक्कम विशाल गोखले यांना परत करावी असेही जैन मुनी गुप्तीनंद महाराज म्हणाले.
Pune Jain Boarding House : मूळ गुन्हेगार ट्रस्टी, त्यांनीच सगळ्या पापांचे प्रायश्चित केलं पाहिजे
विशाल गोखले यांच्या पैश्यांवर आमचा हक्क नाही. गोखलेची संपत्ती जी गेली आहे त्याचे पूर्ण पैसे ट्रस्टीने परत केले पाहिजे. हा व्यवहार बोगस झाला आहे. यात मूळ गुन्हेगार ट्रस्टी आहेत त्यांनीच सगळ्या पापांचे प्रायश्चित केलं पाहिजे. हा व्यवहार रद्द झाला पाहिजे. कायमसाठी हा व्यवहार रद्द करावा. मुख्यमंत्र्यांनी यावर सकारात्मक भूमिका घेतलीय. जैन समाज हा राष्ट्रभक्त समाज आहे. हा समाज फक्त देतो, घेत नाही. पण आज आम्हाला आमच्याच जमीनीसाठी लढावं लागतय असेही जैन मुनी गुप्तीनंद महाराज म्हणाले.

























